Sunday, 3 January 2021

उदकाचिया आर्ति.....अर्थात पाणी किती आणि कसे प्यावे - उत्तरार्ध.



                'उदकाचिया आर्ति' अर्थात पाणी कसे आणि किती प्यावे या लेखमालेच्या पूर्वार्धात आपण, 'पाणी कसे प्यावे? / जेवताना पाणी किती प्यावे? / RO चे पाणी व उकळलेले पाणी / कोष्ण जल- श्रुतशीत जल याविषयी थोडक्यात माहिती घेतली. आजच्या भागात,

◆टॉक्सिन फ्लश करण्यासाठी प्यायला जाणाऱ्या 5-7 लिटर पाण्याचे दुष्परिणाम,

◆तहान लागली असतानाही पाणी न पिणे

◆अति पाणी आणि किडन्या

◆पाणी-ज्यूस-सरबते 

◆पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध

या मुद्द्यांची माहिती घेऊ.

©Drsnigdha@samanwaya

*तहान म्हणजे काय?*

             तहान म्हणजे शरीराला आवश्यक असलेले पाणी पिण्यासाठी निर्माण होणारी संवेदना आहे. पण बऱ्याचदा आपण कामाच्या नादात, आळसामुळे या संवेदनेकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदात तहान(तृष्णा) ही एक आधारणीय म्हणजे अडवू नये संवेदना सांगितली आहे. तहानेकडे दुर्लक्ष करुन पाणी न प्यायल्यास टाळू-घशाला शुष्कता येणे, चक्कर येणे ,डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात तसेच हे वारंवार किंवा दीर्घ काळासाठी होत राहिले तर कर्णबधिर्य , श्रमश्वास, हृदय प्रदेशी वेदना यासारखी लक्षणेही दिसतात. त्यामुळे कमी पाणी पिण्याची सवय असल्याससुद्धा ती गंभीरपणे मोडून काढणे गरजेचे आहे.©Drsnigdha@samanwaya

            तहान लागेल तेव्हा घटाघट पाणी न पिता नीट घोट-घोट पाणी प्यावे.तसेच उभ्याने पाणी पिऊ नये. हल्ली सर्व ऑफिसेस AC असतात त्यामुळे घाम येत नाही अश्या वेळी घामावाटे जाणारे पाणी कमी होते.त्यामुळे AC मध्ये काम करणाऱ्या लोकांनी वैद्यांच्या सल्ल्याने आपला पाण्याचा दिनक्रम आखून घ्यावा.


*पाणी-ज्यूस-सरबते* - 

           हल्ली बऱ्याच वेळा पार्टीमध्ये/कॉम्बो मील्स बरोबर खाद्यपदार्थांबरोबर शीतपेयाचा उंच ग्लास असतो.स्टाईल म्हणून कोल्डड्रिंक्स,स्टेटस म्हणून हार्डड्रिंक्स, "हेल्दी" म्हणून ज्यूसेस/हर्बल टीज बऱ्याचदा पाण्याला "रिप्लेसमेंट" म्हणून वापरले जातात. पाण्याची गरज असताना प्यायलेली ज्यूस-सरबते-कोल्डड्रिंक पाण्याबरोबरच कृत्रिम रंग,प्रिहर्वेटिव्हज,क्षार तसेच  मोठया प्रमाणात साखरेचा अनावश्यक साठा शरीरात घेऊन जातात. आणि त्यामुळे दुसरेच काही त्रास सुरू होतात.©Drsnigdha@samanwaya

'जब वी मेट'मध्ये आपली लाडकी गीत रतलाम स्टेशनवर त्या स्टॉलवाल्याला सांगतेच ना, 'कोला-शोला सब अपनी जगह पर है पर पानी का काम पानी ही करता है,बाय गॉड ।' तुम्ही सर्वांनीही हे कधी ना कधी नक्कीच अनुभवले असेल.


*अति पाणी व किडन्या*

           देवाने जसा आपल्या शरीरात जठररूपी मिक्सर-ग्राईंन्डर बसवला आहे तश्याच फिल्टररूपी किडन्यासुद्धा दिल्या आहेत. शरीरातील हानिकारक द्रव्ये, चयापचयातील उत्सर्जन करण्याजोगे पदार्थ(end products of metabolism) हे सर्व शरीरातून शौच व लघवीद्वारे बाहेर टाकले जातात. शरीरातील रक्त किडनीमध्ये आले की  सर्व द्रवांशातील अशुद्ध घटक दूर करून मूत्राद्वारे काढून टाकण्याचे काम या किडनी करत असतात. पण बऱ्याचदा अभिनेते-अभिनेत्री आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की 'नितळ त्वचेसाठी मी दिवसभरात 8-10 लिटर पाणी पिऊन सगळी टॉक्सिन्स फ्लश करते' आणि मग सगळी जनता "टॉक्सिन्स फ्लश" करण्यासाठी भरपूर पाणी पिऊ लागते. यात मग सकाळी सकाळी पाणी पिण्यापासून दिवसभरात 1 लिटरच्या 10 ते 12 बाटल्या बाटल्या पिणारे सगळेच प्रकार आले. माझे एक पेशंट तर सकाळी तब्बल 2 लिटर पाणी अनशापोटी पीत आणि मग दिवसभरातील वेगळे. पण शरीर हे काही टॉयलेट नाही ना की फ्लशचे बटन दाबले की बदाबदा वाहणाऱ्या पाण्याने स्वच्छ होईल, उलट असे अति पाणी किडन्यांवर अतिरिक्त आणि अनावश्यक दाब निर्माण करेल.


*अति पाणी प्यायल्याने शरीरावर होणारे इतर हानीकारक परिणाम.*

                फक्त किडन्याच नाही तर इतर शरीरावरसुद्धा अति पाणी पाण्यामुळे दुष्परिणाम होत असतात. आणि गमतीची गोष्ट म्हणजे टॉक्सिन्स थिअरीची वकिली करणारे ही दुसरी बाजू लक्षात घेतच नाहीत. शरीरातील अतिरिक्त पाणी काढून टाकताना त्याबरोबर सोडियमचे प्रमाणही कमी होते. सोडियमचे प्रमाण कमी झाल्यास थकवा,मसल क्रॅम्पस,डोकेदुखी, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसतात. अतिरिक्त पाणी शरीरातील उतींमध्ये राहिल्याने सूज येते. आयुर्वेद शास्त्रात तर अजीर्णाच्या प्रकारांमध्ये पाण्याचे अजीर्ण सुद्धा सांगितले आहे.


*पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध.*

               पोट साफ न होण्याची किंवा शौचाला कठीण होण्याची तक्रार असणाऱ्या व्यक्तिना बऱ्याचदा अशी सकाळी पाणी पिण्याची सवय असते. क्लिनिकमध्ये मी प्रत्येक पेशंटला पाणी पिण्याच्या सवयीबद्दल विचारतेच आणि बहुतांश जण पोट साफ होण्यासाठी सकाळी पाणी आवर्जून पितात. एका वेळी भरपूर पाणी प्यायल्याने पोटावर दाब येतो आणि त्यामुळे ते आतड्यांना संकेत पाठवून पोट रिकामे करायला सांगते. पण जर बद्धकोष्ठतेचे कारण वेगळेच असेल तर ही युक्ती दर वेळी काम करेलच असे नाही. *सतत पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते पण दर वेळी बद्धकोष्ठतेचे कारण कमी पाणी पिणे हेच असेल असे गरजेचे नाही.* ©Drsnigdha@samanwaya

             न्याय-वैशेषिक दर्शनशास्त्रात सांगितलेला 'पिंड ब्रह्मांड न्याय' (जे पिंडी ते ब्रह्मांडी) आयुर्वेदातही आहे. जे संपूर्ण ब्रह्मांडात असते तसेच पिंडातही (शरीरात) असते. पिंडसुद्धा ब्रह्मांडाप्रमाणे आहे असे हा न्याय सांगतो. त्यामुळे वर वर साधे निरुपद्रवी वाटणारे पाणी जेव्हा अति होते, साठून राहते तेव्हा त्रासदायकच होते हे आपल्याला निसर्गात येणारे पूर, फुटलेली धरणे,घरातले लिकेज पुरेपूर दाखवून देतात.

तसेच असे अतिरिक्त पाणी शरीरासाठी किती त्रासदायक ठरू शकते हे आपल्याला लक्षात येईल.

 आपल्या काही शंका असल्यास वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

बोरीवली.

9870690689


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 04 जानेवारी 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/01/blog-post_3.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


Saturday, 2 January 2021

उदकाचिये अर्ती.....अर्थात पाणी किती आणि कसे प्यावे

   


    

  सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आंग्ल नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नववर्ष 2021 मधील पहिल्याच लेखाचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. *तो म्हणजे पाणी*. अर्ति म्हणजे पीडा/व्यथा. मिलिंद बोकीलांचे हे पुस्तक खरं तर पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे होणाऱ्या व्यथा सांगणारे आहे. तसेच आज या लेखात आपण कमी पाणी पिणे किंवा अति पाणी पिणे या दोन्ही टोकाच्या विचारांमुळे शरीरावर ओढावणाऱ्या समस्या(अर्तिंचा) विचार करणार आहोत.

*पाणी कसे प्यावे?*

              कोविड काळात सर्वांनी काढे/गरम पाणी यांचा जोरदार मारा केला शरीरावर. पण आयुर्वेदात ऋतूनुसार जल,द्रवपदार्थ दिले आहेत. शीत ऋतूंमध्ये काढे,कोष्ण जल (कोमट पाणी) तर उष्ण ऋतूंमध्ये पानक,फांट असे सौम्य प्रकार, सिद्ध जल किंवा श्रुतशीत जल (उकळवून थंड केलेले पाणी वापरण्यास सांगितले आहेत. यातील कोष्ण जल आणि श्रुतशीत जल या प्रकाराबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कारण दैनंदिन जीवनात यांचाच वापर जास्त होतो. इतर प्रकार हे व्यक्तीची प्रकृती-विकृतीनुरूप वैद्यकीय सल्ल्यानेच वापरावेत.

             तर कोष्ण जल म्हणजे उकळलेले पाणी. सर्वप्रथम उकळलेले पाणी म्हणजे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून टाकायचा नसतो तर *पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करून किमान 10 मिनिटे तरी उकळवावे* . त्यामुळे ते पचायला हलके होते,त्यातील बॅक्टरीया, मायक्रोब्स नष्ट होतात. औषधोपचार करताना आम्ही वैद्य तर कधीकधी आजारानुसार एक अष्टमांश (१/८) , एक चतुर्थांश (१/४) आटवलेले पाणी पिण्याचाही सल्ला देतो. असे गरम पाणी,उकळते नव्हे फक्त गरम, शीत ऋतू, जसे की हिवाळा-पावसाळा असताना प्यावे. उकळलेले पाणी थर्मासमध्ये भरून मग गरजेप्रमाणे ऊनऊन पिता येईल.

याउलट श्रुतशीत जल म्हणजे उकळून थंड केलेले पाणी. उन्हाळ्यात, शरद ऋतूंमध्ये (ऑक्टोबर हीट हो) असे श्रुतशीत जल प्यावे.


*RO चे पाणी VS उकळलेले पाणी*

               क्लिनिकमध्ये बरेच पेशन्ट्स विचारतात की वॉटर फिल्टर्स किंवा UV/RO वापरत असताना पाणी उकळवण्याची खरंच गरज आहे का? शुद्धच असते ते पाणी. पण पाणी फक्त शुद्ध करण्यासाठीच उकळले पाहिजे असे नाही तर उकळल्यामुळे ते लघु आणि सुपाच्य (पचायला हलके) होते. त्यामुळे पाणी उकळवून प्यावे आणि रोज उकळलेले पाणी त्या दिवशीच संपवावे.


*जेवताना पाणी किती?*

या संदर्भात एक छोटेसे संस्कृत सुभाषित मी उद्धृत करू इच्छिते,


*अजीर्णे भेषजं वारि, जीर्णे वारि बलप्रदम्* ।

*भोजने चामृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्* ।।


अर्थात-अपचन झाले असता,थोडे थोडे पाणी पित रहावे.अन्नपचन पूर्ण झाल्यानंतर(जेवणानंतर 2-3 तासांनी) पाणी पिणे शरीराला बळ देते. जेवताना अधून-मधून पाणी पिणे हे अमृतासमान उपकारक आहे;तर जेवणानंतर लागलीच पाणी पिणे हे विषासमान आहे.

            खरंच असे असते का हो? तर हो. क्लिनिकमध्ये अपचनाचे त्रास घेऊन येणाऱ्या बऱ्याच रुग्णांमध्ये चुकीच्या पाणी पिण्याच्या सवयी के कारण मोठया प्रमाणात दिसून येते. बघा हं,  म्हणजे त्रास खाण्याशी संबंधित पण त्याचे मूळ पाण्याशी संबंधित. अजीर्ण म्हणजे अपचन झाले असतानाही 'ताकद कशी येणार' म्हणून हट्टाने खात राहणे अजून त्रास देते. तशीच बऱ्याच जणांना सवय असते , _जेवताना पाणी न पिता जेवण झाले की मोठा पेला/दोन-तीन पेले पाणी रिचवतात अगदी लोटाभर पाणी सुद्धा पिणारे काही लोक पाहिलेत मी_ पण असे पाणी पोटाचे व्यापार बिघडवते. साधा विचार करा हं, मिक्सरमध्ये वाटण करायचे असेल तर आपण एकदाच मोठा पेलाभर पाणी ओतू का त्यात?काय होईल मग त्या वाटणाचे?,चोथापाणीच राहील ना?किंवा कणिक मळतानासुद्धा आई त्यात हळूहळू थोडे पाणी घालून मळते ना? तसेच आहे आपल्या जठराचे. हा शरीरातील सगळ्यात मोठा , physical मिक्सर आहे आणि फिजिक्स,केमिस्ट्रीचे सगळे गुण या बायोलॉजीमध्ये पण लागू होतात बरं. असे अति पाणी अन्न आणि पाचक रस पातळ करेल त्यामुळे पचनक्रिया नीट होणार नाही. त्यामुळे जेवताना थोडे-थोडे छोटे घोट पाणी प्यावे, म्हणजे अन्नाचा नीट गोळा होतो. वाग्भट म्हणतात, जेवताना 2 भाग अन्नासाठी,  1 भाग द्रवपदार्थांसाठी (फक्त पाणी नव्हे) आणि एक भाग रिकामा ठेवावा म्हणजे पोटावर ताण न येता पचन नीट होईल.

           जेवणापूर्वी पाणी पिणे जी सुद्धा एक अशीच चुकीची सवय. मुख्यत्वे वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळणारी. हे जेवणाआधी प्यायलेले पाणी, जेवण पचवण्यासाठी लागणारे पाचकरस धुवून पुढे घेऊन जाते. हे पाचकरस भुकेच्या वेळेसच स्रवतात आणि पचनाला मदत करतात. जर पाचकरसच नसतील तर पचन कसे होईल? तसेच भूक आणि तहान या दोन वेगळ्या संवेदना आहेत कारण त्या शरीराच्या दोन वेगळ्या  गरजा आहेत. भूक लागली असता आपण शरीराला , अग्निला (पचनसंस्थेला) पाणी देणार असू तर ते अग्निमांद्य आणि पचनाचे विविध आजार निर्माण करेल. पण जेवणाआधी पाणी प्यायले की मग अशी बिघडलेली पचनसंस्था ,शरीराचे पोषण करू शकत नाही. मग दिसतात केस गळणे, त्वचा खराब होणे,सांधेदुखी, अस्थिसौषिर्य, दौर्बल्य यासारखे आजार. डाएट करूनही हे असे का होते याचे उत्तर चुकीच्या डाएटमध्ये असते. म्हणून डाएट गुगल करण्याऐवजी/स्वघोषित डाएटीशीयन्स कडून घेण्याऐवजी क्वालिफाईड डॉक्टरांकडून घ्यावे.

(क्रमशः)

उद्याच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत, 

◆टॉक्सिन फ्लश करण्यासाठी प्यायला जाणाऱ्या 5-7 लिटर पाण्याचे दुष्परिणाम,

◆तहान लागली असतानाही पाणी न पिणे

◆अति पाणी आणि किडन्या

◆पाणी-ज्यूस-सरबते

◆पाणी आणि बद्धकोष्ठता यातील संबंध.


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 3 जानेवारी 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/01/blog-post.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



Saturday, 14 November 2020

'अ' आयुर्वेदाचा - राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020.

 


'अ' आयुर्वेदाचा - राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020.


परवा धनत्रयोदशी होती. देवता व असुरांनी केलेल्या समुद्र मंथनातून धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरींचे अवतरण झाले म्हणून त्यांच्या जन्मदिवशी भगवान धन्वंतरींचे पूजन केले जाते. दरवर्षी धनत्रयोदशीचा दिवस 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' म्हणूनही साजरा करतात. यापूर्वी मी वेगवेगळ्या विषयांमधील आयुर्वेदीय दृष्टिकोनाबद्दल लिखाण केले आहे. मात्र आज मी थोडेसे आयुर्वेद शास्त्राबद्दलच लिहिणार आहे. आयुर्वेद म्हटले की वात-पित्त-कफ या संज्ञा आपण बऱ्याचदा ऐकतो. पण नक्की हे वात-पित्त-कफ म्हणजे असतात तरी काय हे जरा आज संक्षेपाने जाणून घेऊया.


त्रिदोष - त्रिदोष म्हणजेच तीन दोष ही आयुर्वेदातील महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे.वात-पित्त-कफ हे तीन दोष आहेत हे हल्ली काही जणांना माहीत असते.मात्र बऱ्याचदा वात म्हणजे गॅस, पित्त म्हणजे ऍसिडिटी आणि कफ म्हणजे सर्दी-खोकला असे समजले जाते त्यामुळे मग वातामुळे(गॅसमुळे) सांधे कसे झिजतात?ऍसिडिटी नाही तरी डोळ्यांचे त्रास,त्वचाविकार पित्तामुळे कसे होतात ? हे समजत नाही आणि मग संपूर्ण आयुर्वेद शास्त्रच "अशास्त्रीय" असल्याचा गैरसमज करून घेतला जातो. गॅस-ऍसिडिटी-सर्दी एवढे मर्यादित स्वरुप नाही या तीन दोषांचे. वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीराचा मूलभूत पाया आहेत. सम अवस्थेत (नॉर्मल स्टेट) हे दोष सर्व शरीरव्यापार नियंत्रणात ठेवतात. मात्र विषमवस्थेत ते शरीरधातूंना दूषित करतात म्हणून त्यांना 'दोष' असे म्हटले जाते. (रोगस्तु दोषवैषम्यं दोषसाम्यम् अरोगता। ) अगदी सध्या सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सर्व आजार हे त्रिदोष बिघडल्यामुळे होतात.

          वात दोष - त्रिदोषांमध्ये वात दोष श्रेष्ठ मानला जातो. पंचमहाभूतानुसार वात म्हणजे वायू. इतर दोषांची कार्ये वायूवर अवलंबून असतात. कारण हा एकच दोष गतिशील आहे.पण हा वात असल्याने त्याचे प्रमाण मोजता येत नाही. लक्षणांवरून तो ओळखला जातो. (सोपे उदाहरण द्यायचे झाले तर वारा वाहतो तेव्हा तो दिसत नाही मात्र स्पर्श, हलणाऱ्या वस्तू पाहून त्याचे अस्तित्त्व कळते.शरीरातही वात दिसत नाही पण हॉर्मोन्स, न्यूरोट्रान्समीटर्सचे स्रावांद्वारे वेगवेगळे इम्पल्स,रिफ्लेक्स यासारख्या गतिशील क्रियांमध्ये त्याचे अस्तित्व आणि कार्य दिसून येते.) सर्व शरीराचे धारण, सर्व शरीरक्रियांचे प्रवर्तन व नियंत्रण, शरीरपरमाणूंचे संयोजन व वियोजन, गर्भाची निर्मिती, दोषांचे शोषण करणे, धातूंना स्थैर्य व बल प्राप्त व्हावे म्हणून योग्य घटकांचा पुरवठा करणे , धातूंची झीज भरून काढणे, धातूंच्या त्याज्य घटकांना मलायनांकडे नेणे, रक्तधातूला प्राणवायूचा पुरवठा करून विशुद्ध करणे. सर्व धातूंकडे रक्त पुरविणे, सर्व इंद्रियांना प्रेरक, इंद्रियार्थवाहक, मनःकार्यप्रवर्तक-नियंत्रक, इंद्रियार्थ-इंद्रिये,श्रोत्रेंद्रिय व स्पर्शेंद्रिय यांचे कार्य सुरळीत ठेवणे. वाक्‌प्रवृत्ती करणे ही सर्व कार्ये वात दोषाची कार्ये आहेत. यावरून लक्षात येते की वात दोष दिसत नसला तरी त्याची शरीरात होणारी सर्व कार्ये पाहून क्षीणता , साम्यावस्था किंवा प्रकोप समजता येतो.

शरीरामध्ये वात त्वचा,कानाची हाडे,मोठे आतडे,कटि प्रदेश ही प्रामुख्याने वाताची स्थाने मानली जातात.


पित्त दोष - पित्त हे पांचभौतिक द्रव्य आहे. अग्नी व जल या महाभूतांचे आधिक्य त्यात असते.शरीरात असलेल्या द्रव्यांचे पचन(चयापचय क्रिया-metabolism) करणे. शरीर उष्ण राखणे, तहान व भूक निर्माण करणे, रुची उत्पन्न करणे, शरीरातील अतिरिक्त द्रवांचे शोषण करणे, शरीर मृदू ठेवणे, त्वचा तेजस्वी व प्रभायुक्त राखणे यासारखी शारीरिक कार्ये तसेच स्मरण,  विचारांत निश्चितता ठेवणे, धैर्य, शौर्य, पराक्रम व मनःप्रसाद निर्माण करणे, ही मानसिक कार्ये पित्त दोषामुळे होतात. पित्त दोष बिघडल्यास या कार्यांमध्ये बिघाड होतो. यकृत,हृदय,मस्तिष्क,प्लिहा,अग्न्याशय ही पित्त दोषाची प्रमुख स्थाने आहेत.


कफ दोष - तिसरा दोष कफ हेसुद्धा पांचभौतिक द्रव्य असून पृथ्वी आणि जल या महाभूतांच्या आधिक्याने निर्माण होते. '‘क’ म्हणजे जल व जलाप्रमाणे फल देणारा तो कफ. (केन फलति इति कफ। ) शरीराला स्थिरता,बल देणारा असा दोष म्हणजे कफ. कफाच्या अंगभूत स्निग्धता-ओलाव्यामुळे , जसा कण-कण चिकटून गोळा तयार होतो तसेच शरीर घटकांचा संचय होऊन शरीराची वाढ होते. त्यामुळे सुदृढता, पोषण,शरीरवाढ,ताकद, शरीर थंड ठेवणे , एकाग्रता यासाठी कफ दोष महत्त्वाचा असतो.

छाती,मस्तिष्क,शरीरातील विविध सांधे,मुख या ठिकाणी कफ दोष प्रामुख्याने दिसतो.


त्रिदोषांची प्रमुख स्थाने सांगितलेली असली तरीही हे तिन्ही दोष सर्व शरीरात पसरलेले असतात आणि त्यांच्या प्रत्येकी 5 उपप्रकारांद्वारे शरीरव्यापार पार पाडतात.(विस्तारभयास्तव आपण येथे त्यांचे सविस्तर वर्णन करण्याचे टाळले आहे पण पुढे त्यांची माहिती घेऊच.)

तर असे हे तीन दोष आपल्या शरीराचा मूलभूत पाया आहेत. त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आपली शारीर प्रकृती ठरते. सम अवस्थेत असतात तेव्हा हे त्रिदोष आपले शरीर निरोगी ठेवतात तर त्यांच्या बिघाडामुळे रोगांना आमंत्रण मिळते. आपल्या आहार-विहारामुळे , त्यातील नियमित-अनियमिततेमुळे हे बिघाड होत असतात त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कोणत्याही आजाराचे मूळ शोधून त्यावर मुळासकट उपचार करणे खूप महत्त्वाचे असते.


सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 15 नोव्हेंबर 2020 रोजी आपल्या

https://samanwayayurved.blogspot.com/2020/11/2020.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.

9870690689

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

बोरीवली(पू.) मुंबई.


Saturday, 10 October 2020

केसांच्या समस्या भाग 3 - केस गळणे

 

#weekend_brunch with #ayurveda  - Part 5

#inHAIRetance_वारसा_सुंदर_केसांचा  #केस_पेपर_तिचा_आणि_त्याचासुद्धा
#samanwaya_ayurvedic_and_panchakarma_clinic
#keshayurved

केसांच्या समस्या भाग 3

केस गळणे.

              केसांच्या समस्या म्हटले की सर्वांना सर्वप्रथम आठवते ती “झड़ते बालों की समस्या.” अगदी दहशत म्हणावी  एवढी ही केसगळतीची समस्या सध्या बळावली आहे. १० पैकी ७ लोकांना थोड्या-फार प्रमाणात केस गळण्याचा त्रास असतोच. आणि जवळपास सर्वांचाच प्रवास तेले-लेप-शाम्पूपासून सुरुवात होऊन via त्वचारोगतज्ञ ते शेवटी आम्हा आयुर्वेद तज्ञांकडे येऊन पोहोचतो.

           सायलीचे केस शाळेत असताना दाट आणि लांबसडक होते. तिच्या आईकडून आलेल्या या सुंदर वारश्याचा तिला खूप अभिमान.पण सध्या ती गळणाऱ्या केसांमुळे अगदी त्रस्त झाली होती. वेगवेगळे उपाय करूनही थोडासा फरक पडे आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या. सायली माझ्या क्लीनिकमध्ये आली तेव्हा अगदी रडकुंडीला आली होती. पूर्वीचे दाट केस जाऊन आता तिची वेणी अगदी पातळ झाली होती. पूर्ण माहिती घेतल्यावर, तिच्या केसचा बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात आले की कॉलेजमध्ये आल्यापासून सबमिशन्स, कॉलेज फेस्ट्समुळे होणाऱ्या लेट नाईट्स, पार्टीज यामुळे तिची जीवनशैली पूर्ण बदलली होती.

             चाळीशीची अमला क्लीनिकमध्ये आली , तेव्हा लक्षात आले की प्रेझेन्टेशनस्, प्रोजेक्ट डिलिव्हरी , क्लायंट मीटिंग,  घरच्या जबाबदाऱ्या हे आणि असे ताण-तणाव तिच्या रोजच्या आयुष्याचा भागच झाले होते.

             विमलाताईंची तर अजून वेगळी कथा, त्यांचे केसगळतीचे प्रमाण तर एवढे वाढले होते की टाळू स्पष्ट दिसू लागली होती. त्यांची हिस्टरी घेता असे लक्षात आले की अगदी लहानपणापासूनच त्यांना आम्लपित्ताचा त्रास होता.

           केस गळण्याची बरीच कारणे असतात. चुकीची जीवनशैली, पोषणमूल्यांचा अभाव (nutritional deficiency), ताण-तणाव, अपुरी झोप अश्या कारणांमुळे केस गळतात.       केस गळणे ही काही फक्त सौंदर्य समस्या नाही तर कधी कधी ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. उदा. हॉर्मोनल आजार जसे की थायरोईड़ ग्रंथी विकार,पिट्युटरी ग्रंथी विकार, PCOS/PCOD, Autoimmune disorder, कुपोषण, SLE यासारख्या आजारांत केस गळणे एखाद्या लक्षण स्वरूप दिसते तर कधी कधी कॅन्सर च्या चिकित्सेमुळे, दीर्घ मुदतीचा ताप (Malaria,typhiod,chickengunia , dengueसारखे ताप) , केशत्वचेच्या जंतुसंसर्गामुळे (Lichen planus/ring worm infection) सुद्धा केस गळणे दिसून येते.तसेच मेनोपॉजनन्तरही केस गळताना दिसतात.

              आता एवढी वेगवेगळी आणि प्रसंगी गंभीर कारणे असतील तर 'मला काहीतरी तेल-शाम्पू द्या, केस गळणे थांबवण्यासाठी.' हा उपाय होऊ शकतो का? तर *निश्चितच नाही* या सगळ्या केसेसमध्ये केस गळण्याचे कारण शोधून औषधोपचार करावे लागतात. बऱ्याचदा धातुक्षयामुळे, उदा. रस-रक्तादि धातूंचा क्षय, केस गळत असतील तर त्यांची इतरही सूक्ष्म कारणे सर्व शरीरावर दिसतात. त्यानुसार निदान (diagnosis) केले जाते आणि त्याप्रमाणे औषधोपचाराचा कालावधी वाढतो. जर एखादे गंभीर किंवा जुनाट कारण जसे की हार्मोनल आजार, PCOD, कॅन्सर असेल तर प्रसंगी पंचकर्माने शरीरशुद्धी करुन मग औषधे द्यावी लागतात. आता कोणाला प्रश्न पडेल की फक्त केसच गळत आहेत तर एवढा वेळ का लागेल ट्रीटमेंटला? पण लक्षात घ्या,अश्या केसेसमध्ये फक्त केस गळण्यासाठी चिकित्सा करून उपयोगाचे नसते तर त्यामागचे कारण ट्रीट करणे गरजेचे असते. बऱ्याचदा रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा खूप वेळ गेलेला असतो अश्या वेळी या मधल्या वेळेत झालेले केसांचे नुकसानसुद्धा भरून काढावे लागते. मुळापासून नीट ट्रीटमेंट केली तर नवीन येणारे केस चांगल्या प्रतीचे आणि ताकदवान असतात.

(क्रमशः)


लेखिका

डॉ. स्निग्धा वर्तक.

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

अधिकृत केंद्र केशायुर्वेद प्रा. लि.

बोरीवली, मुंबई.

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 11 ऑक्टोबर 2020 रोजी https://samanwayayurved.blogspot.com/2020/10/3.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)



Saturday, 3 October 2020

संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा, भाग 1

 



            मावळतीचे रंग, कुणाला सुखावणारे तर कुणाला भिववणारे….

अशीच काहीशी स्थिती वृद्धावस्थेतही होत असते. वार्धक्य / ज्येष्ठपर्व / वानप्रस्थाश्रम / Second innings , प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यातील या कालखंडाकडे पाहतो. कितीही अपरिहार्य आणि अविभाज्य असले तरी जेव्हा खरोखरच वृद्धावस्था जवळ येते तेव्हा नाही म्हटलं तरी सर्वांच्या मनात थोडीशी धाकधूक असतेच.

यामध्ये बऱ्याचदा शारीरिक, मानसिक, आर्थिक अथवा नातेसंबंधातून निर्माण होणारे तणाव, जबाबदाऱ्या यामुळे असे होत असावे कदाचित. ताण-तणाव हेसुद्धा बऱ्याचदा शारीर स्थितीमुळेही होत असतात. का बरं होतं असं?

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.


■ बाल्यावस्था - बाल्यावस्थेत कफ दोषाचे प्राबल्य असते.

हे वाढीचे वय असल्याने बाल्यावस्थेत शरीरामध्ये कोशिका आणि उतींची वाढ होत असते. काही दुखले-खुपले (wear and tear) तर त्या जखमा लवकर भरून येतात.कारण या टप्प्यात वाढ होण्याचा वेग हा झीजेच्या वेगापेक्षा जास्त असतो.

साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत ही अवस्था दिसून येते. 


■ तरुणावस्था -  ही अवस्था साधारणतः पुढील 25 ते 30 वर्षे राहते. या अवस्थेत पित्त दोषाचे प्राबल्य असते. तरुणाईचा जोश,धडाडी, नवीन काही करून दाखवण्याची उर्मी या पित्त दोषामुळेच मिळते. या काळात आपल्या सवयी, दिनचर्येनुसार शरीरातील सूक्ष्म पचन होत असते. वाढीचा (नवीन कोशिका-उती तयार होण्याचा) वेग आणि जीझेचा वेग हा सामान्यतः सारखाच असतो. पण या वयात आपला जो आहार-विहार (lifestyle) असतो त्यातच आपल्या वृद्धावस्थेची बीजे रोवली जातात.

                 या दोन अवस्थांबद्दल अजून बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

■ वृद्धावस्था - आपण सगळेच कधी ना कधी वृद्ध होणार असतो. आणि खरं सांगायचं तर ,

शीर्यते तत् शरीरम् ।

म्हणजेच क्षरण पावते (झीजते) ते शरीर. 

थोडक्यात आणि अचूक सांगणे ही आयुर्वेद शास्त्राची खासियत आहे. त्याचाच नमुना म्हणजे आयुर्वेदाच्या अभ्यासाला आम्ही सर्वप्रथम अभ्यासतो ते हे वाक्य. 'जे क्षणोक्षणी झीजते ते शरीर.' म्हणजे 'लय' होणे हाच या शरीराचा गुणधर्म. या काळात वात दोषाचे प्राबल्य असते.आणि वाताचे लक्षण म्हणजे गती. त्यामुळे वृद्धावस्थेत हा झीज होण्याचा वेग अधिक वाढतो. त्यामुळे विविध प्रणाली उदा. पचनसंस्था, चेतासंस्था, तसेच विविध शरीरावयवांचे कार्य मंदावते.

2011 साली केलेल्या जनगणनेनुसार, भारतात तब्बल 104000000 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या गतीने 2050 सालापर्यंत भारतात एकूण लोकसंख्येच्या 20% नागरिक हे ज्येष्ठ वयोगटातील असतील. मग ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेच ना? 

             वय आणि कार्यक्षमतेनुसार या वयोगटाचे दोन ढोबळ उपप्रकार करता येतील. साधारणतः 60 ते 75 आणि 75 च्या पुढे. अर्थात विविध मानसिक आणि शारीरिक ताण-तणाव व ते सहन करण्याची क्षमता, शारीरिक आणि बौद्धिक प्रतिसाद (रिफ्लेक्सेस) आणि मध्यम वयात झालेले काही आजार उदा. मधुमेह,उच्च रक्तदाब, कॅन्सर (अर्थात ही काही वानगीदाखल उदाहरणे झाली, पण सध्या अनेक आजार मध्यम वयातच दिसून येतात.) तर, अश्या आजारांनुसारही वृद्धावस्थेतील कार्यक्षमता ठरते.

पुढील भागांतून आपण वृद्धावस्थेतील वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करणार आहोत.

(क्रमशः) 



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 04 ऑक्टोबर 2020 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/10/1.html  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करतााना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)



Saturday, 26 September 2020

inHAIRetance भाग दोन


केस_पेपर_तिचा_आणि_त्याचासुद्धा 


केसांचे सामाजिक स्थान -

ऐतिहासिक काळापासून चांगले केस हे चांगले आरोग्य, तारुण्याचे , लैंगिकता, शक्ति, वर्चस्व तसेच धार्मिकता यांचे लक्षण आहे. डोक्यावरील केसांवरुन व्यक्तीचा स्वभाव, सवयी, सामाजिक स्थान यांचा अंदाज लावता येतो. कारण चेहेऱ्याप्रमाणे केसांकडेसुद्धा चटकन लक्ष वेधले जाते. 

पोलिस, सैन्यदलातील जवान यांचे केस बारीक कापलेले असतात. तर अभिनेते , खेळाडू अश्या व्यक्तीचे केस बऱ्याचदा लेटेस्ट स्टाइल, फॅशनचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या रचना व्यक्तिचे आर्थिक स्थानही दर्शवितात. (सांभाळण्यास कठीण फॅशन असेल तर त्यासाठी वेगळी व्यक्ती/ नोकर असणे ही आर्थिक संपन्नताच, नाही का?) तर मानसिक ताण-तणावाचे काम करणाऱ्या माणसांमध्ये डोक्याच्या कोपऱ्यांतील  केस विरळ होतात ही काही उदाहरणे म्हणता येतील.

 डोक्यावरचे केस आपल्याला जन्मतःच असतात तर चेहरा, काख , जननेंद्रिय येथे उगवणारे केस वयात आल्यावर दिसू लागतात. पुरुषांना काख, छाती, जननेंद्रिये व चेहेऱ्यावर (दाढी-मिश्या) केस उगावतात तर स्त्रियांना जननेंद्रिये ,काखेत केस येतात. हे केस उगवणे हे व्यक्ती वयात आल्याचे लक्षण असते (Secondary sexual charachters). मात्र पुरुषांना उपरोक्त निर्देशित स्थानी केस न येणे किंवा स्त्रियांना त्या जागी केस येणे हे विकृतीचे (Hormonal Imbalance चे) लक्षण आहे. त्यामुळे,

  • डोक्यावरचे गळत असलेले केस वाचवणे.

  • टक्कल असल्यास तेथे नवीन केस उगवण्यास प्रयत्न करणे

  • नवीन येणाऱ्या केसांचा पोत (texture हो!) सुधारणे.

आणि

  • अनावश्यक ठिकाणी उगवलेले केस कमी करणे

या पद्धतीने केशायुर्वेद - संपूर्णतः आयुर्वेदिक पद्धतीने काम करते.










inHAIRetance , 'केस'पेपर तिचा आणि त्याचासुद्धा


केस, मग ते  ‘त्या’चे असोत वा ‘ति’चे.. सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. सुंदर,काळेभोर, घनदाट केसांवर कितीक कथा-कादंबऱ्या-गाणी लिहिली गेली. (आठवा, ‘झटककर ज़ुल्फ़ तुम’मधली दीपिका, ‘होशवालों’मधली सोनाली बेंद्रे, ‘घर से निकलतेही’वाली मयूरी कांगो) तसेच प्रत्यक्ष जीवनातसुद्धा हे केस महत्वाची भूमिका बजावतात. आपल्याला चांगला लूक, व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास या केसांमुळे मिळतात. बरोबर याउलट स्थिती केसांच्या समस्या सुरु झाल्या की होते.

         यावर उपाय म्हणून, *समन्वय आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक* व *केशायुर्वेद प्रा. लि.* यांच्या संयुक्त विद्यमाने ०३ जानेवारी २०१८ पासून बोरिवली मुंबई येथे आधुनिक तंत्रज्ञान व शाश्वत आयुर्वेद शास्त्र यांचा सुयोग्य मिलाफ साधत केसांच्या विविध समस्यांसाठी विशेष चिकित्सा सुविधा देत आहोत. तसेच केसांच्या समस्या व उपाय यासाठी जनजागृती करण्यासाठी संक्षिप्त नोट्स वेळोवेळी प्रसिद्ध करण्याचे योजिले आहे. 

#inHAIRetance_वारसा__सुंदर_केसांचा 

#केस_पेपर_तिचा_आणि_त्याचासुद्धा या नावाने या नोट्स प्रसिद्ध होतील.

धन्यवाद.

डॉ. स्निग्धा वर्तक.

समन्वय आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक.

अधिकृत केंद्र केशायुर्वेद प्रा. लि.

बोरीवली, मुंबई.

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 

(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2020/09/inhairetance.html या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)