Pages

Saturday, 10 October 2020

केसांच्या समस्या भाग 3 - केस गळणे

 

#weekend_brunch with #ayurveda  - Part 5

#inHAIRetance_वारसा_सुंदर_केसांचा  #केस_पेपर_तिचा_आणि_त्याचासुद्धा
#samanwaya_ayurvedic_and_panchakarma_clinic
#keshayurved

केसांच्या समस्या भाग 3

केस गळणे.

              केसांच्या समस्या म्हटले की सर्वांना सर्वप्रथम आठवते ती “झड़ते बालों की समस्या.” अगदी दहशत म्हणावी  एवढी ही केसगळतीची समस्या सध्या बळावली आहे. १० पैकी ७ लोकांना थोड्या-फार प्रमाणात केस गळण्याचा त्रास असतोच. आणि जवळपास सर्वांचाच प्रवास तेले-लेप-शाम्पूपासून सुरुवात होऊन via त्वचारोगतज्ञ ते शेवटी आम्हा आयुर्वेद तज्ञांकडे येऊन पोहोचतो.

           सायलीचे केस शाळेत असताना दाट आणि लांबसडक होते. तिच्या आईकडून आलेल्या या सुंदर वारश्याचा तिला खूप अभिमान.पण सध्या ती गळणाऱ्या केसांमुळे अगदी त्रस्त झाली होती. वेगवेगळे उपाय करूनही थोडासा फरक पडे आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या. सायली माझ्या क्लीनिकमध्ये आली तेव्हा अगदी रडकुंडीला आली होती. पूर्वीचे दाट केस जाऊन आता तिची वेणी अगदी पातळ झाली होती. पूर्ण माहिती घेतल्यावर, तिच्या केसचा बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात आले की कॉलेजमध्ये आल्यापासून सबमिशन्स, कॉलेज फेस्ट्समुळे होणाऱ्या लेट नाईट्स, पार्टीज यामुळे तिची जीवनशैली पूर्ण बदलली होती.

             चाळीशीची अमला क्लीनिकमध्ये आली , तेव्हा लक्षात आले की प्रेझेन्टेशनस्, प्रोजेक्ट डिलिव्हरी , क्लायंट मीटिंग,  घरच्या जबाबदाऱ्या हे आणि असे ताण-तणाव तिच्या रोजच्या आयुष्याचा भागच झाले होते.

             विमलाताईंची तर अजून वेगळी कथा, त्यांचे केसगळतीचे प्रमाण तर एवढे वाढले होते की टाळू स्पष्ट दिसू लागली होती. त्यांची हिस्टरी घेता असे लक्षात आले की अगदी लहानपणापासूनच त्यांना आम्लपित्ताचा त्रास होता.

           केस गळण्याची बरीच कारणे असतात. चुकीची जीवनशैली, पोषणमूल्यांचा अभाव (nutritional deficiency), ताण-तणाव, अपुरी झोप अश्या कारणांमुळे केस गळतात.       केस गळणे ही काही फक्त सौंदर्य समस्या नाही तर कधी कधी ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. उदा. हॉर्मोनल आजार जसे की थायरोईड़ ग्रंथी विकार,पिट्युटरी ग्रंथी विकार, PCOS/PCOD, Autoimmune disorder, कुपोषण, SLE यासारख्या आजारांत केस गळणे एखाद्या लक्षण स्वरूप दिसते तर कधी कधी कॅन्सर च्या चिकित्सेमुळे, दीर्घ मुदतीचा ताप (Malaria,typhiod,chickengunia , dengueसारखे ताप) , केशत्वचेच्या जंतुसंसर्गामुळे (Lichen planus/ring worm infection) सुद्धा केस गळणे दिसून येते.तसेच मेनोपॉजनन्तरही केस गळताना दिसतात.

              आता एवढी वेगवेगळी आणि प्रसंगी गंभीर कारणे असतील तर 'मला काहीतरी तेल-शाम्पू द्या, केस गळणे थांबवण्यासाठी.' हा उपाय होऊ शकतो का? तर *निश्चितच नाही* या सगळ्या केसेसमध्ये केस गळण्याचे कारण शोधून औषधोपचार करावे लागतात. बऱ्याचदा धातुक्षयामुळे, उदा. रस-रक्तादि धातूंचा क्षय, केस गळत असतील तर त्यांची इतरही सूक्ष्म कारणे सर्व शरीरावर दिसतात. त्यानुसार निदान (diagnosis) केले जाते आणि त्याप्रमाणे औषधोपचाराचा कालावधी वाढतो. जर एखादे गंभीर किंवा जुनाट कारण जसे की हार्मोनल आजार, PCOD, कॅन्सर असेल तर प्रसंगी पंचकर्माने शरीरशुद्धी करुन मग औषधे द्यावी लागतात. आता कोणाला प्रश्न पडेल की फक्त केसच गळत आहेत तर एवढा वेळ का लागेल ट्रीटमेंटला? पण लक्षात घ्या,अश्या केसेसमध्ये फक्त केस गळण्यासाठी चिकित्सा करून उपयोगाचे नसते तर त्यामागचे कारण ट्रीट करणे गरजेचे असते. बऱ्याचदा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा खूप वेळ गेलेला असतो अश्या वेळी या मधल्या वेळेत झालेले केसांचे नुकसानसुद्धा भरून काढावे लागते. मुळापासून नीट ट्रीटमेंट केली तर नवीन येणारे केस चांगल्या प्रतीचे आणि ताकदवान असतात.

(क्रमशः)


लेखिका

डॉ. स्निग्धा वर्तक.

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

अधिकृत केंद्र केशायुर्वेद प्रा. लि.

बोरीवली, मुंबई.

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 11 ऑक्टोबर 2020 रोजी https://samanwayayurved.blogspot.com/2020/10/3.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)



Saturday, 3 October 2020

संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा, भाग 1

 



            मावळतीचे रंग, कुणाला सुखावणारे तर कुणाला भिववणारे….

अशीच काहीशी स्थिती वृद्धावस्थेतही होत असते. वार्धक्य / ज्येष्ठपर्व / वानप्रस्थाश्रम / Second innings , प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यातील या कालखंडाकडे पाहतो. कितीही अपरिहार्य आणि अविभाज्य असले तरी जेव्हा खरोखरच वृद्धावस्था जवळ येते तेव्हा नाही म्हटलं तरी सर्वांच्या मनात थोडीशी धाकधूक असतेच.

यामध्ये बऱ्याचदा शारीरिक, मानसिक, आर्थिक अथवा नातेसंबंधातून निर्माण होणारे तणाव, जबाबदाऱ्या यामुळे असे होत असावे कदाचित. ताण-तणाव हेसुद्धा बऱ्याचदा शारीर स्थितीमुळेही होत असतात. का बरं होतं असं?

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.


■ बाल्यावस्था - बाल्यावस्थेत कफ दोषाचे प्राबल्य असते.

हे वाढीचे वय असल्याने बाल्यावस्थेत शरीरामध्ये कोशिका आणि उतींची वाढ होत असते. काही दुखले-खुपले (wear and tear) तर त्या जखमा लवकर भरून येतात.कारण या टप्प्यात वाढ होण्याचा वेग हा झीजेच्या वेगापेक्षा जास्त असतो.

साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत ही अवस्था दिसून येते. 


■ तरुणावस्था -  ही अवस्था साधारणतः पुढील 25 ते 30 वर्षे राहते. या अवस्थेत पित्त दोषाचे प्राबल्य असते. तरुणाईचा जोश,धडाडी, नवीन काही करून दाखवण्याची उर्मी या पित्त दोषामुळेच मिळते. या काळात आपल्या सवयी, दिनचर्येनुसार शरीरातील सूक्ष्म पचन होत असते. वाढीचा (नवीन कोशिका-उती तयार होण्याचा) वेग आणि जीझेचा वेग हा सामान्यतः सारखाच असतो. पण या वयात आपला जो आहार-विहार (lifestyle) असतो त्यातच आपल्या वृद्धावस्थेची बीजे रोवली जातात.

                 या दोन अवस्थांबद्दल अजून बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

■ वृद्धावस्था - आपण सगळेच कधी ना कधी वृद्ध होणार असतो. आणि खरं सांगायचं तर ,

शीर्यते तत् शरीरम् ।

म्हणजेच क्षरण पावते (झीजते) ते शरीर. 

थोडक्यात आणि अचूक सांगणे ही आयुर्वेद शास्त्राची खासियत आहे. त्याचाच नमुना म्हणजे आयुर्वेदाच्या अभ्यासाला आम्ही सर्वप्रथम अभ्यासतो ते हे वाक्य. 'जे क्षणोक्षणी झीजते ते शरीर.' म्हणजे 'लय' होणे हाच या शरीराचा गुणधर्म. या काळात वात दोषाचे प्राबल्य असते.आणि वाताचे लक्षण म्हणजे गती. त्यामुळे वृद्धावस्थेत हा झीज होण्याचा वेग अधिक वाढतो. त्यामुळे विविध प्रणाली उदा. पचनसंस्था, चेतासंस्था, तसेच विविध शरीरावयवांचे कार्य मंदावते.

2011 साली केलेल्या जनगणनेनुसार, भारतात तब्बल 104000000 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या गतीने 2050 सालापर्यंत भारतात एकूण लोकसंख्येच्या 20% नागरिक हे ज्येष्ठ वयोगटातील असतील. मग ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेच ना? 

             वय आणि कार्यक्षमतेनुसार या वयोगटाचे दोन ढोबळ उपप्रकार करता येतील. साधारणतः 60 ते 75 आणि 75 च्या पुढे. अर्थात विविध मानसिक आणि शारीरिक ताण-तणाव व ते सहन करण्याची क्षमता, शारीरिक आणि बौद्धिक प्रतिसाद (रिफ्लेक्सेस) आणि मध्यम वयात झालेले काही आजार उदा. मधुमेह,उच्च रक्तदाब, कॅन्सर (अर्थात ही काही वानगीदाखल उदाहरणे झाली, पण सध्या अनेक आजार मध्यम वयातच दिसून येतात.) तर, अश्या आजारांनुसारही वृद्धावस्थेतील कार्यक्षमता ठरते.

पुढील भागांतून आपण वृद्धावस्थेतील वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करणार आहोत.

(क्रमशः) 



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 04 ऑक्टोबर 2020 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/10/1.html  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करतााना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)