Showing posts with label Sharad ritu. Show all posts
Showing posts with label Sharad ritu. Show all posts

Wednesday, 12 August 2020

जन्माष्टमी आणि लोण्याचे महत्त्व.

  

picture courtsey - Internet (Little Krishana cartoon series) Discovery kids.

आज जन्माष्टमी…. भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मदिवस, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा उत्साहात साजरा होत आहे. मार्ग कमी असले तरी उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. कारण कृष्ण भगवान आपल्याला जास्त जवळचे वाटतात. हसऱ्या, खट्याळ मुद्रेचे, लोण्याने माखलेले हात-तोंड यांची पर्वा न करता तल्लीन होऊन लोण्याचा आस्वाद घेणारी बालकृष्णाची मूर्ती सर्वांनाच लोभसवाणी वाटते.

अश्या या श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या लोण्याची माहिती आपण घेणार आहोत. 

लोणी म्हणजे नवनीत. दूधाच्या सायीचे  दही विरजून त्याचे ताक बनवायचं, हे ताक घुसळून वर तरंगणारे लोणी काढून घ्यायचे अशी साधी सोपी कृती आहे लोणी बनवण्याची पण याचे फायदे मात्र अनेक आहेत बरं का.

नवनीतं नवं  वृष्यम शीतं बलवर्णाग्निकृत |

संग्राहि वातपित्तसृकक्षयार्शादितकासजित ||

क्षीरोद्भवं तु संग्रहि  रक्तपित्तरोगजित |

(अष्टांग हृदय)  

संग्राहि दीपनं हृदयं नवनीतं नवोद्धृतं |

ग्रहण्यो विकारग मर्दितरुचि नाशनम ||

(चरक संहिता )

ताजे लोणी मधुर रसाचे ( चवीला गोड ) , शीत गुणाचे आहे. तोंडाची चव सुधारते (अरूचिनाशक) , पचन सुधारणारे, वृष्य ( शुक्रधातू वाढवणारे), शरीरबल-वर्ण सुधारणारे आहे. वात आणि पित्त दोषांचे शमन करते. त्यामुळे शरीराचे पोषण करण्यास मदत करते. हृद्य (हृदयासाठी पोषक, आश्चर्य वाटले ना? हो,पण हे खरे आहे.)

त्यामुळे ग्रहणी (पचनाचे आजार), रक्तपित्त (ब्लीडिंग डिसॉर्डर्स),मूळव्याध,अर्दित (चेहऱ्याचा पक्षाघात), जुना खोकला,क्षयरोग यासारख्या आजारांत आम्ही वैद्यगण  नुसतेच किंवा वेगवेगळ्या औषधांसोबत लोणी वापरतो. 


  • संशोधने काय सांगतात?

  1. लोणी म्हणजेच दुधातील स्निग्धांश. त्यामुळे 100gm लोण्यामध्ये 81 gm स्निग्धपदार्थ असतात. त्यापैकी सॅच्युरेटेड स्निग्धांश ५१ gm. पॉलीअनसॅच्युरेटेड स्निग्धांश ३gm , मोनोअनसॅच्युरेटेड स्निग्धांश २१gm  आहेत.  ०१gm  कोलेस्टेरॉल आहे.  

  2. ४९% अ जीवनसत्त्व आहे. (१००gm मध्ये ३३०० IU  इतके. ) तर ड  जीवनसत्त्वसुद्धा असते. 

  3. ताज्या लोण्यामध्ये मोठया प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आहेत. 

  4. हे पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड स्निग्धांश शरीरासाठी लाभदायक आहेत कारण याच्या रासायनिक संयूगांच्या (chemical composition) रचनेमुळे शरीरातील वाढलेले LDL कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. 

  5. मात्र सॅच्युरेटेड स्निग्धांश शरीराला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे लोणी आरोग्याला वाईट असल्याचा अपप्रचार झाला आहे.

 

  • आयुर्वेद शास्त्र काय सांगते ?

  1. वर  जे सगळे गुण वर्णन केले आहेत ते गायीच्या (हो, दूध-दुभत्याच्या संदर्भात,सर्वप्रथम गाय मग म्हैस यांचा उल्लेख येतो व जेथे गरज असते तेथे स्वतंत्र उल्लेख करून शेळी-मेंढीचा  स्वतंत्र उल्लेख केला जातो, असो .) ताज्या लोण्यासंदर्भात आहेत. विकतच्या ‘टेबल बटर’चे नाहीत. 

  2. हे लोणी मीठ न घालता खायला हवे मात्र टेबल बटर मध्ये तर ३%-५% मीठ preservative म्हणून घातले जाते. 

  3. दूध --->साय -->विरजलेले  दही --->ताक --->घुसळलेले ताक -->ताजे लोणी अश्या कृतीने काढलेले लोणीच लाभदायक असते. कारण विरजण न मंथन (घुसळणे) हे महत्त्वाचे संस्कार आहेत. 

  4. खाल्लेले लोणी पचून ते अंगी लागण्यासाठी व्यायामही तेवढा करायला हवा. बाळकृष्ण लोण्यावर ताव मारून गायी चरायला नेत असे.त्यामुळे ताव नाही मारला तरी लोण्याचे फायदे मिळायला हवे असतील तर व्यायाम करून रोज चमचाभर लोणी जरूर खाता येईल.  

  5. वृद्ध आणि शिशुंसाठी  लोणी हे अमृताप्रमाणे आहे त्यामुळे ते जरूर खावे. 

  6. लहान मुले तर दिवसभर हुंदडत असतात, तसेच हा शरीराणीची बुद्धीच्या वाढीचा काळ आहे. त्यामुळे मुलांसाठी तर लोणी आवश्यकच आहे. 

  7. आजारी, अपचनाचे त्रास असलेल्या व्यक्ती, कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या व्यक्ती यांनी लोणी  सुरु करण्याआधी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.  

तर असे हे भगवंताला प्रिय असलेले लोणी आपल्याही आहाराचा भाग व्हावा यासाठी जरूर प्रयत्न करा. 



संदर्भ - चरकसंहिता, सुश्रुतसंहिता अन अष्टांगहृदय

           आंतरजाल -  heart.org

          चित्रसौजन्य - little krishna cartoon series



लेखिका -

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

*9870690689*

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ०६ जुलै २०२० रोजी आपल्या  https://samanwayayurved.blogspot.com/2020/08/blog-post_12.html  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)



Friday, 3 October 2014

शरदाचे चांदणे की कडक उन्हाळा??

                           शरद ऋतू म्हटले की सगळ्यांच्या मनात पहिला विचार येतो तो कोजागिरी पौर्णिमेचा………  ते आटीव दूध , गारवा..  अहाहा…
                           पहिल्यांदा नवरात्र मग कोजागिरी या सगळ्यांचा अत्युच्च परमबिंदू म्हणजे दिवाळी.
हे म्हणजे अगदी, "ऋतू आहे मोठा… नाही सण-आनंदा तोटा…" अशी अवस्था होते या कालावधीत.सण-वार,पक्वान्ने, मिठाया,चमचमीत पदार्थ, फराळ ,फटाके,यांची अगदी रेलचेलच. त्यात आणखी यावर्षी तर एवढ्या सुट्ट्या जोडून आल्यामुळे सर्वांचेच बेतही ठरले असतीलच.
                          पण एवढे सगळे छान-छान चालले असताना सध्या हैराण व्हायला होतेय ते मात्र उन्हाने…. ज्याच्या-त्याच्या तोंडी एकच नाव 'October Heat' (छ्या बुवा, या वर्षी ऑक्टोबर हीट फारच जोरदार..) पण या उष्णतेचा मुकाबला करायचा तरी कसा??
                          यासाठी आपले भारतीय ऋतू- हवामान समजून घ्यायला हवे.भारतीय हवामान साधारणतः सहा ऋतुंमध्ये वर्गीकृत केले जाते. सध्या शरद ऋतू सुरु आहे. हा काळ घटस्थापना- अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक अमावास्येपर्यंत, दोन महिन्यांचा असतो. भाद्रपद महिन्याचा उत्तर काळ ते अश्विन महिना हा काळ उत्तर भारतात तर आश्विन आणि कार्तिक महिना म्हणजे साधारणतः २२ सप्टेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतात शरद ऋतूची लक्षणे दिसतात. या ऋतूत पाऊस संपून वातावरणामध्ये उष्णता वाढू लागते.
                     शारीर स्थिती - शरदामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे वात दोषाचे निसर्गतःच शमन होते तर उष्णतेमुळे पित्त दोष वाढतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्त प्रकोपाची स्थिती व लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पित्त तसेच रक्त दोषज विकार तसेच उष्णतेचे विकार या काळात दिसून येतात. शरदाच्या आधीचा ऋतू वर्षा (पावसाळा )या पावसाळ्यात शरीरबळ एकदम कमी असते त्यामुळे शरद ऋतुतही  शरीरबळ आणि पचन शक्ती हीन  स्वरुपाची असते.त्यामुळे कमी शरीर बल, मंदावलेली भूक आणि वाढलेले पित्त यांचा विचार करून दिनक्रम आणि आहार यामध्येही आवश्यक ते बदल करावे लागतात.
                                      नाहीतर शरीराच्या या नाजूक अवस्थेमुळे आपण आजारांना बळी पडू शकतो. म्हणून या काळात साथीचे /तापाचे आजार वाढलेले दिसतात
                       दिनचर्या - शरद ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी थंड-शीतल उपाय वापरायला हवेत. थांबा.. थांबा.. पण थंड म्हणजे A.C नाही हं वापरायचा. (A.C. मुळे येणारा कोरडेपणा,अतिथंड तापमान यामुळे त्रास अजूनच वाढेल), त्या ऐवजी वाळ्याचे पडदे वापरा (A.C. वापरायाचाच असेल तर तापमान २८ ते ३० डिग्री से. एवढेच ठेवा,जेणेकरून सामान्य शरीर तापमानाच्या समान तापमान असेल.), आंघोळीसाठी गरम पाणी न घेता कोमट  पाणी/साधे पाणी वाळा घालून वापरा. उष्णतेमुळे अंगाची काहिली होते तर कापूर , चंदन पावडर नेहमीच्या पावडर ऐवजी वापरा. दिवसा झोप घेणे टाळावे.
                       प्राणायाम करणाऱ्यानी कपालभाती, भस्रिका कमी प्रमाणात अथवा करू नये,त्याऐवजी अनुलोम-विलोम, सित्कारी, शीतली या प्रकारांचा अभ्यास करावा. कानामध्ये खोबरेल तेलात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावे. 
                      आहार - शरद ऋतू म्हणजे पित्त प्रकोप काळ. त्यामुळे पित्त दोषाच्या विरुद्ध गुणाचे - मधुर,कडू आणि तुरट चवीचे पदार्थ घेता येतील. दूध आणि तूप हे उत्तम पित्तघ्न आहेत. म्हणून जेवणात योग्य त्या प्रमाणात तुपाचा वापर करता येईल. पण हे तूप कच्चेच, वरण-भात-तूप अशा प्रकारे घ्यावे याउलट तळलेले -तेलकट पदार्थ त्रासदायक होतील. तेल-चरबीयुक्त पदार्थसुद्धा (उदा. चीझ,डालडा,मेयोनिझ,करडई,मोहरीचे तेल,मार्गारीन) कमीच घ्यावे. दही-ताक  घेऊ नये.चायनीज- शिळे पदार्थ खाऊ नयेत.तांदूळ,ज्वारी,बाजरी घ्यावी. कडू रसांचे पदार्थ सांगितले तरी गवार,मेथी,कारले,यासारख्या भाज्या टाळा. पालेभाज्या,दुधी,पडवळ,घोसाळे,दोडका खाण्यात असावा.डाळींब,द्राक्षे,मनुका,खारका,चिकू,सफरचंद खावीत. मासे,शेल फिश,सुके मांस खाऊ नयेत. लसूण, मिरची,गरम मसाला या ऐवजी लवंग,दालचिनी,धने-जिरे वापरावे. गरम पाणी,मद्य टाळावे.त्या ऐवजी माठाचे पाणी,वाळ्याचे पाणी, लिंबू सरबत,कोकम सरबत,आवळा सरबत,शहाळ्याचे पाणी प्या. अननस,स्ट्रोबेरी क्रश, आर्टीफ़िशिअल सरबते (रंग आणि प्रीझार्वेटीव्स घातलेली असल्याने - उदा. फ्रुटी,स्लाईस) टाळा. फ्रीज चे थंड पाणी,कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका(ती फक्त स्पर्शाला थंड असतात पण शरीराला अपायकारकच असतात.).दूध सांगितले असले तरीही मिल्कशेक्स मात्र घेऊ नयेत.




शारदीय विरेचन -

                         विरेचन ही आयुर्वेदीय पंचकर्मामधील शास्त्रीय परिभाषा आहे. पित्त दोष आणि पित्तज विकार यामध्ये प्रामुख्याने विरेचन प्रक्रियेचा वापर केला जातो. तसेच शरद ऋतूमध्ये पित्ताचा नैसर्गिक प्रकोप होत असल्यामुळे वाढलेल्या पित्ताचा निचरा करण्यासाठी या ऋतूमध्ये सामान्य व्यक्ती तसेच पित्त प्रकृती-पित्त विकार असलेल्या व्यक्ती शास्त्रोक्त-विधिवत विरेचन घेऊ शकतात.म्हणून या काळात शारदीय पंचकर्म विचार व प्रचार कार्यक्रमसुद्धा केला जातो.

कोजागिरी पौर्णिमा व विरेचन

                        कोजागिरी म्हणजे 'कोs  जागर्ति'. पूर्वी कोजागिरी म्हणजे गच्चीवर-अंगणात जागवलेली रात्र,गाण्याची मैफिल,आटीव मसाला दूध आणि गप्पांची मैफिल हीच आपली पूर्वकल्पना होती.पण सध्या मात्र कोजागिरी हा एक इवेन्ट होऊ लागलाय. Cause for a celebration!!!! आटीव मसाला दूधाऐवजी मिल्कशेक्स, कोल्ड ड्रिंक्स पासून पाव-भाजी,समोसे,बिर्याणी,भजी यासारखा उष्ण,तीक्ष्ण "पित्त खवळणारा"  मेनू कोजागिरी साठी 'हिट' मेनू होऊ लागलाय. गाणी आणि गप्पांची जागाही डी.ज़े. घेऊ पाहतोय.त्यामुळे रात्र उत्तर रात्रीपर्यंत जागवली जातेय आणि आणि अजून पित्त वाढवले जाते आहे.
                      पण कोणी कधी विचार केलाय का कि हा दिवस शरद पौर्णिमेचाच का बरे असतो?आणि आटीव दूधच का प्यायचे असते? कारण आधी सांगितल्याप्रमाणे या काळात पित्त दोषाचे प्राबल्य असते.मग हे उष्ण,तीक्ष्ण अग्निच्या गुणाचे पित्त कमी करायचे तर मधुर,शीत, सौम्य गुणाच्या दुधासारखे दुसरे औषध नाही. तसेच दूध हे उत्तम रेचक आहे. आणि पित्ताची चिकित्सा करण्यासाठी असे नैसर्गिक रेचन उत्तमच. आणि म्हणूनच आटीव मसाला दूध पिण्यासाठी रात्री सुखद हवेत जागायचे असते,चांदण्यात दूध आटवणे हा चान्द्रसंस्कार आहे.यासाठी पौर्णिमेचा दिवस. आणि आरोग्याचे विशेषण लावले तर लोक करणार नाहीत म्हणून देवादिकांचे कारण.
मग  असे हे आटीव दूध नंतर उत्तम रेचनाचे कार्य करत वाढलेले पित्त सहजी कमी करते,हे यामागचे शास्त्र आहे.
झाले, साधे-सोपे शारदीय विरेचन. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाची कास धरून सणाद्वारे आरोग्याचा ताळमेळ ठेवला, तो असा.
                      तर काय मग यावर्षीची कोजागिरी कशी साजरी करणार तुम्ही??