Pages

Tuesday, 14 November 2017

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता.....


 ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता



                   विंदा करंदीकरांची ही कविता वाचली की आम्ही मराठी माध्यमातील मुले परत आपल्या शाळेत जातो. दर वर्षी हिवाळा आला की थंडीत कुडकुडताना,सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरताना ही माझी लाडकी कविता मला हमखास आठवतेच. आताही फक्त शीर्षक देताना या सर्व आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थंडीचे वर्णन या कवितेत इतक्या छान शब्दांत मांडले आहे की साधं-सहज वाचतानासुद्धा निर्जीव, बोचरी थंडी जिवंत झाल्याचा भास होतो.
                 असो, तर या पूर्वीच्या लेखात आपण थंडीत घ्यायची त्वचेची आणि केसांची काळजी याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण आहार-विहार याविषयी माहिती घेऊ. आहार म्हणजे काय खावे - काय खाऊ नये. विहार म्हणजे या ऋतुत दिनचर्येमध्ये काय बदल केले पाहिजेत हे समजून घेऊ.

आहारातील पथ्य :

  1. या ऋतुत कफकर आहार असावा. मधुर, अम्ल व लवण रसात्मक अन्न आहारात असावे. --------- याउलट कटु-तिक्त-कषाय रसात्मक आहार वातकारक असल्याने टाळला पाहिजे.
  2. तृणधान्य - या काळात पचनशक्ति चांगली असते. त्यामुळे या सुमारास बाजारात येणारे नवीन धान्य, जे कफकर असल्याने इतर ऋतूंत वर्जित असते , ते या काळात खावे असा निर्देश आहे. तांदूळ,ज्वारी,बाजरी तसेच गहू आहारात असावा. ------- जुने ,भाजलेले धान्य रुक्ष असते. असे धान्य, नाचणी, जव, वरीचे तांदूळ खाऊ नये.
  3. कडधान्य खाताना मटकी, उडिद, तूर , चवळी ही कडधान्ये आहारात असावी. -------- वाल, वाटाणे,चणे, कुळीथ यासारखे धान्य टाळणे योग्य.
  4. पथ्याच्या भाज्या - कॉलिफ्लॉवर, बटाटा, बीट, दोडका, दूधी भोपळा, लाल भोपळा, भेंडी,गाजर,मूळा, पडवळ ,सुरण, नवलकोल, कोहळा  खाव्य ------ कारली, गवार, कमलकंद (अरबी), शिंगाडा या भाज्या खाऊ नये.
  5. पालेभाज्या - पालक,शेवग्याचा पाला,आंबट चुका, तांदूळजा या भाज्या पथ्यकारक आहेत ------ तर शेपू, टाकळा, अळू या भाज्या अपथ्य आहेत.
  6. सिताफळ, केळी, चिकू, संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळींब, अननस, पपई, पपनस यासारख्या फळांचा मोसम असल्याने ही फळे आवर्जून खावी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे ही फळे अजून एखाद - दोन महिन्यांनी खाता येतील. ------- याउलट जांभूळ, ताडगोळा, कमरख (star fruit) ही फळे खाऊ नयेत.
  7. सुका मेवा - सगळ्या प्रकारचा सुका मेवा काजू,बदाम, अक्रोड, जर्दाळू, खजूर,पिस्ते,मनुका,बेदाणे या ऋतुत आवर्जून खावे.
  8. दूध व दुधाचे पदार्थ - दूध , दही, लोणी, मलई , तूप , लस्सी,पनीर, चीज़ (प्रोसेस केलेले नव्हे) , श्रीखंड यासारखे सर्व पदार्थ पाचकाग्नि बलवान असल्याने योग्य प्रमाणात खाता येतात. ------- मात्र हे पदार्थ फ्रीजमध्ये गार करून किंवा आईसक्रीम घालून खाऊ नये. किंबहुना या ऋतुमध्ये आईसक्रीमच खाऊ नये. तसेच कोल्डड्रिंक सुद्धा पिऊ नये.
  9. ऊस, उसाचा रस, साखर (पण केमिकलयुक्त, साखर नेहमीच वर्ज्य आहे) , मध या काळात जरूर वापरावे
  10. तेल , तूप , चरबी यांचा वापर सढळ हस्ते करावा. तरीही तळलेले पदार्थ खाऊ नये. --------- स्निग्ध आहेत म्हणून डालडा, पाम तेल, मार्गरीन मात्र अजिबात वापरु नये.
  11. मांसवर्ग सगळ्या प्रकारचे मासे, मांस या काळात खाता येते मात्र ते प्रमाणातच खावे. -------- सुके मांस - मासे , भाजलेले मांस वातकारक असल्याने खाऊ नये.
  12. मसाले - अग्निदीपन व पचनास मदत करत असल्याने सगळ्या प्रकारचे मसाले जरूर वापरावे मात्र अति तिखट मसालेदार अन्न जेवू नये.
  13. पाणी मात्र सध्या गरम करुनच प्यावे. --------- नळाचे , फ्रिजमधले थंड पाणी पिऊ नये.


विहारातील पथ्य -

  1. आहारात तिक्त, कटु,कषाय रस वर्ज्य असले तरीही दात घासण्यासाठी मात्र याच रसांचा वापर करावा. म्हणजेच या चविंचे दंतमंजन, टूथपेस्ट वापरावे. गोड टूथपेस्ट वापरु नये.
  2. तोंड धुवायला- शौच - स्नानासाठी गरम पाणी वापरावे.
  3. आधी सांगितलेल्या लेखामध्ये थंडीच्या दिवसांत अभ्यंग व उद्वर्तन यांचे महत्व सांगितले आहे. त्यामुळे अभ्यंग-उद्वर्तन जरुर करावे.
  4. या काळात दिवस लहान असतो त्यामुळे ( रजईत गुरफटून झोपणे कितीही प्रिय असले तरीही) पहाटे लवकर उठावे. व वातप्रकोप टाळण्यासाठी दिवसा झोपणे टाळावे.
  5. या ऋतुत शरीरबळ अधिक असल्याने जास्त व्यायाम केला तरी चालतो. बळ अधिक आणि पाचकाग्नि जास्त असल्यामुळे शरीर कमवण्यासाठी (बॉडी बिल्डिंग) हा ऋतु अगदी योग्य आहे.
  6. यासाठी कुस्ती, पोहणे , जिममध्ये वेट-ट्रेनिंग यासारखे ताकदीचे व्यायाम प्रकार करता येतात.
  7. घर शेगडी किंवा हीटर वापरून उबदार ठेवावे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे.
  8. मात्र बसताना गार वाऱ्यावर बसू नये शक्यतो अंगाला थेट वारा लागणार नाही असे पहावे.
  9. बाहेर फिरताना, प्रवास करताना अंग-कान प्रामुख्याने गळा व छाती गरम कपडयानीं झाकुन घ्यावे.
  10. पायात नेहमी चपला/सपाता असाव्यात.

या लेखाचा पूर्वार्ध , हिवाळ्यात घ्यायची त्वचेची व केसांची काळजी , वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

असा हा थंडीचा मोसम, सर्व ऋतूंमध्ये आल्हाददायक ,बळ देणारा, आणि वर सांगितलेल्या टिप्सचे पालन केले तर मग ही थंडी सजा न वाटता मजा वाटू लागेल. समारोप करताना विंदांची कविता पुन्हा उधृत करते,

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्ध वडावर !
मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.
कविवर्य विंदा करंदीकर


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी १४ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या http://samanwayayurved.blogspot.com या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

1 comment:

  1. अतिशय उपयुक्त लेख आहे. खूपच आवडला.

    ReplyDelete