Thursday, 16 July 2015

स्वास्थ्यवेद - पावसाळ्यातील पदार्थ ( २ ) - मांसरस


मांसरस 


मांसरस म्हणजे अगदी  सोप्या भाषेत सांगायचे तर मांसापासून बनवलेले अर्थात  Meat soup . 
(अहो असे दचकू नका … हो  हो .. आयुर्वेदातसुद्धा  मांसाहाराचा  चिकित्सेसाठी उल्लेख  आहे  हो )
या मांसरसाचे ३ प्रकार आहेत . 
  •     घन      -  १भाग मांस तर २ भाग पाणी ( १:२ )
  • मध्यम     -  १भाग मांस तर ३ भाग पाणी ( १:३ )
  •    तनु        -  १ भाग मांस तर ४ भाग पाणी ( १:४ )
म्हणजेच पाणी आणि मांस यांच्या प्रमाणानुसार हे प्रकार आहेत. पाण्याच्या प्रमाणानुसार अर्थात जितका पातळ मांसरस तितका पचायला अधिक सोपा असतो. सध्याच्या भाषेत सांगायचे तर मांसरस हा Clear  Soup  चा  प्रकार आहे.



साहित्य 

मांस       - १ भाग ( हे मांस सामान्यतः कोंबडी अथवा बकरीचे व हाडांसहित घ्यावे)
पाणी      -  २/३/४ पट 
हळद 
आले - लसूण वाटण 
जिरेपूड 
मिरेपूड 
सुंठ पूड 
पिंपळी चूर्ण 
हिंग 
मीठ 

तूप


कृती 


  1. मांसाला हळद आले-लसूण वाटण लावून १/२ तास ठेवावे . 
  2. कुकर मध्ये आवश्यक त्या प्रमाणात , म्हणजेच २/३/४ पट  पाणी , मांस घेऊन पूर्ण शिजेपर्यंत ( हाडे मऊ  होऊन आतील मज्जाभाग पाण्यात विरघळेपर्यंत ) शिजवावे . 
  3. शिजल्यावर त्यातील पाणी व मांस वेगळे करून घ्यावेत . (अकृत मांसरस )
  4. भांड्यात तूप गरम करून त्यात लसून पाकळी ठेचून हिंग घालून फोडणी करावी . 
  5. मांसरस त्यामध्ये घालून जिरेपूड मिरेपूड सुंठ पिंपळी याचे चूर्ण घालावे  आणि उकळी येऊ द्यावी . 
  6. चवीपुरते मीठ घालावे . 
मांसरस तयार आहे . 


टीप 

  1. वरील कृतीपैकी तिसऱ्या  पायरीपर्यंत तयार केल्यास त्याला 'अकृत मांसरस' (फोडणी न देता) म्हणतात . हा असाच पिता येतो व तुलनेने पचायला हलका असतो . 
  2. ५-६ पायरी पर्यंत तयार केल्यास त्याला 'कृत मांसरस' म्हणतात 
  3. हाच मांसरस  आधी मांसाचे  तुकडे तूप - हिंग, जिरे, मिरे आदि  मसाल्यावर भाजून घेऊन  मग पाणी  घालून सुद्धा बनवता येतो . 
  4. चार पट  पाणी घालून बनवताना जर मांसरस खूप पातळ वाटत असेल तर मांसासकट  उकळी काढून आटवून दाट करावा . 
  5. वेसवार - यामध्ये बोनलेस मांस वापरून १ ते ३ पायऱ्या  कराव्यात व नंतर हे मांस मिक्सर मध्ये वाटून ४-५ कृती करावी . 
गुण 
            मांसरस हा वात-पित्तनाशक , बलदायी,थकवा दूर करणारा , तृप्ती देणारा, शुक्र धातुला वाढविणारा आहे . त्यामुळे उरःक्षत  , तापातून उठेलेले रोगी,fracture - dislocations चा त्रास असल्यास, जुनाट तापामध्ये शक्ती येण्यासाठी, पचनशक्ती कमी झाली असेल तर, थकवा आला असेल तर,विस्मरणाचा त्रास होत असेल तर मांसरस आहारात वापरावा . 
            तसेच वेसवारसुद्धा मांसरसाप्रमाणेच असतो, पण मांसाचा वापर असल्याने पचायला अधिक जड पण बलदायी,स्निग्ध, वातरोगनाशक  असतो.



Wednesday, 1 July 2015

स्वास्थ्यवेद - पावसाळ्यातील पदार्थ १ - कुळीथाचे कढण

   कुळीथाचे कढण / कळण 
आयुर्वेदोक्त नाव ( कुलत्थ यूष )


साहित्य 

कुळीथ          -    १/४ वाटी 
पाणी             -    ४ वाट्या
फोडणीसाठी  साहित्य 
तूप                    -   २ चमचे 
लसूण  पाकळी   -    १ 
हिंग 
जिरे 
मीठ  (चवीनुसार)

कृती 

  1. कुळीथ आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कुकरला ३-४ शिट्या होईपर्यंत शिजवावे 
  2. यातील शिजलेले कुळीथ वेगळे काढून पाणी कढण बनवण्यासाठी वापरावे 
  3. तूप,जिरे,हिंग, व लसूण यांची फोडणी या पाण्याला द्यावी. 
  4. चवीनुसार मीठ घालावे. 
  5. आवडत असल्यास फोडणीत कढीपत्ता घालू शकतो.
कुळीथाचे कढण तयार आहे.


टीप 
  1. हे कढण  करताना  त्या पाण्यात शिजलेले कुळीथ घोटून घातले व तिखट-हळद ,गोडा  मसाला, गूळ , नारळ घालून कुळीथाचे सार करता येईल . हे सार  भाताबरोबर खाण्यास छान लागते . 
  2. आयुर्वेदिक गुण - हे कढण  कफ-वात शामक ,उष्ण गुणाचे आणि पित्तकारक असते. वातव्याधी ,आमवात ,किडनी स्टोन या सारख्या आजारात तसेच वजन कमी करणाऱ्या माणसांसाठी आहाराचा भाग म्हणून  हे कढण वापरता येते . 
  3. मात्र गर्भिणी , क्षयरोगी ,  आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी कुळीथ टाळावे . 

स्वास्थ्यवेद -

स्वास्थ्यवेद 

 आज जागतिक डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने एका अल्पशा विश्रांतीनंतर समन्वय  पुन्हा आपल्या  भेटीला येत आहे. यामध्ये नेहमीच्या लेख मालिके बरोबरच ' स्वास्थ्यवेद ' हि संकल्पना घेऊन येत आहोत. या मध्ये आपण सहज-सोपे , "Healthy " तरीही चवीला रुचकर असे पदार्थ पाहणार आहोत . 
तुम्हाला या पाककृती आवडतील ही  आशा आहे

Tuesday, 30 December 2014

वेदना.............





                          सध्या रेडिओ , दूरचित्रवाणी , वृत्तपत्रे , सर्व माध्यमांतून सर्वाधिक भडिमार कशाचा होत असेल तर वेदनाशामक औषधे ( Painkillers ) विकणाऱ्या जाहिरातींचा.……
"अगं आई गं…. जोडो में दर्द?बदनदर्द?? डोके भणभणत… कंबर लचकली …. कान-नाक-गले का दर्द???? आणि अजून कुठे कुठे वेदना??? मग आमचे औषध वापरा, हमखास गुण येईल.  बेनामी चेहऱ्यांपासून लोकप्रिय कलाकार, क्रीडापटू सगळेजण ही औषधे विकण्याच्या शर्यतीत हिरीरीने भाग घेतात आणि या सर्व माध्यमबाजीला बळी पडून आपणही या गोष्टी आणत असतो.
                             जरा कुठे दुखले खुपले कि टाक हि गोळी तोंडात , मार तो स्प्रे ,चोळा तिथला बाम. पण कोणी कधी हा विचार केला आहे का कि या गोळीची घटक औषधे कोणती? हि औषधे कशी काम करतात? या औषधाच्या अतिसेवनाने किडनी,यकृतावर किती घातक दुष्परिणाम होऊ शकतात ?
                            या सगळ्याचा विचार करायचा झाला तर पहिल्यांदा वेदना म्हणजे काय?कशा होतात या वेदना? याचा विचार करावा लागेल. आपल्यापैकी प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना  कधी वेदना अनुभवलेल्या असतात मग त्या साध्या असोत किंवा अवघड जागेचे दुखणे किंवा मग "दिल का दर्द … "

International association for the study of Pain ही संस्था Pain ची व्याख्या करताना म्हणते की ,
Pain is defined as an unpleasant sensory or emotional experience associated with actual , potential tissue damage or described in terms of such damage.

तर  आयुर्वेद  शास्त्रात ,


वात -पित्त-कफादि दोषांनुसार वेदनेचे पुढील प्रकारसुद्धा वर्णन केले आहेत,


वातज वेदना -
  1. तोद - सुई  टोचल्याप्रमाणे होणाऱ्या  वेदना / Priking Pain 
  2. भेदन - फाटल्या /तुटल्या प्रमाणे होणारी वेदना / Stabbing Pain 
  3. ताडन - काठीने मारल्याप्रमाणे होणारी वेदना 
  4. छेदन - कापल्याप्रमाणे दुखणे 
  5. आयामन - खेचल्याप्रमाणे दुखणे / Stretching Pain 
  6. मंथन - Girding Pain 
  7. विक्षेपण - 
  8. चुमचुमायन -
  9. निर्दहन -
  10. अवभंजन -
  11. स्फोटन  -
  12. विदरण -
  13. उत्पाटन -
  14. कंपन 
  15. विश्लेषण 
  16. विकिरण 
  17. स्तंभन 
  18. पुरण 
  19. आकुंचन 
  20. अंकुशिका 
तसेच अकारण / पुन्हा पुन्हा होणाऱ्या वेदना / Vague pains या वात  दोषामुळे होतात. 

  1. ओष  - 
  2. चोष 
  3. परिदाह -
  4. धुमायन -
या पित्तज वेदना आहेत. 

तर 
  1. कंडू -
  2. गुरुत्व -
  3. सुप्तता -
  4. उपदेह -
  5. स्तब्धता - 
  6. शैत्य - 
या वेदना कफामुळे होतात. 

वेदना शमनार्थ  केले जाणारे उपाय :


  •  स्नेहन - सर्वांगाला औषधी तेलाने मसाज करून तेल अंगात जिरवणे म्हणजे स्नेहन  होय. या मध्ये आजारानुसार तेल व स्नेहानाची पद्धत कोणती वापरायची ते ठरते. 
                          यामध्ये सर्वांग-एकांग स्नेहन ,अवगाह,तैलधारा ,शिरोधारा,जानूबस्ति ,कटिबस्ति ,मन्याबस्ति . नेत्रतर्पण, कर्णपूरण अशा विविध प्रकारांनी  अंगदुखी,सांधेदुखी,मान-कंबरेचे दुखणे,डोकेदुखी,निद्राविकार,डोळ्यांचे तसेच कानाचे आजार  आदि दुखण्यावर उपचार केले जातात. 

  • स्वेदन - म्हणजे शरीराला शेक देणे, यासाठी औषधी काढे , किंवा कोरडा शेक वापरला जातो. बऱ्याचदा स्नेहनानंतर स्वेदन क्रिया केली जाते. किंवा पिंडस्वेद पद्धती सारखे स्नेह-स्वेद एकत्र केले जाणारे उपचार ही  असतात,जे संपूर्ण अंगदुखी , पेशी-स्नायू वेदना यामध्ये अतिशय लाभदायी ठरतात. 
प्रामुख्याने स्नेहन-स्वेदना द्वारे वातज , वात - कफज वेदना बऱ्या  केल्या जातात. 
  • लेप - वेगवेगळ्या प्रकारचे धान्यलेप ,औषधी वनस्पतींचे लेप, चिकट लेप, यासारखे प्रकार औषधी वनस्पतीचे विशिष्ट लेप त्या  दुखऱ्या जागी लावण्यासाठी वापरतात. 
              याचा कालावधी आजारानुसार ३-७ दिवस असतो व याद्वारे आमवात,कंबरदुखी  यांचा प्रभावीरित्या उपचार केला जातो. 

  • बस्ति - बस्तिचिकित्सा शरीराच्या अभ्यंतर भागातील दुखण्याच्या उपचारासाठी  वापरली जाते. 
  • नस्य - म्हणजे दोन्ही नाकपुड्यामध्ये औषधांचे थेंब टाकणे. उर्ध्वजत्रुगत (मानेच्या वरच्या वेदनादायी विकारांत ) नस्योपचार वापरले  जातात. जसे की डोकेदुखी , नाकाचे हाड वाढणे,मान दुखणे. 

  •    रक्तमोक्षण - शरीरातील दूषित रक्त व त्याद्वारे होणाऱ्या वेदनांच्या उपचारासाठी रक्तमोक्षण
       लाभदायक आहे. हे रक्तमोक्षण जळवा किंवा विद्ध कर्म (venepuncture ) या शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात.
  • अग्निकर्म - एखाद्या प्रदेशी तीव्र तसेच असह्य वेदना होत असल्यास (Local  acute pain ) ते बरे करण्यासाठी अग्निकर्म हा उत्तम वेदनाशामक उपचार आहे. वेगवेगळे सांध्यांचे दुखणे,डोकेदुखी,मानेचे दुखणे,टाचदुखी ,पायाची भोवरी, अशा तीव्र आजारांमध्ये  अग्निकर्म केले जाते. 

अर्थात हे सर्व उपचार करताना त्या भागाची शारीर रचना आणि सखोल आयुर्वेदीय मर्मज्ञान या विषयांचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे उपचार तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करून घ्यावेत.
                                तसेच हे उपाय वेदनेच्या मूळावर घाव घालणारे असल्यामुळे दीर्घकाळासाठी आराम देणारे आणि गोळ्यांप्रमाणे यकृत तसेच किडनी वर साईड इफेक्ट्स  करणारे नसतात. त्यामुळे अशा बहुगुणी आयुर्वेदिक उपचारांचा वापर करायला काय हरकत आहे?

Friday, 3 October 2014

शरदाचे चांदणे की कडक उन्हाळा??

                           शरद ऋतू म्हटले की सगळ्यांच्या मनात पहिला विचार येतो तो कोजागिरी पौर्णिमेचा………  ते आटीव दूध , गारवा..  अहाहा…
                           पहिल्यांदा नवरात्र मग कोजागिरी या सगळ्यांचा अत्युच्च परमबिंदू म्हणजे दिवाळी.
हे म्हणजे अगदी, "ऋतू आहे मोठा… नाही सण-आनंदा तोटा…" अशी अवस्था होते या कालावधीत.सण-वार,पक्वान्ने, मिठाया,चमचमीत पदार्थ, फराळ ,फटाके,यांची अगदी रेलचेलच. त्यात आणखी यावर्षी तर एवढ्या सुट्ट्या जोडून आल्यामुळे सर्वांचेच बेतही ठरले असतीलच.
                          पण एवढे सगळे छान-छान चालले असताना सध्या हैराण व्हायला होतेय ते मात्र उन्हाने…. ज्याच्या-त्याच्या तोंडी एकच नाव 'October Heat' (छ्या बुवा, या वर्षी ऑक्टोबर हीट फारच जोरदार..) पण या उष्णतेचा मुकाबला करायचा तरी कसा??
                          यासाठी आपले भारतीय ऋतू- हवामान समजून घ्यायला हवे.भारतीय हवामान साधारणतः सहा ऋतुंमध्ये वर्गीकृत केले जाते. सध्या शरद ऋतू सुरु आहे. हा काळ घटस्थापना- अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक अमावास्येपर्यंत, दोन महिन्यांचा असतो. भाद्रपद महिन्याचा उत्तर काळ ते अश्विन महिना हा काळ उत्तर भारतात तर आश्विन आणि कार्तिक महिना म्हणजे साधारणतः २२ सप्टेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतात शरद ऋतूची लक्षणे दिसतात. या ऋतूत पाऊस संपून वातावरणामध्ये उष्णता वाढू लागते.
                     शारीर स्थिती - शरदामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे वात दोषाचे निसर्गतःच शमन होते तर उष्णतेमुळे पित्त दोष वाढतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्त प्रकोपाची स्थिती व लक्षणे दिसून येतात. त्यामुळे पित्त तसेच रक्त दोषज विकार तसेच उष्णतेचे विकार या काळात दिसून येतात. शरदाच्या आधीचा ऋतू वर्षा (पावसाळा )या पावसाळ्यात शरीरबळ एकदम कमी असते त्यामुळे शरद ऋतुतही  शरीरबळ आणि पचन शक्ती हीन  स्वरुपाची असते.त्यामुळे कमी शरीर बल, मंदावलेली भूक आणि वाढलेले पित्त यांचा विचार करून दिनक्रम आणि आहार यामध्येही आवश्यक ते बदल करावे लागतात.
                                      नाहीतर शरीराच्या या नाजूक अवस्थेमुळे आपण आजारांना बळी पडू शकतो. म्हणून या काळात साथीचे /तापाचे आजार वाढलेले दिसतात
                       दिनचर्या - शरद ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी थंड-शीतल उपाय वापरायला हवेत. थांबा.. थांबा.. पण थंड म्हणजे A.C नाही हं वापरायचा. (A.C. मुळे येणारा कोरडेपणा,अतिथंड तापमान यामुळे त्रास अजूनच वाढेल), त्या ऐवजी वाळ्याचे पडदे वापरा (A.C. वापरायाचाच असेल तर तापमान २८ ते ३० डिग्री से. एवढेच ठेवा,जेणेकरून सामान्य शरीर तापमानाच्या समान तापमान असेल.), आंघोळीसाठी गरम पाणी न घेता कोमट  पाणी/साधे पाणी वाळा घालून वापरा. उष्णतेमुळे अंगाची काहिली होते तर कापूर , चंदन पावडर नेहमीच्या पावडर ऐवजी वापरा. दिवसा झोप घेणे टाळावे.
                       प्राणायाम करणाऱ्यानी कपालभाती, भस्रिका कमी प्रमाणात अथवा करू नये,त्याऐवजी अनुलोम-विलोम, सित्कारी, शीतली या प्रकारांचा अभ्यास करावा. कानामध्ये खोबरेल तेलात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावे. 
                      आहार - शरद ऋतू म्हणजे पित्त प्रकोप काळ. त्यामुळे पित्त दोषाच्या विरुद्ध गुणाचे - मधुर,कडू आणि तुरट चवीचे पदार्थ घेता येतील. दूध आणि तूप हे उत्तम पित्तघ्न आहेत. म्हणून जेवणात योग्य त्या प्रमाणात तुपाचा वापर करता येईल. पण हे तूप कच्चेच, वरण-भात-तूप अशा प्रकारे घ्यावे याउलट तळलेले -तेलकट पदार्थ त्रासदायक होतील. तेल-चरबीयुक्त पदार्थसुद्धा (उदा. चीझ,डालडा,मेयोनिझ,करडई,मोहरीचे तेल,मार्गारीन) कमीच घ्यावे. दही-ताक  घेऊ नये.चायनीज- शिळे पदार्थ खाऊ नयेत.तांदूळ,ज्वारी,बाजरी घ्यावी. कडू रसांचे पदार्थ सांगितले तरी गवार,मेथी,कारले,यासारख्या भाज्या टाळा. पालेभाज्या,दुधी,पडवळ,घोसाळे,दोडका खाण्यात असावा.डाळींब,द्राक्षे,मनुका,खारका,चिकू,सफरचंद खावीत. मासे,शेल फिश,सुके मांस खाऊ नयेत. लसूण, मिरची,गरम मसाला या ऐवजी लवंग,दालचिनी,धने-जिरे वापरावे. गरम पाणी,मद्य टाळावे.त्या ऐवजी माठाचे पाणी,वाळ्याचे पाणी, लिंबू सरबत,कोकम सरबत,आवळा सरबत,शहाळ्याचे पाणी प्या. अननस,स्ट्रोबेरी क्रश, आर्टीफ़िशिअल सरबते (रंग आणि प्रीझार्वेटीव्स घातलेली असल्याने - उदा. फ्रुटी,स्लाईस) टाळा. फ्रीज चे थंड पाणी,कोल्ड ड्रिंक्स घेऊ नका(ती फक्त स्पर्शाला थंड असतात पण शरीराला अपायकारकच असतात.).दूध सांगितले असले तरीही मिल्कशेक्स मात्र घेऊ नयेत.




शारदीय विरेचन -

                         विरेचन ही आयुर्वेदीय पंचकर्मामधील शास्त्रीय परिभाषा आहे. पित्त दोष आणि पित्तज विकार यामध्ये प्रामुख्याने विरेचन प्रक्रियेचा वापर केला जातो. तसेच शरद ऋतूमध्ये पित्ताचा नैसर्गिक प्रकोप होत असल्यामुळे वाढलेल्या पित्ताचा निचरा करण्यासाठी या ऋतूमध्ये सामान्य व्यक्ती तसेच पित्त प्रकृती-पित्त विकार असलेल्या व्यक्ती शास्त्रोक्त-विधिवत विरेचन घेऊ शकतात.म्हणून या काळात शारदीय पंचकर्म विचार व प्रचार कार्यक्रमसुद्धा केला जातो.

कोजागिरी पौर्णिमा व विरेचन

                        कोजागिरी म्हणजे 'कोs  जागर्ति'. पूर्वी कोजागिरी म्हणजे गच्चीवर-अंगणात जागवलेली रात्र,गाण्याची मैफिल,आटीव मसाला दूध आणि गप्पांची मैफिल हीच आपली पूर्वकल्पना होती.पण सध्या मात्र कोजागिरी हा एक इवेन्ट होऊ लागलाय. Cause for a celebration!!!! आटीव मसाला दूधाऐवजी मिल्कशेक्स, कोल्ड ड्रिंक्स पासून पाव-भाजी,समोसे,बिर्याणी,भजी यासारखा उष्ण,तीक्ष्ण "पित्त खवळणारा"  मेनू कोजागिरी साठी 'हिट' मेनू होऊ लागलाय. गाणी आणि गप्पांची जागाही डी.ज़े. घेऊ पाहतोय.त्यामुळे रात्र उत्तर रात्रीपर्यंत जागवली जातेय आणि आणि अजून पित्त वाढवले जाते आहे.
                      पण कोणी कधी विचार केलाय का कि हा दिवस शरद पौर्णिमेचाच का बरे असतो?आणि आटीव दूधच का प्यायचे असते? कारण आधी सांगितल्याप्रमाणे या काळात पित्त दोषाचे प्राबल्य असते.मग हे उष्ण,तीक्ष्ण अग्निच्या गुणाचे पित्त कमी करायचे तर मधुर,शीत, सौम्य गुणाच्या दुधासारखे दुसरे औषध नाही. तसेच दूध हे उत्तम रेचक आहे. आणि पित्ताची चिकित्सा करण्यासाठी असे नैसर्गिक रेचन उत्तमच. आणि म्हणूनच आटीव मसाला दूध पिण्यासाठी रात्री सुखद हवेत जागायचे असते,चांदण्यात दूध आटवणे हा चान्द्रसंस्कार आहे.यासाठी पौर्णिमेचा दिवस. आणि आरोग्याचे विशेषण लावले तर लोक करणार नाहीत म्हणून देवादिकांचे कारण.
मग  असे हे आटीव दूध नंतर उत्तम रेचनाचे कार्य करत वाढलेले पित्त सहजी कमी करते,हे यामागचे शास्त्र आहे.
झाले, साधे-सोपे शारदीय विरेचन. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाची कास धरून सणाद्वारे आरोग्याचा ताळमेळ ठेवला, तो असा.
                      तर काय मग यावर्षीची कोजागिरी कशी साजरी करणार तुम्ही??

Wednesday, 17 September 2014

मनुका ( Black Raisins)


                   सुकामेवा  म्हटले की सर्वांच्याच त्यावर उड्या पडतात. पण हा सुका मेवा फक्त आवड म्हणून न खाता जर योग्य त्या प्रमाणात खाल्ल्यास औषधांना पूरक म्हणून आहारीय घटक म्हणून त्याचा चांगला उपयोग होतो.
                    या सुक्यामेव्यापैकीच आकाराने छोट्या  पण शक्ति/गुणांनी  मोठ्या असलेल्या मनुकांचा आपण विचार करूया.
                    सुकी द्राक्षे दोन प्रकारची असतात. मनुका (काळी द्राक्षे) आणि बेदाणे /किसमिस (तांबूस द्राक्षे) यापैकी मनुका अधिक गुणकारी असतात.

सामान्य माहिती :
                       द्राक्षाकुळ (Vitaceae family ) मधील वेलीच्या स्वरुपात आढळणारी हि वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव "Vitis vinifera" आहे.  द्राक्षे उत्तर-पश्चिम भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथे दिसून येतात.    बिन बियांच्या द्राक्षांपेक्षा बिया असलेली द्राक्षे अधिक गुणकारी असतात. म्हणून मनुकासुद्धा घेताना बियांच्या  बघून घ्याव्यात.

आयुर्वेदीय गुणधर्म -
                                तेषां द्राक्षा सरा स्वर्या मधुरा स्निग्धशीतला  ।
                                रक्तपित्त ज्वरश्वास तृष्णादाहक्षयापहा ।।
                                                                                           च. सू. 
                      द्राक्षे गुणधर्माने सारक , आवाजासाठी उत्तम (स्वर्य ) , मधुर रस-विपाकी , स्निग्ध , शीतल गुणांची आहेत. त्यांचा रक्तपित्त, ताप, श्वास, तहान, दाह, क्षय आदि आजारांवर उपयुक्त आहे.

आहारीय पोषक तत्वे (Nutritional Qualities) :

 (Nutritive Value per 100gm)
PrincipleNutrient ValuePercentage of RDA
Energy299 Kcal15%
Carbohydrates79.18 g61%
Protein3.07 g5.5%
Total Fat0.46 g1.5%
Cholesterol0 mg0%
Dietary Fiber3.7 g10%
Vitamins

Folates5 µg1%
Niacin0.766 mg5%
Pantothenic acid0.095 mg2%
Pyridoxine0.0174 mg13%
Riboflavin0.125 mg10%
Thiamin0.106 mg9%
Vitamin A0 IU0%
Vitamin C2.3 mg4%
Vitamin E0.12 mg1%
Vitamin K3.5 µg3%
Electrolytes

Sodium1mg
11%
Potassium749 mg16%
Minerals

Calcium50 mg5%
Copper0.318 mg35%
Iron1.88 mg23%
Magnesium7 mg2%
Manganese0.299 mg12%
Phosphorus101 mg15%
Selenium0.6 µg1%
Zinc0.22 mg2%

इतर फायदे - 

  • रक्ताल्पता (Anaemia ) - 
                       मनुकांमध्ये लोह व vitamin B complex वर्गातील व्हिटामिन मोठ्या प्रमाणात असते. तसेच पित्तावर कार्यकारी असल्याने मनुकांचा रक्ताल्पतेमध्ये चांगला उपयोग होतो.
  • मलावरोध (Constipation ) -
                        मनुकांमध्ये Malic acid व तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे मनुकांचा मलावरोधात खूप चांगला वापर होतो. यासाठी मूठभर मनुका व एक अंजीर सकाळी उपाशीपोटी चावून चावून खावे. किंवा मनुकांचे सूप* वा सरबत* घ्यावे. 
  • दौर्बल्य/थकवा  (ज्याला हल्ली बऱ्याचदा Weakness असे गोंडस नाव देतात.)
                         अति काम,वयामुळे,कुपोषणामुळे किंवा एखाद्या मोठ्या आजारातून बरे झाल्यावर जर थकवा जाणवत असेल तर मनुका हे एक उत्तम तर्पण (तृप्ती देणारे) औषध आहे. नुसत्या मनुका चावून किंवा सूप करून घ्याव्यात.
  • मदत्यय /दारूचे व्यसन (Alcohol addiction )
                         दारूमधील अल्कोहोल हे Neurons ना  क्षीण करते याउलट मनुका तर्पण , पोषण करतात. खजूर आणि मनुकांपासून बनवले जाणारे खर्जुरादी मंथ* हे पेय या आजारात खूप उपयोगी आहे.

उपरोक्त लेखात दिलेल्या पाककृती -
   
          मनुकांचे  सरबत -
                          १. मनुका - १ मूठ
                          २. प्यायचे पाणी - २-३ कप
                          ३. लिंबाचा रस - चवीपुरता
                          ४. मीठ - चवीपुरते
          मनुका रात्रभर २-३ कप पाण्यात भिजत घाल्याव्यात. सकाळी त्यातीलच थोडे पाणी वापरून मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या. या मिश्रणात उरलेले पाणी मिसळून आवश्यक वाटल्यास चवीपुरता लिंबाचा रस व मीठ घालून नीट ढवळावे.
              (वजन वाढविण्यासाठी हे सरबत लिंबू-मीठ न घालता,दुधाबरोबर उकळून घेत येईल.)

टीप - या लेखात दिलेली शास्त्रीय,आयुर्वेदशास्त्रीय  माहिती ही सामान्य जणांच्या उद्बोधानासाठी आहे. रुग्णासाठी औषध म्हणून वापरताना याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा.

Thursday, 14 August 2014

नेत्रसुरक्षा




                   सध्या या मोबाइल , कॉम्प्युटर्स, आय पॅडस च्या युगात सर्वात जास्त ताण कशावर येत असेल तर तो म्हणजे डोळ्यांवर…… 
                         म्हणूनच हल्ली डोळे दुखणे, चुरचुरणे,जळजळणे,डोळ्यांना थकवा येणे,वारंवार वाढणार चष्म्याचे नंबर अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर दिसतात. या सुरुवातीच्या बारीक-सारीक तक्रारींकडे दुर्लक्ष होत राहिले तर मग हळूहळू वाचताना झोप येणे,एकाग्रता कमी होणे,डोकेदुखी,झोप कमी होणे,गाढ झोप न लागणे,
 डोके जड झाल्यासारखे वाटणे अशा दीर्घकालीन तक्रारी त्रास देऊ शकतात. या सर्व कारणांचे मूळ हे डोळ्यांची नीट  काळजी घेतली न जाणे यातच आहे.
                            डोळ्यांची काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे यासाठी आपण प्रथम डोळ्यांची रचना पाहूया. पुढे दिलेल्या आकृतीप्रमाणे डोळ्याची रचना



डोळ्याची शास्त्रीय रचना




        नेत्र गोलकाच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या पेशी





                         डोळा म्हणजेच  'नेत्र' हे चक्षुरिंद्रियाचे (पाहण्याचा अवयव,क्षमता) आणि ते सुस्थितीत ठेवायचे असतील तर डोळ्यांचा वापर त्यांच्या पूर्ण क्षमतेने व्ह्यायला हवा. मात्र mobile , tv , computers , वापरताना डोळे सतत एकाच ठिकाणी,ठराविक अंतरावर (ते सुद्धा जवळच्याच) पाहत असतात , तसेच या सर्व उपकरणांच्या स्क्रीन कृत्रिम प्रकाशाने उजळलेल्या असतत. अशा वेळी डोळ्यांवर, नेत्रगोलकाच्या पेशींवर ताण येतो. 
                              हे टाळण्यासाठी आपण सर्वानीच पुढे दिलेल्या काही सोप्या उपायांचा वापर करावा - 
  • रोजचे काम करताना दर २-३ तासांनी computer मधून थोडा वेळ काढून डोळ्यांचे आणि मानेचे व्यायाम करावेत (सवय झाली कि या कामासाठी १० मिनिटेसुद्धा पुरतात.)
  • कामाला सुरुवात करण्यापूर्वी तसेच काम झाल्यावर डोळे गच्च बंद करुन काही क्षण तसेच ठेवावेत आणि मग हळूहळू सैल करत उघडावे.  असे ४-५ वेळा करावे. 
  • त्यानंतर डोळे बंद करून त्यावर गार पाण्याचे हबके मारावेत. 
  • रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर eye wash cup मध्ये साधे पाणी घेऊन त्याने डोळे धुवावेत.
या साध्या उपायांचा वापर दररोज करून आपण डोळ्यांवर येणारा ताण कमी करू शकतो. याखेरीज औषधी उपायांची गरज भासल्यास आयुर्वेदीय उपचार आणि पंचकर्म  उपायांचा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने वात दोषाची गति नियमित करणारे,कफ दोष कमी करणारे व पित्त दोष प्राकृत करणारे उपचार करण्यावर भर दिला जातो. विविध औषधे पोटात घेण्यासाठी तसेच नेत्रतर्पण (नेत्रबस्ती) , लेपन , बिडालक,शिरोधारा,आश्च्योतन,बस्ति आदि उपक्रम आदी पंचकर्म उपायही वापरले जातात.


वाग्भट नेत्रसुरक्षा 

                       वाग्भट नेत्रसुरक्षा  हा डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तयार केलेला खास कार्यक्रम आहे. यामध्ये शास्त्रीय आणि आयुर्वेदीय पद्धतींचा मेळ घालून उपचार पद्धती निश्चित केली आहे. 
                             
                           कार्यक्रमाची वैशिष्ट्ये :  
  • डोळ्यावरचा ताण कमी करण्यासाठी डोळ्यांचे व्यायाम तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतले जातात. (यासाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून आगाउ नोंदणी करावी, ४-५ आठवडे सलग येऊ शकल्यास सर्व व्यायाम संच टप्प्या-टप्प्याने शिकवले जातात)
  • औषधी चिकित्सा 
  • पंचकर्म चिकित्सा  -   नेत्र तर्पण 
                                     -  परिषेक 
                                     -  आश्च्योतन 
                                     -  अंजन 
                                     -   लेप / बिडालक 
                                     - बस्ति  
  • डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहार, विहार,योग,श्वसन यांचे मौलिक समुपदेशन. 
कोणासाठी  :
  1. विद्यार्थी   
  2. सतत Computer शी संबंधित कामाचे स्वरूप असणाऱ्या व्यक्ति. 
  3. व्यवसायजन्य ताणामुळे असणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी इत्यादी.