Friday, 4 September 2015

दातांची निगा ( Dental Care )








दातांची निगा ( Dental Care )

…..   अर्थातच आयुर्वेदानुसार 




          ती  - क्या आपके टूथपेस्ट में चारकोल,नमक , निम्बू, लौंग , बबूल है???? 
मी - नाही , पण आम्ही दंत मंजन वापरतो , त्यात हे सगळे आहेच. 
ती - किती आउट डेटेड ,  colurfull toothpaste is soooo coool


                         हल्ली सगळीकडे थोड्याफार फरकाने असेच संवाद ऐकायला मिळतात . ( क्लिनिकमध्ये तर फारच ) . हल्ली सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या गोड - गोड टूथपेस्ट  "IN" झाल्या आहेत . आणि त्यांच्या या गोड चवीमुळे बरीचशी जनता पेपर वाचत / TV  बघत तोंडातला ब्रश चावत असते . लहान मुलांची तर वेगळीच कथा , त्यांच्यासाठी खास   कार्टून्सच्या , रंगीबेरंगी , गोड टूथपेस्ट आल्या आहेत . परत त्या Floride Free सुद्धा आहेत . त्यामुळे ब्रश करताना दात साफ होण्यापेक्षा पेस्ट खाणेच जास्त होते . 
                           आयुर्वेदानुसार मधुर (गोड) चव हि तोंडाला चिकटा  आणणारी असते . (मधुरं  रसं  वक्त्रमनुलिम्पति  । ) मग तोंडाला चिकटा  आणणाऱ्या रसाची ही गोड  टूथपेस्ट आपले तोंड कसे बरे नीट स्वच्छ करेल? 
                            आता तुम्ही विचाराल, मग करायचे तरी काय? डॉक्टर 'तुमच्या'  (हासुद्धा पेशंटच्या डिक्शनरीमधला खास शब्द ) आयुर्वेदाने तरी याबद्दल काही सांगितले आहे का?
                            तर हो , आयुर्वेदात 'दंतधावन विधी ' सांगितला आहे. 
दंतधावन काष्ठ (टूथब्रश) बनवण्यासाठी खैर , करंज,निंब,वड ,अर्जुन,मधुक  यापैकी झाडाची कोवळी फांदी ( साधारण १२ अंगुळे लांब व करंगळी एवढी जाड अशी ) घेऊन एका टोकाला चावून मऊ  भाग तयार करावा आणि या ब्रशने दात,हिरड्या व जीभ घासावी.  ही  कोवळी काडी चावल्यामुळे दात -हिरड्यांना व्यायाम होतो. नंतर दात घासल्यामुळे जीभ न हिरड्या स्वच्छ होतात, तोंडाचा चिकटपणा - किटण कमी होतो. त्यानंतर जीभ साफ करावी. यासाठी तांब्याचा जिव्हानिर्लेखक ( Tongue  Cleaner ) वापरावा. जीभ नियमित साफ केल्यामुळे जिभेच्या मुळाशी असलेला कफ निघतो आणि मुखदुर्गंधी दूर होते. 
                             गंडूष /कवल (Gargling) - त्यानंतर व्यक्तीच्या प्रकृतीनुसार औषधी काढ्यांच्या गुळण्या कराव्यात किंवा काढे तोंडात धरावे. यामुळे जबड्याच्या हाडांना बळकटी येते. स्वर सुधातो, ओठ फुटत नाहीत तसेच सध्याचा Popular त्रास म्हणजे Sensetiveness of  teeth ( दात शिवशिवणे / दाँतों की झुनझुनाहट ) खूप कमी होते. ( सध्या यासाठी सुद्धा महागड्या टूथपेस्ट्स  prescribe केल्या जातात. )
                             आता तरीही कोणी विचारेल कि हे  सगळे कसे काय करायचे तर हे लक्षात घ्या कि एवढे  सगळे फायदे मिळणार असतील तर तर असे करण्यात काय हरकत आहे ? आणि नेहमीएवढाच किंवा कदाचित थोडासाच जास्त वेळ यासाठी लागेल . तरीही कोणाला अगदीच जमत नसेल तर त्यांनी किमान दंतमंजन वापरावे.फ़क्त हे दंतमंजन अगदी बारीक चूर्ण आहे याची खात्री करून घ्या. म्हणजे Dental  Enamel खराब होणार नाही. 
                            तसेच टाळू,ओठ,जिभेचे रोग झाले असतील किंवा तोंड आले असेल तर दंतधावन वापरू नये (म्हणजेच ब्रशने दात घासू नये. ) तर  अशा वेळी बोटाने हळू दंतमंजन चोळावे आणि औषधी गुळण्या कराव्यात. 
                            तर असे हे दंत आख्यान सफल संपूर्ण झाले . आता तुम्ही हे उपाय जरूर करून बघा आणि मला नक्की कळवा. 

Sunday, 16 August 2015

A Date or Two

A Date or Two





                       A  Date  or  Two  नावाचा धडा, आपल्याला  शाळेत असताना इंग्रजीच्या पुस्तकात होता . त्यात खजूराचे गुणधर्म आणि आहारातील उपयोग याबद्दल सांगितले होते . आज तोच धडा मी आयुर्वेदिक दृष्टीकोनातून पुढे नेणार आहे . 
                       खजूर (मराठी/हिंदी )    खर्जूर (संस्कृत )     Dates (इंग्रजी ) 
                       Phoenix  dactylifera ( Latin)



मधुरं बृहणं वृष्यं खर्जुरं गुरु शीतलम ।
क्षये sभिघाते दाहे च वातपित्ते च तद्हितम  ।।
                       रस - मधुर  वीर्य - शीत  विपाक - मधुर 

खजूर हे मधुर रसाचे , बृहण ,वीर्यवर्धक ,गुरु (पचायला जड ) , शीत आहे . क्षय , मार लागल्यामुळे झालेल्या जखमा , दाह तसेच वात-पित्त विकारांमध्ये  उपयोगी आहे . 

Nutritional  Values :


        Principle                  Nutrient Value           Percentage of RDA


   Energy                          277 Kcal                               14%
 Carbohydrates                  74.97 g                                58%
 Total Fat                          0.15 g                                  <1%
  Protein                            1.81g                                   3%
 Cholesterol                       0 mg                                    0%
 Dietary Fiber                     6.7 g                                   18%

Vitamins

Folates                              15 µg                                   4%
Niacin                               1.610 mg                             10%
Pantothenic acid                 0.805 mg                             16%
Pyridoxine                          0.249 mg                             19%
Riboflavin                          0.060 mg                              4.5%
Thiamin                            0.050 mg                              4%
Vitamin A                         149 IU                                   5%

Electrolytes

Sodium                            1 mg
Potassium                        696 mg                                 16%


                        
Minerals 

Calcium                          64 mg                                 6.5%
Copper                           0.362 mg                            40%
Iron                               0.90 mg                             
Magnesium                     54 mg 





थोडक्यात काय तर खजूर हे एक Power House म्हणता येईल . 
  1. खजूर बृहण  करत असल्यामुळे क्षय म्हणजेच , झीज होत असेल (अतिश्रमामुळे, रस-रक्तादि धातू क्षीण असल्याने ) तर खजूर लाभदायी ठरतो . 
  2. खजूर श्रमहर आहे त्यामुळे थकवा आला असता , बराच काळ कुपोषण होत असेल तर खजूर उत्तम . (त्यामुळे प्रवासात,trecking -hiking करताना, श्रमाचे काम करताना जवळ खजूर असावेत .)
  3. दम,खोकला किंवा T.B . च्या रुग्णांना थोडा थोडा खजूर द्यावा . 
  4. फायबर चे प्रमाण अधिक असल्याने मलावरोध (Constipation ) होत असेल तर खजूर जरूर खावेत . 
  5. खजुरामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्ताल्पता (Anaemia ) असल्यास आहारात खजूर असावेत . 
  6. शुक्रधातु  वाढविण्यासाठी खजूर लोणी व दुधाबरोबर घ्यावा . ( स्त्री व पुरुष दोघांनीही )
  7. तापामध्ये अशक्तपणा जाणवत असेल तर ताकद येण्यासाठी खजूर द्यावा . 
  8. लहान बाळांना  खारीक/खजूर  दुधात उगाळून द्यावा . साप्तधातुच्या पोषणासाठी लाभदायक ठरते 
  9. १ ते १० वर्षापर्यंत मुलांना साधारण पचनशक्ती प्रमाणे रोज सकाळी अर्धी किवा एक खारीक अथवा खजूर द्यावे . 
  10. बृहण  , तर्पण, रसादि  धातुवर्धक असल्यामुळे  बाळंतिणीस खजूर द्यावा,  
  11. वजन कमी करण्याची इच्छा  असलेल्या  व्यक्तींनी तसेच Diabetes असलेल्या व्यक्तींनी खजूर नियंत्रित प्रमाणात खावा . 
  12. सध्या पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातसुद्धा Lactose Intolerence च्या केसेस दिसून येत आहेत . दुधातील Lactose शर्करेची Allergy असल्याने , दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने  हा त्रास होतो . अशा वेळी सप्त धातुवर्धन आणि शरीर पोषणासाठी खजूर खूपच उपयोगी आहे . 
टीप 
  •  खजूर लाडू रेसिपी -  खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.
               नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत. 
  • स्वतःच्या आवडीनुसार मिश्रण केले तरी चालेल . यासाठी येथे प्रमाण मुद्धामच दिलेले नाही . 
  • ह्याच साहित्याच्या वड्या  किंवा रोल सुद्धा करू शकता . 
  • मोठ्यांना आणि मुलांना डब्यात मधल्या वेळेचे खाणे म्हणून Snack bar / protein bars देण्याऐवजी हे लाडू अधिक फायदेशीर ठरतील . 

Thursday, 16 July 2015

स्वास्थ्यवेद - पावसाळ्यातील पदार्थ ( २ ) - मांसरस


मांसरस 


मांसरस म्हणजे अगदी  सोप्या भाषेत सांगायचे तर मांसापासून बनवलेले अर्थात  Meat soup . 
(अहो असे दचकू नका … हो  हो .. आयुर्वेदातसुद्धा  मांसाहाराचा  चिकित्सेसाठी उल्लेख  आहे  हो )
या मांसरसाचे ३ प्रकार आहेत . 
  •     घन      -  १भाग मांस तर २ भाग पाणी ( १:२ )
  • मध्यम     -  १भाग मांस तर ३ भाग पाणी ( १:३ )
  •    तनु        -  १ भाग मांस तर ४ भाग पाणी ( १:४ )
म्हणजेच पाणी आणि मांस यांच्या प्रमाणानुसार हे प्रकार आहेत. पाण्याच्या प्रमाणानुसार अर्थात जितका पातळ मांसरस तितका पचायला अधिक सोपा असतो. सध्याच्या भाषेत सांगायचे तर मांसरस हा Clear  Soup  चा  प्रकार आहे.



साहित्य 

मांस       - १ भाग ( हे मांस सामान्यतः कोंबडी अथवा बकरीचे व हाडांसहित घ्यावे)
पाणी      -  २/३/४ पट 
हळद 
आले - लसूण वाटण 
जिरेपूड 
मिरेपूड 
सुंठ पूड 
पिंपळी चूर्ण 
हिंग 
मीठ 

तूप


कृती 


  1. मांसाला हळद आले-लसूण वाटण लावून १/२ तास ठेवावे . 
  2. कुकर मध्ये आवश्यक त्या प्रमाणात , म्हणजेच २/३/४ पट  पाणी , मांस घेऊन पूर्ण शिजेपर्यंत ( हाडे मऊ  होऊन आतील मज्जाभाग पाण्यात विरघळेपर्यंत ) शिजवावे . 
  3. शिजल्यावर त्यातील पाणी व मांस वेगळे करून घ्यावेत . (अकृत मांसरस )
  4. भांड्यात तूप गरम करून त्यात लसून पाकळी ठेचून हिंग घालून फोडणी करावी . 
  5. मांसरस त्यामध्ये घालून जिरेपूड मिरेपूड सुंठ पिंपळी याचे चूर्ण घालावे  आणि उकळी येऊ द्यावी . 
  6. चवीपुरते मीठ घालावे . 
मांसरस तयार आहे . 


टीप 

  1. वरील कृतीपैकी तिसऱ्या  पायरीपर्यंत तयार केल्यास त्याला 'अकृत मांसरस' (फोडणी न देता) म्हणतात . हा असाच पिता येतो व तुलनेने पचायला हलका असतो . 
  2. ५-६ पायरी पर्यंत तयार केल्यास त्याला 'कृत मांसरस' म्हणतात 
  3. हाच मांसरस  आधी मांसाचे  तुकडे तूप - हिंग, जिरे, मिरे आदि  मसाल्यावर भाजून घेऊन  मग पाणी  घालून सुद्धा बनवता येतो . 
  4. चार पट  पाणी घालून बनवताना जर मांसरस खूप पातळ वाटत असेल तर मांसासकट  उकळी काढून आटवून दाट करावा . 
  5. वेसवार - यामध्ये बोनलेस मांस वापरून १ ते ३ पायऱ्या  कराव्यात व नंतर हे मांस मिक्सर मध्ये वाटून ४-५ कृती करावी . 
गुण 
            मांसरस हा वात-पित्तनाशक , बलदायी,थकवा दूर करणारा , तृप्ती देणारा, शुक्र धातुला वाढविणारा आहे . त्यामुळे उरःक्षत  , तापातून उठेलेले रोगी,fracture - dislocations चा त्रास असल्यास, जुनाट तापामध्ये शक्ती येण्यासाठी, पचनशक्ती कमी झाली असेल तर, थकवा आला असेल तर,विस्मरणाचा त्रास होत असेल तर मांसरस आहारात वापरावा . 
            तसेच वेसवारसुद्धा मांसरसाप्रमाणेच असतो, पण मांसाचा वापर असल्याने पचायला अधिक जड पण बलदायी,स्निग्ध, वातरोगनाशक  असतो.



Wednesday, 1 July 2015

स्वास्थ्यवेद - पावसाळ्यातील पदार्थ १ - कुळीथाचे कढण

   कुळीथाचे कढण / कळण 
आयुर्वेदोक्त नाव ( कुलत्थ यूष )


साहित्य 

कुळीथ          -    १/४ वाटी 
पाणी             -    ४ वाट्या
फोडणीसाठी  साहित्य 
तूप                    -   २ चमचे 
लसूण  पाकळी   -    १ 
हिंग 
जिरे 
मीठ  (चवीनुसार)

कृती 

  1. कुळीथ आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कुकरला ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवावे 
  2. यातील शिजलेले कुळीथ वेगळे काढून पाणी कढण बनवण्यासाठी वापरावे 
  3. तूप,जिरे,हिंग, व लसूण यांची फोडणी या पाण्याला द्यावी. 
  4. चवीनुसार मीठ घालावे. 
  5. आवडत असल्यास फोडणीत कढीपत्ता घालू शकतो.
कुळीथाचे कढण तयार आहे.


टीप 
  1. हे कढण  करताना  त्या पाण्यात शिजलेले कुळीथ घोटून घातले व तिखट-हळद ,गोडा  मसाला, गूळ , नारळ घालून कुळीथाचे सार करता येईल . हे सार  भाताबरोबर खाण्यास छान लागते . 
  2. आयुर्वेदिक गुण - हे कढण  कफ-वात शामक ,उष्ण गुणाचे आणि पित्तकारक असते. वातव्याधी ,आमवात ,किडनी स्टोन या सारख्या आजारात तसेच वजन कमी करणाऱ्या माणसांसाठी आहाराचा भाग म्हणून  हे कढण वापरता येते . 
  3. मात्र गर्भिणी , क्षयरोगी ,  आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कुळीथ टाळावे . 

स्वास्थ्यवेद -

स्वास्थ्यवेद 

 आज जागतिक डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने एका अल्पशा विश्रांतीनंतर समन्वय  पुन्हा आपल्या  भेटीला येत आहे. यामध्ये नेहमीच्या लेख मालिके बरोबरच ' स्वास्थ्यवेद ' हि संकल्पना घेऊन येत आहोत. या मध्ये आपण सहज-सोपे , "Healthy " तरीही चवीला रुचकर असे पदार्थ पाहणार आहोत . 
तुम्हाला या पाककृती आवडतील ही  आशा आहे

Tuesday, 30 December 2014

वेदना.............





                          सध्या रेडिओ , दूरचित्रवाणी , वृत्तपत्रे , सर्व माध्यमांतून सर्वाधिक भडिमार कशाचा होत असेल तर वेदनाशामक औषधे ( Painkillers ) विकणाऱ्या जाहिरातींचा.……
"अगं आई गं…. जोडो में दर्द?बदनदर्द?? डोके भणभणत… कंबर लचकली …. कान-नाक-गले का दर्द???? आणि अजून कुठे कुठे वेदना??? मग आमचे औषध वापरा, हमखास गुण येईल.  बेनामी चेहऱ्यांपासून लोकप्रिय कलाकार, क्रीडापटू सगळेजण ही औषधे विकण्याच्या शर्यतीत हिरीरीने भाग घेतात आणि या सर्व माध्यमबाजीला बळी पडून आपणही या गोष्टी आणत असतो.
                             जरा कुठे दुखले खुपले कि टाक हि गोळी तोंडात , मार तो स्प्रे ,चोळा तिथला बाम. पण कोणी कधी हा विचार केला आहे का कि या गोळीची घटक औषधे कोणती? हि औषधे कशी काम करतात? या औषधाच्या अतिसेवनाने किडनी,यकृतावर किती घातक दुष्परिणाम होऊ शकतात ?
                            या सगळ्याचा विचार करायचा झाला तर पहिल्यांदा वेदना म्हणजे काय?कशा होतात या वेदना? याचा विचार करावा लागेल. आपल्यापैकी प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना  कधी वेदना अनुभवलेल्या असतात मग त्या साध्या असोत किंवा अवघड जागेचे दुखणे किंवा मग "दिल का दर्द … "

International association for the study of Pain ही संस्था Pain ची व्याख्या करताना म्हणते की ,
Pain is defined as an unpleasant sensory or emotional experience associated with actual , potential tissue damage or described in terms of such damage.

तर  आयुर्वेद  शास्त्रात ,


वात -पित्त-कफादि दोषांनुसार वेदनेचे पुढील प्रकारसुद्धा वर्णन केले आहेत,


वातज वेदना -
  1. तोद - सुई  टोचल्याप्रमाणे होणाऱ्या  वेदना / Priking Pain 
  2. भेदन - फाटल्या /तुटल्या प्रमाणे होणारी वेदना / Stabbing Pain 
  3. ताडन - काठीने मारल्याप्रमाणे होणारी वेदना 
  4. छेदन - कापल्याप्रमाणे दुखणे 
  5. आयामन - खेचल्याप्रमाणे दुखणे / Stretching Pain 
  6. मंथन - Girding Pain 
  7. विक्षेपण - 
  8. चुमचुमायन -
  9. निर्दहन -
  10. अवभंजन -
  11. स्फोटन  -
  12. विदरण -
  13. उत्पाटन -
  14. कंपन 
  15. विश्लेषण 
  16. विकिरण 
  17. स्तंभन 
  18. पुरण 
  19. आकुंचन 
  20. अंकुशिका 
तसेच अकारण / पुन्हा पुन्हा होणाऱ्या वेदना / Vague pains या वात  दोषामुळे होतात. 

  1. ओष  - 
  2. चोष 
  3. परिदाह -
  4. धुमायन -
या पित्तज वेदना आहेत. 

तर 
  1. कंडू -
  2. गुरुत्व -
  3. सुप्तता -
  4. उपदेह -
  5. स्तब्धता - 
  6. शैत्य - 
या वेदना कफामुळे होतात. 

वेदना शमनार्थ  केले जाणारे उपाय :


  •  स्नेहन - सर्वांगाला औषधी तेलाने मसाज करून तेल अंगात जिरवणे म्हणजे स्नेहन  होय. या मध्ये आजारानुसार तेल व स्नेहानाची पद्धत कोणती वापरायची ते ठरते. 
                          यामध्ये सर्वांग-एकांग स्नेहन ,अवगाह,तैलधारा ,शिरोधारा,जानूबस्ति ,कटिबस्ति ,मन्याबस्ति . नेत्रतर्पण, कर्णपूरण अशा विविध प्रकारांनी  अंगदुखी,सांधेदुखी,मान-कंबरेचे दुखणे,डोकेदुखी,निद्राविकार,डोळ्यांचे तसेच कानाचे आजार  आदि दुखण्यावर उपचार केले जातात. 

  • स्वेदन - म्हणजे शरीराला शेक देणे, यासाठी औषधी काढे , किंवा कोरडा शेक वापरला जातो. बऱ्याचदा स्नेहनानंतर स्वेदन क्रिया केली जाते. किंवा पिंडस्वेद पद्धती सारखे स्नेह-स्वेद एकत्र केले जाणारे उपचार ही  असतात,जे संपूर्ण अंगदुखी , पेशी-स्नायू वेदना यामध्ये अतिशय लाभदायी ठरतात. 
प्रामुख्याने स्नेहन-स्वेदना द्वारे वातज , वात - कफज वेदना बऱ्या  केल्या जातात. 
  • लेप - वेगवेगळ्या प्रकारचे धान्यलेप ,औषधी वनस्पतींचे लेप, चिकट लेप, यासारखे प्रकार औषधी वनस्पतीचे विशिष्ट लेप त्या  दुखऱ्या जागी लावण्यासाठी वापरतात. 
              याचा कालावधी आजारानुसार ३-७ दिवस असतो व याद्वारे आमवात,कंबरदुखी  यांचा प्रभावीरित्या उपचार केला जातो. 

  • बस्ति - बस्तिचिकित्सा शरीराच्या अभ्यंतर भागातील दुखण्याच्या उपचारासाठी  वापरली जाते. 
  • नस्य - म्हणजे दोन्ही नाकपुड्यामध्ये औषधांचे थेंब टाकणे. उर्ध्वजत्रुगत (मानेच्या वरच्या वेदनादायी विकारांत ) नस्योपचार वापरले  जातात. जसे की डोकेदुखी , नाकाचे हाड वाढणे,मान दुखणे. 

  •    रक्तमोक्षण - शरीरातील दूषित रक्त व त्याद्वारे होणाऱ्या वेदनांच्या उपचारासाठी रक्तमोक्षण
       लाभदायक आहे. हे रक्तमोक्षण जळवा किंवा विद्ध कर्म (venepuncture ) या शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात.
  • अग्निकर्म - एखाद्या प्रदेशी तीव्र तसेच असह्य वेदना होत असल्यास (Local  acute pain ) ते बरे करण्यासाठी अग्निकर्म हा उत्तम वेदनाशामक उपचार आहे. वेगवेगळे सांध्यांचे दुखणे,डोकेदुखी,मानेचे दुखणे,टाचदुखी ,पायाची भोवरी, अशा तीव्र आजारांमध्ये  अग्निकर्म केले जाते. 

अर्थात हे सर्व उपचार करताना त्या भागाची शारीर रचना आणि सखोल आयुर्वेदीय मर्मज्ञान या विषयांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे उपचार तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावेत.
                                तसेच हे उपाय वेदनेच्या मूळावर घाव घालणारे असल्यामुळे दीर्घकाळासाठी आराम देणारे आणि गोळ्यांप्रमाणे यकृत तसेच किडनी वर साईड इफेक्ट्स  करणारे नसतात. त्यामुळे अशा बहुगुणी आयुर्वेदिक उपचारांचा वापर करायला काय हरकत आहे?

Friday, 3 October 2014

शरदाचे चांदणे की कडक उन्हाळा??

                           शरद ऋतू म्हटले की सगळ्यांच्या मनात पहिला विचार येतो तो कोजागिरी पौर्णिमेचा………  ते आटीव दूध , गारवा..  अहाहा…
                           पहिल्यांदा नवरात्र मग कोजागिरी या सगळ्यांचा अत्युच्च परमबिंदू म्हणजे दिवाळी.
हे म्हणजे अगदी, "ऋतू आहे मोठा… नाही सण-आनंदा तोटा…" अशी अवस्था होते या कालावधीत.सण-वार,पक्वान्ने, मिठाया,चमचमीत पदार्थ, फराळ ,फटाके,यांची अगदी रेलचेलच. त्यात आणखी यावर्षी तर एवढ्या सुट्ट्या जोडून आल्यामुळे सर्वांचेच बेतही ठरले असतीलच.
                          पण एवढे सगळे छान-छान चालले असताना सध्या हैराण व्हायला होतेय ते मात्र उन्हाने…. ज्याच्या-त्याच्या तोंडी एकच नाव 'October Heat' (छ्या बुवा, या वर्षी ऑक्टोबर हीट फारच जोरदार..) पण या उष्णतेचा मुकाबला करायचा तरी कसा??
                          यासाठी आपले भारतीय ऋतू- हवामान समजून घ्यायला हवे.भारतीय हवामान साधारणतः सहा ऋतुंमध्ये वर्गीकृत केले जाते. सध्या शरद ऋतू सुरु आहे. हा काळ घटस्थापना- अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक अमावास्येपर्यंत, दोन महिन्यांचा असतो. भाद्रपद महिन्याचा उत्तर काळ ते अश्विन महिना हा काळ उत्तर भारतात तर आश्विन आणि कार्तिक महिना म्हणजे साधारणतः २२ सप्टेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतात शरद ऋतूची लक्षणे दिसतात. या ऋतूत पाऊस संपून वातावरणामध्ये उष्णता वाढू लागते.
                     शारीर स्थिती - शरदामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे वात दोषाचे निसर्गतःच शमन होते तर उष्णतेमुळे पित्त दोष वाढतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्त प्रकोपाची स्थिती व लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पित्त तसेच रक्त दोषज विकार तसेच उष्णतेचे विकार या काळात दिसून येतात. शरदाच्या आधीचा ऋतू वर्षा (पावसाळा )या पावसाळ्यात शरीरबळ एकदम कमी असते त्यामुळे शरद ऋतुतही  शरीरबळ आणि पचन शक्ती हीन  स्वरुपाची असते.त्यामुळे कमी शरीर बल, मंदावलेली भूक आणि वाढलेले पित्त यांचा विचार करून दिनक्रम आणि आहार यामध्येही आवश्यक ते बदल करावे लागतात.
                                      नाहीतर शरीराच्या या नाजूक अवस्थेमुळे आपण आजारांना बळी पडू शकतो. म्हणून या काळात साथीचे /तापाचे आजार वाढलेले दिसतात
                       दिनचर्या - शरद ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी थंड-शीतल उपाय वापरायला हवेत. थांबा.. थांबा.. पण थंड म्हणजे A.C नाही हं वापरायचा. (A.C. मुळे येणारा कोरडेपणा,अतिथंड तापमान यामुळे त्रास अजूनच वाढेल), त्या ऐवजी वाळ्याचे पडदे वापरा (A.C. वापरायाचाच असेल तर तापमान २८ ते ३० डिग्री से. एवढेच ठेवा,जेणेकरून सामान्य शरीर तापमानाच्या समान तापमान असेल.), आंघोळीसाठी गरम पाणी न घेता कोमट  पाणी/साधे पाणी वाळा घालून वापरा. उष्णतेमुळे अंगाची काहिली होते तर कापूर , चंदन पावडर नेहमीच्या पावडर ऐवजी वापरा. दिवसा झोप घेणे टाळावे.
                       प्राणायाम करणाऱ्यानी कपालभाती, भस्रिका कमी प्रमाणात अथवा करू नये,त्याऐवजी अनुलोम-विलोम, सित्कारी, शीतली या प्रकारांचा अभ्यास करावा. कानामध्ये खोबरेल तेलात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावे. 
                      आहार - शरद ऋतू म्हणजे पित्त प्रकोप काळ. त्यामुळे पित्त दोषाच्या विरुद्ध गुणाचे - मधुर,कडू आणि तुरट चवीचे पदार्थ घेता येतील. दूध आणि तूप हे उत्तम पित्तघ्न आहेत. म्हणून जेवणात योग्य त्या प्रमाणात तुपाचा वापर करता येईल. पण हे तूप कच्चेच, वरण-भात-तूप अशा प्रकारे घ्यावे याउलट तळलेले -तेलकट पदार्थ त्रासदायक होतील. तेल-चरबीयुक्त पदार्थसुद्धा (उदा. चीझ,डालडा,मेयोनिझ,करडई,मोहरीचे तेल,मार्गारीन) कमीच घ्यावे. दही-ताक  घेऊ नये.चायनीज- शिळे पदार्थ खाऊ नयेत.तांदूळ,ज्वारी,बाजरी घ्यावी. कडू रसांचे पदार्थ सांगितले तरी गवार,मेथी,कारले,यासारख्या भाज्या टाळा. पालेभाज्या,दुधी,पडवळ,घोसाळे,दोडका खाण्यात असावा.डाळींब,द्राक्षे,मनुका,खारका,चिकू,सफरचंद खावीत. मासे,शेल फिश,सुके मांस खाऊ नयेत. लसूण, मिरची,गरम मसाला या ऐवजी लवंग,दालचिनी,धने-जिरे वापरावे. गरम पाणी,मद्य टाळावे.त्या ऐवजी माठाचे पाणी,वाळ्याचे पाणी, लिंबू सरबत,कोकम सरबत,आवळा सरबत,शहाळ्याचे पाणी प्या. अननस,स्ट्रोबेरी क्रश, आर्टीफ़िशिअल सरबते (रंग आणि प्रीझार्वेटीव्स घातलेली असल्याने - उदा. फ्रुटी,स्लाईस) टाळा. फ्रीज चे थंड पाणी,कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका(ती फक्त स्पर्शाला थंड असतात पण शरीराला अपायकारकच असतात.).दूध सांगितले असले तरीही मिल्कशेक्स मात्र घेऊ नयेत.




शारदीय विरेचन -

                         विरेचन ही आयुर्वेदीय पंचकर्मामधील शास्त्रीय परिभाषा आहे. पित्त दोष आणि पित्तज विकार यामध्ये प्रामुख्याने विरेचन प्रक्रियेचा वापर केला जातो. तसेच शरद ऋतूमध्ये पित्ताचा नैसर्गिक प्रकोप होत असल्यामुळे वाढलेल्या पित्ताचा निचरा करण्यासाठी या ऋतूमध्ये सामान्य व्यक्ती तसेच पित्त प्रकृती-पित्त विकार असलेल्या व्यक्ती शास्त्रोक्त-विधिवत विरेचन घेऊ शकतात.म्हणून या काळात शारदीय पंचकर्म विचार व प्रचार कार्यक्रमसुद्धा केला जातो.

कोजागिरी पौर्णिमा व विरेचन

                        कोजागिरी म्हणजे 'कोs  जागर्ति'. पूर्वी कोजागिरी म्हणजे गच्चीवर-अंगणात जागवलेली रात्र,गाण्याची मैफिल,आटीव मसाला दूध आणि गप्पांची मैफिल हीच आपली पूर्वकल्पना होती.पण सध्या मात्र कोजागिरी हा एक इवेन्ट होऊ लागलाय. Cause for a celebration!!!! आटीव मसाला दूधाऐवजी मिल्कशेक्स, कोल्ड ड्रिंक्स पासून पाव-भाजी,समोसे,बिर्याणी,भजी यासारखा उष्ण,तीक्ष्ण "पित्त खवळणारा"  मेनू कोजागिरी साठी 'हिट' मेनू होऊ लागलाय. गाणी आणि गप्पांची जागाही डी.ज़े. घेऊ पाहतोय.त्यामुळे रात्र उत्तर रात्रीपर्यंत जागवली जातेय आणि आणि अजून पित्त वाढवले जाते आहे.
                      पण कोणी कधी विचार केलाय का कि हा दिवस शरद पौर्णिमेचाच का बरे असतो?आणि आटीव दूधच का प्यायचे असते? कारण आधी सांगितल्याप्रमाणे या काळात पित्त दोषाचे प्राबल्य असते.मग हे उष्ण,तीक्ष्ण अग्निच्या गुणाचे पित्त कमी करायचे तर मधुर,शीत, सौम्य गुणाच्या दुधासारखे दुसरे औषध नाही. तसेच दूध हे उत्तम रेचक आहे. आणि पित्ताची चिकित्सा करण्यासाठी असे नैसर्गिक रेचन उत्तमच. आणि म्हणूनच आटीव मसाला दूध पिण्यासाठी रात्री सुखद हवेत जागायचे असते,चांदण्यात दूध आटवणे हा चान्द्रसंस्कार आहे.यासाठी पौर्णिमेचा दिवस. आणि आरोग्याचे विशेषण लावले तर लोक करणार नाहीत म्हणून देवादिकांचे कारण.
मग  असे हे आटीव दूध नंतर उत्तम रेचनाचे कार्य करत वाढलेले पित्त सहजी कमी करते,हे यामागचे शास्त्र आहे.
झाले, साधे-सोपे शारदीय विरेचन. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाची कास धरून सणाद्वारे आरोग्याचा ताळमेळ ठेवला, तो असा.
                      तर काय मग यावर्षीची कोजागिरी कशी साजरी करणार तुम्ही??