Wednesday, 1 November 2017

हिवाळ्यात घ्यायची त्वचेची व केसांची काळजी




               दसरा गेला….दिवाळीही झाली…. आता कुठे ,सकाळच्या वेळेस का होईना पण हळूहळू थंडी जाणवत आहे. तसेही पु.ल. म्हणतातच की मुंबईला ऋतु दोनच उन्हाळा आणि पावसाळा. सदैव आपल्या घामाच्या नाही तर पावसाच्या धारा. म्हणूनच ही थोडीशी थंडी हवीहवीशी वाटते. गावाकडेही आता थंडी जाणवत असेल आणि हळूहळू वाढेलही. त्यामुळे या थंडीत शरीराची काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स.
                थंडीचा काळ, हेमंत ऋतु, म्हणजे कफ दोषाचा काळ. कफ म्हणजे बल -- स्निग्ध, शीत, गुरु ,मंद गुणांचा हा कफ दोष शरीराचे पोषण करण्यासाठी महत्वाचा असतो. तसेच थंडीमुळे शरीराग्नि व पचनस्थितिसुद्धा चांगली असते त्यामुळे शरीरबल सुधारते. पण याच कालावधीत वातावरणात आर्द्रता कमी झाल्याने रुक्षता (कोरडेपणा ) वाढतो. या रुक्ष गुणाला शीत हवेची जोड मिळून परिणामी वात दोष वाढतो. त्यामुळे थंडीमध्ये बऱ्याच लोकांमध्ये वाताचे आजार दिसून येतात.

हिवाळ्यात घ्यायची त्वचेची काळजी -  या दिवसांत त्वचेचा वाढलेला कोरडेपणा स्त्रिया-पुरुष-मुले सर्वांसाठीच त्रासदायक असतो. त्वचेवर पुरळ येणे, ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे, काही अति रुक्ष प्रकृतीच्या माणसांमध्ये तर त्वचेचे पापुद्रे निघणे, भेगा पडून रक्त येणे यासारखे गंभीर त्रास सुद्धा दिसतात.
यासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे अभ्यंग आणि उद्वर्तन म्हणजे औषधी तेलाने सर्वाङ्गाला मालिश करणे व नंतर औषधी उटणे वापरून आंघोळ करणे. अभ्यंगासाठी तेल निवडताना शरीरप्रकृती व व्याधी अनुरुप तेल निवडावे. हे तेल पाण्यात ठेवून कोमट करावे व त्वचेवर जिरवावे. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने उटणे लावून आंघोळ करावी. त्रासाची तीव्रता व ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसातून दोन वेळा हे मालिश केले तर उत्तमच. पण किमान एकदा तरी करावेच.

अभ्यंग करण्याचे फायदे -
  1. त्वचा मृदू व घट्ट होते, तिची कांती वाढते.
  2. त्वचेतील रक्तवाहिन्या व मज्जातंतु कार्यक्षम राहतात आणि त्यामुळे स्पर्शज्ञान सुयोग्य होते.
  3. स्नायू पिळदार होतात, शरीर स्थिर होते
  4. ग्लानि, आळस, श्रम दूर होतात. 

ओठ फुटत असल्यास - यालाच आयुर्वेदात ‘ओष्ठप्रकोप’ असे म्हणतात. फुटणाऱ्या ओठांसाठी गाईचे साजूक तूप , शताधौत घृत किंवा कोकम तेल अतिशय परिणामकारक असते. लिपबाम पेक्षाही हे शरीराला सात्म्य असलेले पदार्थ दीर्घकाळ टिकणारे परिणाम देतात. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओठ फुटत असतील तर ओठांची साले काढणे, सुकलेल्या ओठांना लाळ लावून ते ओले करणे कटाक्षाने टाळायला हवे.

टाचा फुटणे / पाय फुटणे - आयुर्वेदानुसार या विकाराला ‘पाददारी’ असे म्हणतात. वात-पित्त दोषात्मक असा हा आजार आहे. यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्यात पावले बुडवून ठेवावी. चिरांमधील माती, कचरा, मृत त्वचा हलक्या हाताने चोळून साफ करावी, अजिबात त्वचेचे पापुद्रे सोलून काढू नयेत. मग पावले टॉवेलने कोरडी करून शताधौत घृत लावावे.
फुटलेल्या त्वचेमधून रक्त, पू येत असेल किंवा खाज होत असेल, जंतुसंसर्ग झाला असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि यासाठी औषधोपचार व पायाला लावण्यासाठी औषधे घेणे आवश्यक आहे.
तरीही टाचा, ओठ फुटणे कायम राहिल्यास त्यामागील कारणे शोधणे गरजेचे असते. रक्ताल्पता, दीर्घकाळ असणाऱ्या पचनाच्या तक्रारी, आहाराच्या सवयी, व्यसने यांचाही परिणाम त्वचेवर होत असतो. त्यामुळे वरवर साध्या दिसणाऱ्या या आजारांचे मूळ शोधणे महत्वाचे आहे.

केसांच्या तक्रारी - 
           वातावरणातील रुक्षतेचा परिणाम केसांवरही होतो. यामुळे केस कोरडे होणे,तुटणे, गळणे, केसांत कोंडा होणे , केसांत पुरळ-फोड होणे , केशत्वचेचे पापुद्रे निघणे यासारखे त्रास दिसून येतात. केसांत झालेला कोंडा चेहरा, मान, पाठ , छातीवर पडतो आणि तेथील त्वचेवर पुरळ, पुटकुळ्या येतात. या सर्व तक्रारींचे मूळ केस व केशत्वचा कोरडी असणे यात असते. त्यामुळे हा कोरडेपणा कमी करणे आवश्यक आहे. यासाठी
  1. अभ्यंग - केसांना चांगल्या प्रतीचे कोमट तेल लावून हलक्या हाताने केशभूमी (scalp) ला मालिश करावी व रात्रभर ठेवावे. केसांसाठी शक्यतो खोबरेल किंवा तीळ तेल वापरावे.यामध्ये आवळा, भृंगराज,ब्राह्मी,यष्टिमधु सिद्ध तेल असल्यास उत्तमच.
  2. मालिश करताना हलक्या हाताने करावी जेणेकरून केस तुटणार नाहीत व मुळांशी असलेला कोंडा मोकळा होईल व तेल जिरेल.
  3. शक्य झाल्यास केसांना वाफ द्यावी.
  4. शिकेकाई, रिठ्यासारखी नैसर्गिक द्रव्ये उत्तमच पण ते शक्य नसल्यास सौम्य शाम्पू पाण्यात विरघळवून वापरावे.
  5. केस धुतल्यावर त्यांना चांगल्या प्रतिचे कंडिशनर किंवा सुकल्यानंतर थोडेसे तेल जरूर लावावे.
  6. थंडीतील आहाराचा विचार नन्तर येईलच पण केस आणि त्वचेसाठी सांगायचे झाले तर अति खारट, अति आंबट , अति तिखट पदार्थ टाळावे.
  7. रुक्षता कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांमध्ये नस्य, शिरोधारा, शिरोबस्ति, बस्तिक्रम यांचा वापर केला जातो.
  8. केस गळणे, तुटणे, पिकणे तसेच मानसिक तणाव असल्यास दिसणाऱ्या तक्ररींमध्ये हे उपाय उत्तम काम करतात. त्यामुळे योग्य परीक्षण व वैद्यकीय मार्गदर्शनाखाली हे उपाय करावेत.

  त्वचा विकार - केसांचे विकार आणि समन्वय आयुर्वेद :

               हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी  होते आणि तिला छोटे तडे-भेगा जातात हे तर आपण पाहिलेच. पण अशी त्वचा वेगवेगळ्या इन्फेक्शनना कारणीभूत ठरू शकते. हिवाळ्यात गारवा असल्याने बरेचजण 'कावळ्याची अंघोळ' उरकतात. अश्या वेळी काखा,पावले,गुप्तांगाची जागा नीट साफ न केल्यास तिथं fungal infection होण्याची शक्यता वाढते. लायकेन प्लॅनस (Lichen planus), एक्झिमा, सोरायसिससारख्या त्वचविकारातही खाज,रक्त येणे,त्वचा फुटणे असे त्रास वाढतात. अश्या वेळी _समन्वय आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आपण *त्वचा परीक्षण* करून त्यानुसार औषधीपचारांची दिशा_ ठरवतो.येणाऱ्या थंडीसाठी नीट आखणी करून औषधे व पंचकर्म उपचार ठरवावे लागतात.

केसांच्या विकारांत केशत्वचा म्हणजेच स्काल्प निरोगी असणे खूप महत्त्वाचे असते. कारण केशत्वचा जर सशक्त असेल तर कोंडा निर्माण करणारे सिबोरीक , फंगल, स्कॅल्प सोरायसिस असे आजार, केस रुक्ष होणे, केसांची टोके दुभंगणे-तुटणे हे सगळेच आजार आटोक्यात येतात. यासाठी आपण क्लिनिकमध्ये *संगणकीकृत केशत्वचा परीक्षण* (Computerized Scalp Analysis)  करतो. यामुळे आजार (disease diagnosis)नक्की होते आणि त्यानुसार वापरायची औषधे ठरतात.अगदी _तेल-शाम्पूसुद्धा तुमच्या केसांच्या प्रकृतीनुसार कोणता वापरावा हे ठरते_ .


टीप - पुढील भाग -  थंडीच्या दिवसात घ्यायची आहाराची काळजी. ( थोडक्यात हेमंत ऋतुतील आहार-विहार.)



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 1 नोव्हेंबर 2017 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2017/11/blog-post.html?m=0

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



No comments:

Post a Comment