Sunday, 24 September 2017

Navaratri 2017 Introduction ( Marathi and English version)





नमस्कार
          समन्वय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक आपल्यासाठी ‘नऊ रंग नवरात्राचे.. स्त्रीशक्तीचे...आरोग्याचे’ ही लेखमाला घेऊन येत आहे. आजच्या जगात स्त्री, तिचे आपल्या घरातील-समाजातील असलेले महत्व, तरीही तिच्याकडे होत असलेले अनन्यसाधारण दुर्लक्ष व तिच्या आरोग्याची होणारी  अक्षम्य हेळसांड यांचा विचार करण्याचा प्रयत्न आपण या लेखमालेद्वारे करत असतो. तसेच हे चित्र बदलावे, स्त्रियांच्या आरोग्याची स्थिति सुधारावी यासाठी आपण काय करु शकतो याविषयीसुद्धा माहिती द्यायचा प्रयत्नसुध्दा समन्वय आयुर्वेद क्लिनिकच्या माध्यमातून केला जातो. हे या लेखमालेचं सलग तिसरे वर्ष आहे. यापूर्वी दोन वर्षांमध्ये आपण स्त्रीच्या जीवनातील आरोग्याशी संबंधित नऊ महत्वपूर्ण टप्पे तसेच वेगवेगळया वयात बदलत जाणारे पाळीचे शास्त्रीय स्वरूप अशा दोन लेखमाला केल्या होत्या. यावर्षी या विषयाची व्याप्ती अजून वाढवत भारतीय स्त्रियांमध्ये सामान्यतः मोठया प्रमाणात आढळून येणार्या पण त्याचे पुरेसे गांभीर्य न जाणवलेल्या आजारांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये रक्ताल्पता (Anaemia) , सोमरोग (Leucorrhea- अंगावरून पांढरे जाणे) व पी॰सी॰ओ॰डी॰ यांचा विचार केला जाईल. आशा आहे की आपण समस्त वाचकवर्ग दरवर्षीप्रमाणे उदंड प्रतिसाद द्याल.

धन्यवाद !


वैद्य स्निग्धा चुरी - वर्तक.
समन्वय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक


 Namaskar
                Just like every year, Samanwaya Ayurved and Panchakarma clinic celebrates this Navaratri Festival as a symbol of women empowerment. This year also we will be publishing an article series, ‘Navaratri.. celebration of womanhood.’ Even after being  the strongest support of every household, a Woman has always been neglected, by family members and by herself as well. She plays a pivotal role in making A Home where every family member comes to. But while juggling so many roles her emotional and physical health is inexplicably neglected. Hence we, at Samanwaya Ayurved and Panchakarma clinic, try to change this picture with the help of this article series. We have already covered subjects like ‘Nine important health related milestones for a woman’ and ‘Menstruation and woman - The scientific aspect.’ in past two years. This year, we will try to inform about diseases which are common in Indian women but are being easily overlooked as they are not considered as serious by common masses. We will be covering three diseases namely Anaemia (Pandu Roga) , Leucorrhoea ( Soma Roga - white discharge) and PCOD ( Granthi Artavam).

Hopeful to have tremendous response from all the readers as always.

Thank you and wish you all A Happy Navaratri Festival.


Dr Snigdha Churi-Vartak
Samanwaya Ayurved and Panchakarma clinic.

नऊ रंग.... नवरात्राचे..स्त्रीशक्तीचे.. आरोग्याचे. २०१७


पण्डु रोग (रक्ताल्पता)

      


              रक्ताल्पता आणि स्त्री या विषयावर लिहीण्याआधी जरा या आजाराची भारतीय समाजातील सद्यस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर काही धक्कादायक माहिती मिळेल. काही अभ्यास सर्वेक्षणांनुसार भारतात अर्ध्याहून अधिक ( ५५-५९% ) स्त्रिया या रक्ताल्पता (Anaemia) या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणजेच दर दोन स्त्रियांमधील एक स्त्री ही अॅनिमिक असते.
              आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर स्त्रियांचे हिमोग्लोबिन किमान १२ mg/dl असणे ही आहे आदर्श स्थिती पण बऱ्याच स्त्रियांमध्ये हे असते साधारण १०- ११.९ mg/dl च्या पातळीत, ज्याला कमी तीव्रतेची रक्ताल्पता (Mild Form Anaemia) असे म्हणतात. ( “बऱ्याच बायकांमध्ये असतं नं मग ठीक आहे,बघू नंतर”, हा संवाद याच स्टेजला ऐकायला मिळतो आणि खरं तर हाच दृष्टिकोन पुढे जास्त घातक असतो). त्यानंतर नंबर असतो यापेक्षा कमी म्हणजे ७ - ९.९ mg/dl Hb (हीमोग्लोबिन) असणाऱ्यांचा (Moderate form) आणि ६.९ mg/dl पेक्षाही कमी हिमोग्लोबिन असल्यास स्थिती गंभीर मानली जाते व या अवस्थेत तातडीचे उपाय आवश्यक असतात.

आयुर्वेदानुसार रक्ताल्पता -
             आयुर्वेद शास्त्रामध्ये हा आजार पंडुरोग या नावाने वर्णन केला आहे. पंडु या शब्दाचा अर्थ आहे फिकटपणा . ------>  ज्या आजारात रुग्णाच्या त्वचा,नेत्र,नख या अवयवांच्या ठिकाणी पांडुता येते आणि रोगी केवड्याच्या कणसातील गाभ्याप्रमाणे फिकट आणि निस्तेज दिसू लागतो असा हा पंडुरोग या आजाराविषयी विस्तारपूर्वक सांगताना फक्त रक्ताल्पता हा एकच निकष न मानता इतर शरीरलक्षणेही विचारात घेतली जातात.  तसेच ओजक्षय ही संकल्पनासुद्धा सांगितली आहे. त्यानुसार अंग गळून गेल्यासारखे वाटणे, त्वचेवर कोरडेपणा जाणवणे,अशी लक्षणे सुरूवातीपासूनच जाणवतात. ( या लक्षणांना पूर्वरूपे असे म्हणतात. म्हणजे असे की या अवस्थेत आजाराचे व्यक्त स्वरूप दिसेलच असे नाही पण ही सुरूवात असू शकते.) यानंतर वेळेत औषधोपचार केले नाहीत तर अधिक तीव्र लक्षणे दिसू लागतात. भूक न लागणे, भ्रम(गरगरणे) ,श्रम (नेहमीचे काम करतानाही याआधी न जाणवलेला थकवा), दम-धाप लागणे, सर्वांग वेदना, पोटऱ्यांमध्ये गोळे येणे, केस गळणे, छातीमध्ये धडधड-घाबरल्यासारखे वाटणे यापैकी काही अथवा सर्व लक्षणे आजाराच्या तीव्रतेनुसार दिसतात. अधिक तीव्र लक्षणांमध्ये त्वचा,नखे,डोळ्यांच्या ठिकाणि फिकटपणा येतो,हे अवयव निस्तेज दिसतात, स्वभाव त्रासिक-चिडचिडा होतो, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळल्यासारखे वाटते, अंगात बारीक ताप जाणवतो.

स्त्रियांमध्ये दिसणारे गंभीर परिणाम -
            स्त्रियांमध्ये पंडुता अधिक तीव्रतेने दिसण्याची पुढील मुख्य कारणे आहेत.
  • मासिक पाळी - दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या काळात प्रत्येक वेळी साधारण ३० ते ४० मिली रक्तस्राव होतो होतो. (हे फक्त एका महिन्याचे प्रमाण आहे जे प्रकृतीनुसार कमी-जास्त असू शकते पण सरासरी काढली तर एका वर्षात साधारण 350-500मिली रक्तस्राव होतो. ) जर अंगावरुन जास्त जात असेल किंवा पाळी २१ दिवसापेक्षा कमी कालावधीत येत असेल तर हे प्रमाण अजून जास्त होईल. यामुळे रक्ताल्पतेची लक्षणे दिसतात.
                   पाळीवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊन पाळी अनियमित होणे,कमी प्रमाणात रक्तस्राव किंवा अधिक दिवस थोडे-थोडे अंगावर जाणे अशी लक्षणे दिसतात.
  • गर्भारपण - या काळात स्त्री दोन जीवांची असते.ज्यामुळे शरीरातील रक्त वाढते.(Hypervolemia- यात serum व plasma यांचे प्रमाण वाढल्याने रक्तकणांचे प्रमाण कमी होते.अशा वेळी मातेला ३०-६०mg लोह व ४००माइक्रोग्राम फोलिक ऍसिड मिळणे गरजेचे असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन चे प्रमाण वाढू शकेल. रक्ताल्पता असल्यास अपूऱ्या कालावधीत प्रसूतीचा धोका वाढतो, बाळाचे वजन कमी असणे,प्रसूतिच्या वेळी जंतुसंसर्गाचा धोका शक्यता वाढते.
भारतात शिक्षणाचा अभाव, वैद्यकीय सुविधांबद्दल अज्ञान,आर्थिक अडचणी,वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे येणारा निष्काळजीपणा यामुळे गरोदरपणातील रक्तल्पतेचे प्रमाण अधिक आहे.
  • प्रसूती - एका प्रसूतिच्या वेळी साधारण 500-800मिली रक्तस्राव होतो. प्रसूतीनंतर रक्तस्राव (Post partum haemorrhage) झाल्यास हे प्रमाण वाढते व प्रसंगी मातेचा जीव धोक्यात येऊ शकतो.
  • अस्वच्छता <----> कृमि प्रादुर्भाव - स्वयंपाक बनवताना , जेवताना स्वच्छता न राखणे, अस्वच्छ भांडी-हात यामुळे कृमि संसर्ग होतो जे रक्तल्पतेचे मुख्य कारण आहे.
तसेच अस्वच्छ पाण्यात वाढणाऱ्या anapheles डासांमुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळेही रक्ताल्पता दिसून येते.
  • निकृष्ट दर्जाचे अन्न - सर्वसाधारण भारतीय घरात स्त्रिया व मुलींना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा मिळत नाही, तसेच परंपरागत विचारांमुळे त्या सुद्धा स्वतःचे स्थान कमी समजतात. त्यामुळे शिळे अन्न जेवणे, कुटुंबातील सगळ्यांना वाढल्यानंतर उशीरा जेवणे , उरलेल्या अन्नातच भूक भागवणे असे प्रकार घरा-घरांतून सर्रास दिसतात. अशा वेळी लोहाचा नैसर्गिक स्रोत असलेले सुकामेवा, डाळी, फळे, मांसाहार यांचे सेवन सगळ्यांना शक्य होत नाही त्यात स्त्रियांच्या वाटयाला त्याचा गरजेइतका भाग येईल याची शक्यता कमी असते. मुलांच्या पोषण -गरजा यांच्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणारी आई स्वतःच्या आरोग्याकडे सहज दुर्लक्ष करते.

उपाय -
  • आहार - आहारामधून मिळणारे लोह हे सौम्य रक्ताल्पता व हीमोग्लोबिनची पातळी नियमित ठेवण्यासाठी उपयोगी असते. पालक, बीट,टॉमेटो, डाळी, कडधान्ये, राजमा, चवळी यासारख्या भाज्या, मनुका, सुकामेवा, कलेजी, कोंबडीचे- बकरीेचे मांस,मासे यातून पुरेसे लोह मिळते.
  • औषधे - पंडु रोग चिकित्सा करताना फक्त रक्तवाढिसाठी लोह देणे पुरेसे नाही तर रसधातु पासून चांगला रक्तधातु तयार व्हावा यासाठी रक्ताग्निवर्धक  व रक्तधातु वर्धक अशी दुहेरी औषधयोजना करावी लागते. रक्तक्षय---> दुर्बलता---->धातुक्षय---->वातप्रकोप----> रुक्षता ,असे हे दुष्टचक्र आहे. यासाठी स्नेहन, मृदू विरेचन अशी पंचकर्म चिकित्सा करून नंतर पुनर्नवा मंडूर, नवायस लोह यासारखी औषधे  दिली जातात. औषध योजना करताना  त्यासोबत फोलिक एसिड देतात ज्यामुळे लोहाचे शोषण वाढते. तोंडावाटे द्यायची औषधे मध्यम तीव्रतेच्या रक्ताल्पतेसाठी उपयोगी असतात.
  • तीव्र रक्ताल्पता असल्यास इंजेक्शन्स किंवा blood transfusion केले जाते व त्यानंतर दीर्घ कालावधीसाठी गोळ्या दिल्या जातात.

टीप - मात्र लोहाच्या कमतरतेमुळे जसा रक्तल्पतेचा त्रास होतो तसेच अति लोह सेवनाने विषाक्तता (लोहाचे शरीरावर दिसून येणारे विषारी परिणाम) दिसून येतात. प्रस्तुत लेखामध्ये व्यक्त केलेली मते ही सामान्य वाचकांच्या माहितीसाठी आहेत. त्यामुळे डॉक्टर नसताना स्वतःच स्वतःवर प्रयोग करु नये वैद्यकीय सल्ल्यानेच औषधे घ्यावित.

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २४ सप्टेंबर २०१७ रोजी आपल्या http://samanwayayurved.blogspot.com या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)

Nine colours of Navatratra... Celebration of Womanhood


Anemia in Indian women




               Anemia is one of the major silent killer in developing and underdeveloped countries. More than 50% (55%-59%) to be precise) women are anemic only in India. It means that statistically every one of the two Indian women is anemic. Scientifically if we try to classify, ideal value of haemoglobin for women is more than 12mg/dl. But many women have their Hb (haemoglobin) values between 10-11.9 mg/dl and they,not doctors, may think of it is normal ( chalta hai,sabka hai na fir theek hai…) but clinically it is actually considered as Mild Anemia. Hb levels between 7-9.9 mg/dl are classified as Moderate Anemia and below 6.9mg/dl is classified as severe Anemia.

Ayurvedic Aspect of Anemia
              Ayurvedic texts have mentioned Anemia as Pandu Roga. Pandu means pallor. i.e. faint discoloration of skin,eyes and nails. Further description of Pandu Roga is not only limited to the pallor but also includes various generalised body symptoms which can be seen clinically as the disease advances. Dryness of skin,increased feeling of tiredness. These are called as Purvarupa. (ie preliminary symptoms which may not present an entire illness but act as early symptoms.) Some other symptoms are seen later on as disease progresses. Fatigue,dizziness(giddiness), palpitations,myalgia(body ache), cramps,hair fall are the more symptoms. Severe cases may also present increased pallor,increased irritability, frequent headache, getting tired even during daily routine, breathlessness,loss of consciousness.

Why women at Risk?
There are several reasons which make women more prone to Anemia.
  • Menstruation - During each cycle a female loses approximately 30-40 ml of blood which makes average 350-500 ml of blood loss per year. This just an average per woman where frequent menstruation or heavy menstrual bleeding is not considered. Also Anemia can cause menstrual irregularities like delayed menstrual cycles,  lesser blood flow.
  • Pregnancy - pregnancy caused hypervolemia (increased blood volume ) which may cause lower haemoglobin values in absence of additional iron supply. During Each pregnancy mother needs daily supply of 30-60 mg elemental iron and 400 microgram folic acid. Anemia can cause preterm deliveries,low Birth weight baby, increased Risk of sepsis during labour. Due to lack of education, improper knowledge of medical care facility,lower socio-economic status, careless attitude due to frequent pregnancies are the major contributors in Anemia in pregnant women.
  • Delivery - almost 500-800 ml blood is lost during each normal delivery. Post partum haemorrhage,back to back deliveries can also Risk woman’s life.
  • Unhygienic conditions - unhygienic conditions of living, unhygienic habits of preparing,storing and eating food are the major cause of hookworm infestation. These worms are parasites which use human body as their hosts and feed themselves by sucking human blood which is one of the common cause of Anemia.
  • Also malaria infection, caused by Anopheles species of mosquitoes which grow in drainage water, is also a major cause of Anemia.
  • Malnutrition - even Today, girls and women have inferior status as compared to boys and men in many rural and urban households. Also traditional upbringing makes them feel of lesser importance hence eating stale food,eating late only after everyone else have finished their meal, eating leftovers which may be less than required is very common among Indian women. Also natural dietary sources like meat ,fruits,lentils are quite expensive which may not be affordable to every household and women are even less likely to get an adequate share.

Treatment -
  • Dietary - Dietary sources are very useful in order to maintain proper iron and haemoglobin levels also to treat mild form of Anemia. These diet rich foods are spinach, beetroot,raisins,lentils,cashews, white beans, kidney beans , tomatoes, means like chicken,lamb, livers, fishes.
  • Medicines - according to Ayurveda treating  Pandu Roga only  with iron supplements is not enough but it is also necessary to treat Raktagni and Raktadhatu first. Raktakshaya ----> Vataprakopa (vitiation)----> dhatukshaya (suppression of cellular metabolism). This is a vicious pathology which needs to be broken in order to get long terms, definitive results.  To achieve this we need to start with snehapana like Dadimadi, Drakshadi Ghrutam which is then followed by mild or Moderate purgatives for detoxification. After which oral medicines are used. These medicines are often combined with folic acid , vitamin B12 in order to optimize iron absorption. These are mainly used to treat mild to Moderate Anemia
  • Injectables and blood transfusion is used as emergency modes in order to treat severe cases.

Note - views expressed in this articles are medical facts stated for reader's knowledge. Kindly consult an ayurvedic Consultant. Self medication can be dangerous to Health.

Wednesday, 2 August 2017

‘प्रेमस्वरूप आई…. वात्सल्यरूप आई..’ भाग १


   ‘प्रेमस्वरूप आई…. वात्सल्यरूप आई..’
(World Breastfeeding week 2017 च्या निमित्ताने )



         आई व बाळाचे नाते यावर सर्व भाषा-संस्कृतीमध्ये भरभरुन लिहिले- बोलले जाते. भारतीय सिनेमांनी तर यात मोलाची भर टाकली आहे. “ दूध का कर्ज….माँ का दूध पिया है तो….” असले “अस्सल इमोस्सनल” संवाद आजही तितकेच पॉप्युलर आहेत चित्रपटांमध्ये. विनोदचा भाग सोडा पण खरंच आई व बाळाच्या नात्यातील प्रेमबंध आगळेच असतात आणि स्तनपान यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तसेच मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून स्तनपान- मातृस्तन्य आई व बाळ दोघांसाठी महत्वाचे आहे.
           हे महत्व जगातील सर्व मातांपर्यंत पोहोचावे आणि जगभरातील प्रत्येक नवीन मातेला, मग तिचा आर्थिक स्तर-सामाजिक स्तर कुठलाही असो,तिला आपल्या बाळाला स्तनपान देता यावे यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या पहिल्या आठवडयामध्ये १९९१ सालापासून ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ साजरा केला जातो. स्तनदा माता व त्यांचे कुटुंबिय यांना स्तनपानाबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळून स्तनपानासाठी नवीन मातेला जास्तीत जास्त आधार मिळावा हाच यामागचा उद्देश आहे.
            खरे तर पहिले सहा महिने आईच्या दूधाइतका सकस आणि संपूर्ण आहार इतर कोणताही नसतो. तुम्हीच विचार करा, बाळाच्या तब्येतीनुसार आईच्या दुधातील घटक कमी-जास्त होतात (Customized), नेमक्या तापमानाचे, जन्तुसंसर्गविरहीत (आईच्या स्तनांतून थेट बाळाच्या तोंडात), द्रव आणि घन पदार्थांचे योग्य संतुलन असलेला तसेच बिन खर्चाचा असा सर्वर्थाने परिपूर्ण आहार दूसरा कोणता असेल? मात्र असे असूनही बऱ्याच नवजात बाळांना अजूनही पुरेसे आईचे दूध मिळत नाही. यासाठी कारणांची चर्चा, गैरसमजुतींचे निराकरण आणि साधन-सुविधांची सुलभ उपलब्धता करून देणे यासाठी World Alliance for Breastfeeding Action (WABA), World Health Organization (WHO) आणि UNICEF यांनी एकत्र येऊन कामाला सुरुवात केली आहे. या इतक्या महत्वाच्या संस्थांचा सहभागच या कामाचे महत्व आणि व्याप्ति यांची जाणीव करून देण्यास पुरेसा आहे. या वर्षीचे ध्येय आहे ‘Sustaining Breastfeeding Together.’ (सर्वांच्या सहकार्याने स्तनपानाचा दर्जा टिकवून ठेवणे) कारण या संस्थान्नी केलेल्या इतक्या  वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणून आजकाल स्तनपानाचे महत्व लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. पण असे असले तरीही बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान कायम राखणे सर्वच मातांना शक्य होत नाही. यामागे पोषण घटकांचा अभाव, घरच्या सदस्यांचा पाठिंबा, मातेला मिळणारी विश्रांती, तिचे मानसिक स्वास्थ्य (घर-नोकरीचा ताण) यासारख्या एक किंवा अनेक घटकांचा अभाव असल्याने हे घडत असते.
           यासाठी नवीन स्तनदा मातांना व त्यांचे जोडीदार तसेच घरातील सदस्य या सर्वांना स्तनपानाबद्दल आवश्यक ती माहिती मिळणे गरजेचे आहे, जेणेकरून उपरोक्त कारणे दूर करून मातांना आवश्यक तो आधार मिळेल. यासाठी गायनेकोलॉजिस्ट, सपोर्ट ग्रुप, प्रशिक्षित कार्यकर्ते, Lactation Consultants यांची मदत होते. प्रसूतिपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेत स्तनपानाचे फायदे, वरच्या दूधाचे तोटे, बाटलीने दूध पाजताना काळजी न घेतल्यास उद्भवणाऱ्या समस्या यांसारख्या विविध मुद्दयांवर चर्चा- प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्यक्ष स्तनपान करताना अडचणी व त्यांवर मात करण्यासाठी घ्यायची काळजी है शिकवून नवीन मातांवर येणारे दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. घरातील इतर सदस्यांच्या मानसिक तयारीची आवश्यकता काय असा प्रश्न इथे काही जणांना पडू शकतो पण बाळ घरी आल्यावर त्याच्या संगोपनासाठी अधिक मनुष्यबळाची गरज भासू शकते, इतरांच्या दिनक्रमात बदल होणे सहाजिक असते अश्या वेळी घरातील सर्वांचीच मानसिक तयारी असेल तर आईला स्तनपानासाठी पुरेसा वेळ, पोषक अन्न,विश्रांती आणि सहयोगी वातावरण घरातच मिळेल.
स्तनपानाविषयी लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे -
  • पहिला स्पर्श व स्तनपान - प्रसूतिनंतर बाळ रडले व श्वासोच्छवास नीट सुरु झाला की लगेचच बाळाला स्वच्छ,मऊ कापडाने कोरडे करून आईजवळ स्तनपानासाठी द्यावे.
  • पहिल्या तीन दिवासांमध्ये स्तनांतून पिवळसर ,जाड चिक,ज्याला कोलोस्ट्रम असे म्हणतात, तो स्रवत असतो. हे दूध प्रमाणाने कमी असले तरी पोषणमूल्याने अधिक संपृक्त असते.( Nutrients are in concentrated form in low volume). तसेच हे दूध थोडे सारक असते ज्यामुळे बाळाला शी करणे (passing meconium) सुलभ होते.ज्यामुळे अधिकचे बिलीरुबिन,लाल रक्तपेशींचे टाकावू घटक यांचा निचरा होतो व बाळाला कावीळ होण्याची शक्यता कमी होते. तसेच कोलोस्ट्रममध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ति निर्माण करणारे घटक (IgM, IgG, IgA antibodies) असतात  ज्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ति नैसर्गिकरित्या विकसित होण्यास मदत होते.
                                                   (क्रमशः)
संदर्भ : ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क, इंडिया.
        टेक्स्टबूक ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स
चित्रसंदर्भ : वर्ल्ड अलायन्स ऑफ ब्रेस्टफीडिंग ऍक्शन वेबसाइट.

Sunday, 23 July 2017

रिमझिम गिरे सावन…….. ( वर्षा ऋतुचर्या )


रिमझिम गिरे सावन…….. ( वर्षा ऋतुचर्या )



                   पावसाला सुरुवात झाली की सगळ्यांच्या उत्साहाला बहर येतो. भजी-समोसे-फ्राइज आणि चहा यांच्या पटापट जोड़या जुळवल्या जातात. पावसाळी रेसिपीजमध्ये गरमागरम मॅगी पासून झणझणीत सूप्स, चहा-कॉफीच्या कप्सचे फोटो, पावसाळी शुभेच्छा, हवामान खाते आणि पावसाच्या “मैत्रीचे” जोक्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतात. मग हळूहळू पोटदुखी , एसिडिटी, सर्दी-ताप-खोकला यांच्या तक्रारी घेऊन पेशंट दवाखान्यात दाखल होऊ लागतात. आता लगेच काही हौशी लोक म्हणतील की ‘काय डॉक्टर, पाऊस म्हटले की लगेच आजारच दिसतात का तुम्हाला? जरा वर्षा सहल,धबधबे, चटपटीत खाऊ असं काही बोला की..  पण काय करणार, सध्या इथं दवाखान्यात येणारी गर्दी या आजारांसाठीच प्रामुख्याने येते आहे आणि या आजारांचे कारण आहे, न पाळलेले ऋतुचर्येचे नियम.
             जसं की आपण पूर्वी उन्हाळ्यासाठी ग्रीष्म ऋतुचर्या पाहिली त्याचप्रमाणे आताही ऋतु बदलला, हवामान बदलले त्यानुसार आचरण बदलायला हवे. ग्रीष्म ऋतुतील कडक उष्णता आणि रुक्षता यामुळे आधीच वाढलेल्या वातदोषाला सततच्या पावसामुळे गारव्याची जोड मिळते आणि वातप्रकोप  झालेला दिसतो.(प्रामुख्याने वात दोषाची लक्षणे अधिक वाढलेली दिसून येणे) तसेच वाढलेली आर्द्रता/कमी तापमान/सततच्या पावसामुळे येणारा ओलावा हे कफाच्या (सर्दी,खोकला,दमा) यासारख्या आजारांना बळ देतात. तसेच या काळात पाणी गढूळ , अशुद्ध असते.वनस्पति प्रामुख्याने नवीन उगवलेल्या, कमी गुणाच्या (हीन), अम्ल रसप्राधान्य असलेल्या असतात त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीरात पित्त दोष अधिक साचू लागतो. यामुळे भूक कमी होणे, अपचन,शौचाला साफ न होणे किंवा बरोब्बर याउलट, जुलाब होणे, पोटदुखी यासारखे त्रास होताना दिसतात. या अश्या वात-पित्त-कफ, तीनही दोष कमी-अधिक प्रमाणात बिघडलेल्या शरीरस्थितिमुळे पाचनशक्ति मंदावलेली आणि शरीरबळ हीन झाल्याचे जाणवते. त्यामुळे सतत उत्साह नसणे, मरगळल्यासारखे वाटणे, बेचैनी वाटत राहते. त्यातच सूर्यकिरणांचा अभाव,ढगाळलेले वातावरण,अशुद्ध पाणी, आर्द्रता,ओलावा यामुळे साथीचे रोग पसरतात (viral आणि bacterial infections हो..)
अशा वेळी ऋतुनिहाय आहार-विहार-आचरण महत्वाचे आहे. यासाठी,

      विहार
  1. घर-ऑफिस स्वच्छ व कोरडे असेल याकडे लक्ष ठेवावे. जेणेकरून बुरशीची वाढ होणार नाही.
  2. घरात संध्याकाळी धूप करावा, धूपनाने सूर्यास्तानंतर घरात येणारे किटक दूर होण्यास मदत होते.
  3. बाहेर असताना पावसात भिजणे टाळावे,नेहमी छत्री, रेनकोट जवळ ठेवावे.
  4. गळ्याचा - छातीचा भाग , जॅकेट-स्कार्फने झाकून घ्यावा.
  5. भिजल्यास लगेचच अंग विशेषतः डोके कोरडे करावे व शक्य असल्यास स्वच्छ व  कोरडे कपडे घालावे.
  6. पावसाळ्यासाठी बंद तोंडाचे बूट वापरावे. चिखल व साचलेल्या पाण्यातून चालू नये.  यामुळे किटक दंश,उंदीर चावणे तसेच Leptospirosis यासारखे आजार टाळता येतात.
  7. कपडे व अंतर्वस्त्रे कोरडी वापरावीत. दमट कपडयांमुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्वचाविकार,गुप्तांगांमध्ये खाज-चट्टे उठणे असे त्रास होऊ शकतात.
  8. केस ओले-अस्वच्छ राहिले किंवा ओल्या केसांना तेल लावले गेले तर कोंडा, फोड, पुटकुळ्या होऊ शकतात.
  9. सकाळी उठल्यावर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.
  10. व्यायाम हलक्या स्वरूपाचा असावा.
  11. वातशामक तेलाने अभ्यंग (मसाज)  करून मग कोमट पाण्याने आंघोळ करावी.
  12. दिवसा झोप व रात्री जागरण टाळावे.नाहीतर वात-पित्ताचे त्रास वाढतात.

     आहार  
  1. पावसाळ्यात भाज्यांची कमतरता व चमचमीत पदार्थांची आवड यामुळे पापड, भरलेल्या मिरच्या-सांडगे, लोणची असे साठवणिचे पदार्थ बाहेर येतात.मांसाहारी घरामध्ये सुके मांस,सुके मासे यांचा वापर वाढतो.
  2. पण सुकवलेले पदार्थ पचायला जड असतात तसेच टिकवण्यासाठी त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ, तेल अथवा मसाले वापरतात. त्यामुळे या सर्व पदार्थांचा वापर जपूनच करावा.
  3. जेवणात आंबट-खारट चवींचे पदार्थ कमी वापरावे. रुचिकर म्हणून सैंधव, आले लिम्बू यांचा मर्यादित वापर करावा.
  4. चण्याची डाळ, बेसन याऐवजी मूग डाळ, मूग डाळीचे पीठ,मसूर डाळीचे पीठ वापरावे.
  5. धान्य शक्यतो जुने वापरावे किंवा नवीन असल्यास भाजून घ्यावे.
  6. आंबवलेले किंवा दही मिसळून शिजवलेले पदार्थ (इडली,उत्तप्पा, मेदूवडा, ब्रेड,ढोकळा) खाऊ नये. नाइलाजाने खायचे झाल्यास नीट भाजलेला टोस्ट,डोसा खावा)
  7. कच्चे सलाड, फ्रूट प्लेट खाऊ नये.सलाड खायचे झाल्यास थोडे वाफवून खावे.
  8. दूध पिताना एक कप दूधासाठी पाव चमचा सूंठ घालून उकळून प्यावे.
  9. पचन, अग्नि दीपन यासाठी ताक उत्तम आहे त्यामुळे ते शक्यतो दुपारी जेवणानंतर जीरे-सैंधव घालून प्यावे.
  10. हल्ली फिटनेसबद्दल गैरसमजापोटी लोणी-तूप टाळले जाते.मात्र पावसाळ्यात घरगुती लोणी-तूप आवर्जून वापरावे. (मात्र हे लोणी-तूप तळणासाठी न वापरता पोळी-चपाती-थालीपीठ-पराठे यावर लावून,वरण-भातावार असे कच्च्या स्वरुपात खावे.)
  11. शिळे अन्न खाऊ नये.
  12. भूक मंदावलेली असेल तर हलका, द्रव स्वरुपाचा आहार घ्यावा. (Ref. कुळीथाचे कढण http://samanwayhealth.blogspot.com/2015/07/blog-post_1.html?m=1, मांसरस http://samanwayhealth.blogspot.com/2015/07/blog-post_16.html?m=1 )
  13. पाणी नेहमी उकळलेले  व कोमटच प्यावे.
  14. इतर पथ्य-अपथ्य पदार्थांचा तक्ता खाली सविस्तर दिला आहे. तो नीट वाचावा व काही शंका असल्यास कमेन्ट/मेसेज बॉक्स मध्ये निःसंकोच विचारु शकता.

     पंचकर्म
  • पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो.त्यामुळे गुडघेदुखी,कंबर दूखणे, सायटिका,टाचा दूखणे, पायात गोळे येणे, यूरिक एसिड वाढून होणारा gout सारखा आजार असे वातविकार मोठ्या प्रमाणात दिसतात.अश्या आजारांसाठी बस्ति चिकित्सा अतिशय उत्तम आहे.
  • पोटात गुबारा धरणे, वारंवार गॅसेस होणे,बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर सुद्धा बस्तिकर्म हा उत्तम उपाय आहे.
  • जेव्हा आजाराची लक्षणे अधिक तीव्र असतात किंवा आजार जुनाट असतो किंवा औषधे थांबवली की त्रास परत उफाळून  येत असेल अश्या वेळी वैद्य सखोल आणि विस्तृत तपासणी करून बस्ति कर्म करतात.

      पथ्य-अपथ्य तक्ता



            पथ्य
              अपथ्य
 धान्य
तांदूळ,ज्वारी,बाजारी, नाचणी, जव, गहू(मर्यादित प्रमाणात)
मैदा-मैद्याचे पदार्थ,वरी तांदूळ,नवीन धान्य
 डाळी
मूग,मसूर, कुळीथ(कढण/पिठले)
तूर, वाल,चणे, छोले,राजमा, वाटाणे
 भाज्या/फळभाज्या
दूधी भोपळा,शिराळी, घोसाळी, पडवळ,भेंडी,सुरण
पालेभाज्या, कारली, गवार,बटाटा
 


  फळे
अननस, पपई, डाळींब,करवंद, आंबा(मर्यादित)
फणस,ताडगोळे,काकड़ी, कवठ, खरबूज, टरबूज, केळी,
 दूध व दुग्धजन्य पदार्थ
दूध(सुंठ/हळद सिद्ध), तूप, लोणी(टेबल बटर नव्हे), ताक.
दही,लस्सी,पनीर,चीज़, कंडेंसड मिल्क
 मांसाहार
गावठी कोंबडा, गावठी कोंबडीची अंडी, छोटे मासे
सुके मांस,सुके मासे, मटण, मोठे मासे
गोड पदार्थ
मध,गुळ, खडीसाखर
 पांढरी साखर, माव्याची मिठाई
मसाले
आले, लसूण, मिरे, जीरे,धने, लाल तिखट
मोहरी,हिरवी मिरची
आंबट पदार्थ
कोकम, लिम्बू
 चिंच, कैरी,आमचूर,आंबवलेले सॉस , टॉमेटो(मर्यादित)
इतर
लाहया - ज्वारी,तांदूळ, राजगिरा, मका(पॉप कॉर्न्स)
तळलेले ,शिळे पदार्थ, जळजळ निर्माण करणारे असे , आंबट पदार्थ






Image courtesy intenet
चित्र सौजन्य आंतरजाल

(प्रस्तुत लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी २३ जून २०१७ रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2017/07/blog-post.html?m=1 या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखिकेधिन  आहेत. इतरत्र शेअर करायचे झाल्यास लेखात कुठलाही बदल न करता शेअर केल्यास हरकत नाही

Monday, 24 April 2017

आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…

   
   आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा…
                                                  ( ग्रीष्म ऋतुचर्या )




                   हे शीर्षक वाचूनच तुम्ही म्हणाल की ‘अहो, उन्हाळा येतोय कसला, आता तर अगदी ठाणच मांडून बसलाय! हीटवेव्ह तर दोनदा येऊन गेली. बसल्या बसल्या शिजतोय आम्ही रोज.’ तुमचंही खरंच आहे म्हणा,यावर्षी आल्हाददायी वसंत फारसा असा जाणवलाच नाही. सध्या वसंत ऋतू सुरु आहे असं फक्त झाडावरची कोवळी पालवी आणि गाणारा कोकिळच म्हणेल, बाकी हवामान तर ग्रीष्माचीच लक्षणं दाखवतं आहे.सूर्याची प्रखर किरणं अंगाची काहिली करत आहेत आणि म्हणून यावर उतारा देण्यासाठी गल्लोगल्ली टपाटप लिंबू सरबत,ज्यूस,ताक, लस्सी,सोडापब ची दुकानं उभी राहिलीत आणि त्यांच्या समोरची गर्दी ही शीतपेयं पटापट रिचवू लागलीय. पण इथेच खरा घात होतो. हे असे गारेगार उपचारच उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात त्यामुळे त्यांचा वापर हा मर्यादितच हवा.
               कर्कवृत्तावर असलेल्या आपल्या संपूर्ण भारतात उन्हाळा अंमळ कडकच असतो. उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरूप पडत असल्याने अधिक प्रखर असतात. त्यात आपण प्रगतीच्या नावाखाली केलेल्या विकास(??)कामांनी  वाढवलेले ग्रीन हाऊस इफेक्ट्स या तीव्रतेत अधिकच भर घालतात. या अतिउष्णतेमुळे वातावरण आणि जमीन उष्ण,रुक्ष बनते. यामुळे या काळात शरीरामध्ये वातदोषाचा नैसर्गिक संचय आणि कफ दोषाचे नैसर्गिक शमन होते. यामुळे शरीराची रुक्षता वाढते.शरीरबल, पचनशक्ती आणि जाठराग्नि मंद होतात.
                   अशा वेळी शीतोपचार मर्यादा पाळून करायला हवेत. म्हणजे बाह्योपचार शीत असावेत पण आभ्यंतर उपचार करताना या गारव्याचा मारा नको. बाह्योपचार म्हणजे आंघोळीसाठी कोमट किंवा साधे नळाचे पाणी वापरावे.आंघोळीनंतर शरीराला चंदनाचा लेप किंवा चंदनाचे वस्त्रगाळ चूर्ण लावावे(म्हणजे नेहमीच्या टाल्कम पावडरऐवजी चंदनाचे चूर्ण वापरता येईल.),मोगरा-जाई-जुई सारख्या सुगंधी फुलांच्या सहवासात राहावे.सध्याच्या काळात कोणी गजरे माळत नाही पण फुले फक्त सौंदर्यासाठी महत्वाची नाहीत तर चंदन,मोगरा,जाई-जुई या शीतवीर्यात्मक वनस्पती आहेत. त्यांचा सहवास बाह्य वा आभ्यंतर वापर पित्तशामक असतो. तसेच त्यांचा सुगंध मनाला आल्हाददायक असतो.(ही एक प्रकारची Aroma therapy म्हणा ना). याखेरीज घरात,ऑफिसेस मध्ये वावरणाऱ्या व्यक्तींसाठी पंखा, वातानुकूलन यंत्र आणि कूलर यामध्ये दमट हवामानात वातानुकूलन यंत्र आणि कोरड्या हवामानासाठी आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करणारा (temperature and humidity control) कूलर हितकर. पण यामुळे बाहेरच्या आणि आतल्या तापमानात जास्त फरक असू नये. कारण बाहेर नागपूर आणि आत महाबळेश्वर असेल तर एवढा तीव्र तापमानातील फरक उलट त्रासदायकच ठरेल. तसेच गार हवेचा झोत,पंख्याचा वारा थेट अंगावर येणार नाही याची ही काळजी घ्यावी.कारण यामुळे शरीरातील रुक्षतेला आणि पर्यायाने संचित वात दोषाला बळ मिळतं आणि पुढे वातप्रकोप काळात म्हणजेच वर्षा ऋतूत एखादा वात विकार होण्याची शक्यता बळावते. या काळात उन्हात फिरणे अनावश्यक असल्यास टाळावे.मात्र ज्यांची नोकरी, व्यवसाय फिरतीचा आहे त्यांना हे जमत नसल्यास त्यांनी किमान संपूर्ण अंग झाकून घेणारा हलका,सुती पेहराव, स्कार्फ,टोपी, गॉगल,छत्री अशा साधनांचा वापर करावा,बरोबर सामान्य तापमानाचे पाणी,मीठ,साखर बरोबर ठेवावे.
                 ही झाली बाह्योपचारांची गोष्ट आता आभ्यंतर उपचार पाहू.आभ्यंतर उपचारामध्ये मात्र हे कृत्रिम शैत्य वापरण्यास अगदी मज्जाव आहे कारण बर्फाळलेले,फ्रिजमधले "थंडग्गार" पाणी मनाला जसे थंड करते तसंच शरीरालाही थंड-सुस्त करते. मग आधीच उन्हामुळे त्रासलेल्या,पचनशक्ती मंदावलेल्या शरीराला हा कृत्रिम गारवा त्रस्त करून सोडतो. कारण पूर्वी नमूद केल्याप्रमाणे या काळात पचन आणि जाठराग्नी मंद झालेले असतात. आजकालच्या भाषेत सांगायचे झाले तर आधीच क्षीण झालेल्या अग्निला ही शीतपेय पुरतं झोपवून टाकतात. त्यामुळे ‘कित्ती गरम होतंय,चला बाटल्या भरून फ्रिजमध्ये ठेवू….आत्ताच गार पाणी हवंय म्हणून थेट फ्रीजरमध्येच ठेवू...दुकानातून ही भली थोरली chilled cold-drink ची बाटलीच आणू…’ असले कोणतेही अघोरी उपाय या काळात चालत नाहीत.
                 त्याऐवजी सामान्य तापमानाचे किंवा नैसर्गिकरित्या थंड झालेलं माठाचं पाणी,ज्यात पित्ताशमनासाठी वाळा/गुलाब यासारख्या वनस्पती घातल्या आहेत असं प्यायला,सरबत बनवायला वापरता येईल.तसंच शहाळ्याचे पाणी,डाळिंब-कलिंगड-अननस यांचे घरी बनवलेले आणि  न गाळलेले ज्युस , आवळा-लिंबू-कोकम-अननस-आंबा यांची सरबतं घ्यावी. दही-ताक यासारखे उन्हाळ्यासाठी सर्वांच्या पसंतीचे पदार्थ मात्र जपूनच वापरावे.कारण हे उष्ण गुणांचे पदार्थ आहेत.यापैकी ताक स्वभावाने उष्ण असले तरी पाचक आहे त्यामुळे मर्यादित प्रमाणात,धने-जीरे पूड घालून घेता येईल,मात्र दही उष्ण आणि पचायला जड आहे त्यामुळे त्याचा वापर टाळावा.
                 यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे ‘आंबा आणि आमरस’ वसंत-ग्रीष्मात आंब्याची मजा न चाखणे म्हणजे शिक्षाच म्हणा ना. त्यामुळे उन्हाळ्यात रसपुरीचा बेत होत नाही असे घर विरळाच. हा आंबा “हाणताना” जरा जपून, बरं का? म्हणजे असं की आंबा पचायला जड असतो त्यामुळे रसपुरी टाळावी.साध्या चपाती/पोळीशी आमरस खावा,तेसुद्धा पोळ्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा निम्मे ठेवून. स्थूल,मधुमेही व्यक्तींनी आंबा खाताना नेहमीच्या जेवणाऐवजी व पोटात थोडी जागा आणि भूक शिल्लक ठेवून आंब्याचा आस्वाद घ्यावा.इतर अन्नपदार्थांत काय खावे,काय खाऊ नये याची यादी लेखाच्या शेवटी देत आहे.
                 इतर दिनचर्येचं म्हणाल तर रात्री जागरण टाळावे,ज्यांच्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांनी पहाटे,सकाळच्या वेळेत अभ्यास करावा(पहाटेच्या वेळेत मेंदू शांत आणि ताजातवाना असतो.त्यामुळे अभयस चांगला होऊ शकतो.) ज्यांना सुट्ट्या आहेत त्यांनी "Binge watching" टाळावे. व्यायाम अगदी हलक्या स्वरूपाचा असावा.पोहोण्याचा व्यायाम केल्यास जिममध्ये जाऊ नये.वृद्ध,लहान मुले, सुकुमार(नाजूक व्यक्ती) आणि आजारी व्यक्तींनी तर व्यायाम करूच नये. या काळात रतिक्रीडा १५ दिवसांतून एकदाच करावी असा शास्त्र निर्देश आहे. दुपारची झोप याकाळात चालते. पण ती प्रमाणात (साधारण ३० ते ४५ मि. ) असावी. अशा प्रकारे उन्हाळा आणि त्याचे उपाय समजून घेऊन आचरण ठेवले तर उन्हाळा सुसह्य  होईलच पण उन्हाळ्याचे आजारही आटोक्यात येतील.

टीप -
१. तरीही आईस क्रीम खाणाऱ्यांसाठी खास सूचना. सध्या आईस क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट मध्ये नक्की कशासाठी युद्ध सुरु आहे आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे खालील लिंक वर जाणून घ्या.

२. आंब्याचे गुणधर्म खालील लिंक वर वाचा.

३.पथ्य-अपथ्यकारक पदार्थ

  पदार्थ

                पथ्य

            अपथ्य

तृणधान्य

गहू,तांदूळ,ज्वारी

मका,बाजरी,नाचणी

डाळी

मूग,मसूर

चणा,तूर, उडीद मर्यादित खावे.

कडधान्य

मूग,मटकी,मसूर

वाल, वाटणे, हरभरे, कुळीथ,राजमा,छोले

फळभाज्या-शेंगा 

पडवळ,दोडकी,शिराळे,रताळे, सुरण, दुधी भोपळा, लाल भोपळा,वांगी, फरसबी ,शेवगा 

कारली, गवार, नवलकोल, कॉलीफ्लॉवर, कोबी , सिमला मिरची 

पालेभाज्या

पालक, शेवगा, तांदूळजा, लालमाठ, 

मेथी,शेपू




फळे

आवळे,द्राक्षे(बी असलेली),डाळिंब,आंबा,कैरी,केळी, संत्री,मोसंबी,काकडी,कोकम,लिंबू, ऊस,शहाळे,नारळ,खरबूज,कोहळा,कलिंगड,खजूर,मनुका




फणस,जांभूळ,कवठ,काजू

दूध व दुधाचे पदार्थ

दूध,तूप,लोणी

ताक(मर्यादित प्रमाणात ), दही, कढी

मांस वर्ग

शेळी,कोंबडा,बदक 

सुके मांस, मासे, पोर्क

मसाले

लवंग,वेलची,धणे,जीरे, दालचिनी, लाल तिखट.

हिंग,ओवा,लसूण, हिरवी मिरची, मोहरी 




Monday, 17 April 2017

देह देवाचे मंदिर - भाग २


             दिनचर्या या विषयावरील दोन भागांच्या दीर्घ लेखाचा हा दुसरा आणि अंतिम भाग आहे.मागील लेखात आपण उत्थान(उठण्याची वेळ),शौच,दंतधावन, अंजन, नस्य,गंडूष ,स्नेहाभ्यंग, व्यायाम, स्नान,ध्यान आदि दिनक्रियाविशेषांचा विचार केला. या लेखात दिवसभराचा आहार,शतपावली,निद्रा यांबद्दल जाणून घेऊ.

आहार - व्यवसाय-चरितार्थाचे काम करताना आवश्यक असा दिनाक्रमाचा भाग म्हणजे आहार. शरीर आणि मनाचे पोषण, स्वास्थ्य यासाठी आहार चांगला असणे आणि तो वेळेवर घेणे गरजेचे आहे. चांगला आहार हा प्रमाण आणि गुणात्मक पुरेसा हवा. तो कसा ते आपण पाहू. आयुर्वेदात म्हटले आहे की
‘याममध्ये न भोक्तव्यं , यामयुग्मं न लङघयेत् ।
याममध्ये रसोद्वेगो युग्मेऽतीते बलक्षयः॥
म्हणजेच काहीही खाल्ल्यानंतर किमान तीन तास काही खाऊ नये परंतु कमाल सहा तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहू नये. पण  यामध्येही अजून सूक्ष्म विचार सांगितला आहे,बरं का. आधी घेतलेले जेवण पचले असेल तरच पुन्हा आहार घ्यावा नाहीतर लंघन करावे. यावरून आपल्या लक्षात येईल की वजन वाढवणे किंवा कमी करणे यासाठी दर दोन तासांनी खात राहणे किंवा “Diet”च्या नावाखाली कडक उपवास करणे हे दोन्ही टोकाचे उपाय चुकीचे आहेत. वजन वाढणे किंवा कमी होणे हे शरीरातील इतर अवयवसंस्थांवरही परिणाम करते त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानेच वजन कमी करावे. आहार-पचन व त्याचा वजनाशी असलेला संबंध यावर सविस्तर बोलायचे झाले तर तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल त्यामुळे आता आपण रोजच्या आहाराविषयी पाहू,
                     न्याहारी - सकाळच्या वेळेत प्रातर्विधी झाल्यानंतर हलका नाश्ता (चहा-कॉफी नाही) घ्यावा. यात दूध,आंबील, भुकेनुसार थोडा आणि ठराविक सुका मेवा घेता येईल. यामुळे रात्रीची भूक कमी होईल आणि व्यायाम करताना पोटाला जडपणा जाणवणार नाही. यानंतर ज्यांचे दुपारचे जेवण उशीरा होते अशांनी पोटभर न्याहारी करावी
  • न्याहारीची वेळ साधारण सकाळी ८.३० ते ९.३०ची असावी.
  • न्याहारीचे पदार्थ पोटभरीचे, मात्र तडस निर्माण करणारे नसावे.
  • दिवसाची सुरुवात आईस क्रीम, चॉकोलेट,मिठाई यासारखे अतिगोड किंवा समोसे, ढोकळा यासारखे अति तिखट,तेलकट किंवा तळलेले नसावे.
  • न्याहारी करताना घरी शिजवलेल्या पदार्थांचाच आग्रह मी धरते.
  • न्याहारीचे पदार्थ - न्याहारी म्हटले की बऱ्याच घरांमध्ये दिवसाची सुरुवात म्हणजे कॉर्नफ्लेक्स, मुसेली, ब्रेड-बटर, च्यवनप्राश(??? एक मोठ्ठा चमचा हो..) आणि त्याबरोबर उंच मग भरुन चहा-कॉफी किंवा मग उंच ग्लास भरुन दूध अथवा ज्यूस (It's healthy,u know?) अशी होत आहे. पण खरंच हा असा नाश्ता गरजेचा असतो का? तर नाही.
  • नाश्त्यासाठी सहज पचणारे,हलके,पोटभरीचे पदार्थ हवेत.
  • आपले पारंपरिक पदार्थ या सर्व निकषांत अगदी उत्तम बसतात.त्यामुळे या पदार्थांचा जरूर विचार करावा.
  • पोहे, सांजा,शिरा,लापशी,दलिया उपमा,शेवया उपमा हे सर्व पदार्थ out dated, बोअरिंग नसून आवश्यक आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.
          दुपारचे जेवण- दुपारचे जेवण दुपारी ११ ते ०१ या काळात असावे.म्हणजेच सकाळी लवकर घराबाहेर पडणाऱ्यांनी ११ वाजता जेवण घेतले पाहिजे.
  • हा काळ पित्त दोष प्राबल्याचा असतो त्यामुळे पचन सुधारते.
  • मग संध्याकाळी आवश्यकता वाटली तर पचायला हलके पदार्थ ,दूध, लाडू,चिक्की खाता येईल.

                    संध्याकाळचे जेवण -  आता संध्याकाळच्या जेवणासाठी मी जी वेळ सांगणार आहे ती ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावतील,
  • कारण संध्याकाळच्या जेवणाची आदर्श वेळ आहे ०६.३० ते ०८.३० (म्हणजेच ०८.३०वाजण्याच्या आत जेवण झालेच पाहिजे). यामागचे कारण असे की सूर्यास्तानंतर आपल्या शरीराचे व्यापार हळूहळू मंदावू लागतात. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपापला दिनक्रम लक्षात घेऊन जेवणाची वेळ लवकर कशी करता येईल त्याकडे लक्ष द्यावे.
  • रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाच्या अर्ध्या प्रमाणात असावे.

                 शतपावली - जेवणानंतर काही लोक शतपावली घालतात तर बऱ्याच जणांचा Night Walk तर काही जणांचा Dessert walk/Chaat walk सुद्धा होतो. पण शतपावली घालण्यामागचे शास्त्र असे आहे की जमिनीवर मांडी घालून जेवताना पायाकडे कमी झालेला रक्तपुरवठा पूर्ववत व्हावा. हल्ली किती जण जमिनीवर मांडी घालून बसतात हो? टेबल-खुर्ची वर बसणाऱ्यांचे पाय लोंबकळत/उभे असतात त्यामुळं त्यांनी थोडा वेळ घरात चालणे किंवा पायाचे हलके व्यायाम करणे जास्त संयुक्तिक होईल.

                  निद्रा - हा मनुष्याच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग (स्तंभच म्हणा ना, ज्यावर मानवी आयुष्याचे आरोग्य अवलंबून असते.)
  • रात्रीचे जेवण झाल्यानंतर साधारणतः २ ते ३ तासांनी झोपेची वेळ हवी. मात्र झोपेच्या आधी दूरचित्रवाणी(मराठीत टीव्ही),स्मार्टफोन,टॅबलेट या आणि यासारख्या इतर साधनांचा वापर टाळावा. मालिकांमधील नाट्य,पार्श्वसंगीत,तसेच स्क्रीनचा तेजस्वीपणा यामुळे मेंदू व चेतासंस्था उत्तेजित होतात.याउलट त्या क्षणी आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते.
  • झोप शरीराला अत्यावश्यक असते, व ती योग्य त्या प्रमाणात मिळाली तरच शरीर व्यापार उदा. उत्साह,संप्रेरकांचे,पाचक स्रावांचे स्रवण, भूक, मलमूत्रादि वेगांचे उत्सर्जन व्यवस्थित होते.
  • किती - रोज साधारण ६-८ तास झोप आवश्यक आहे,मात्र ८ तास झोपायचे म्हणून रात्री १-२ वाजता झोपून सकाळी ८-१० वाजता उठणे चुकीचेच आहे.
  • नाईलाजाने जागरण झाल्यास किंवा रात्रपाळी करणाऱ्यांनी रात्री जेवढी झोप कमी पडते त्याच्या निम्मीच झोप दिवसा घ्यावी.
  • दिवसा झोप फक्त ग्रीष्म ऋतूतच घ्यावी,तीसुद्धा उपरोक्त सांगितल्याप्रमाणे मर्यादित प्रमाणात. एरवी लहान मुले,आजारी माणसे यांनाच दिवसा झोप घेणे शास्त्र संमत आहे.
  • अवेळी झोपणं, रात्री जागरण करणे, दुपारी झोपणे, या मुळे अनेक आजार उत्पन्न होतात.
  • अकाल शयन - अवेळी झोपल्यामुळे मोह, ताप, डोकं दुखणे, शरीर जखड्ल्या सारखे वाटणे,अपचन,अम्लपित्त, वारंवार सर्दी, डोकेदुखी, दिवसभर आळस येणे, भूक मंदावणे यासारखे आजार होतात. आणि यातल्या बऱ्याच आजारांचे मूळ कारण चुकीची झोप आहे हे आपल्याला जाणवतही नाही.
  • त्यामुळे शांत व सलग झोप लागावी यासाठी शयनगृहातील दिवे मंद असावेत. रात्री खोलीत संपूर्ण काळोख असावा. बाहेरून येणारा उजेड टाळण्यासाठी जाड पडदे वापरावे.
  • शांत झोप लागावी यासाठी पावलांना गायीचे तूप लावून काशाच्या वाटीने मालिश करावे.पादाभ्यंग केल्याने दृष्टी सुधारते व झोप शांत लागते.
अशा प्रकारे पहाटे उठाण्यापासून रात्री झोपेपर्यंत दिनचर्या एका ठराविक क्रमाने सांगितली आहे. दोषांच्या प्राबल्यानुसार आपण आपला दिनक्रम कसा पार पाडावा हे त्यात सांगितले आहे. स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य दीर्घकाळ टिकून राहावे यासाठी केलेली ती योजना आहे. म्हणूनच या लेखांना ‘देह देवाचे मंदीर’ हे शीर्षक  हेतूतः दिले आहे. जीवात्मा हा परमात्म्याचा अंश मानला आहे.  मग त्याचे अधिष्ठान म्हणजे आपले शरीर हेसुद्धा मंदिराप्रमाणेच शुद्ध स्वच्छ हवे,त्याची निगा राखायला हवी.यासाठीच हे सर्व आपणा सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून केलेला हा लेखनाचा प्रयास.
अशा प्रकारे आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले ‘दिनचर्या’आख्यान सफळ-संपूर्ण झाले.
देह देवाचे मंदिर लेखमालेचा प्रथम भाग खालील लिंकवर उपलब्ध आहे.

http://samanwayhealth.blogspot.in/2017/03/blog-post.html?m=1



टीप - हा लेख लिहिताना पुढील व्यक्तींचे सहाय्य लाभले त्याबाबत मी त्यांची ऋणी आहे.

१. वैद्य श्रेया चुरी.(BAMS, मित्तल आयुर्वेद महाविद्यालय)

(कृपया हे लेखन लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या नैतिक कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते.धन्यवाद. )