उपवास हा शब्द 'उपविश ' या संस्कृत क्रियापदापासून बनला आहे. 'उप' म्हणजे जवळ आणि 'विश ' म्हणजे रहाणे /वास करणे. यामुळे उपवास या शब्दाचा अर्थ होतो शरीर - मनाने देवाच्या जवळ रहाणे . व्यक्तीच्या कायिक-मानसिक शुद्धतेसाठी उपवासाची योजना केली गेली आहे . पण हल्ली उपवास म्हणजे अतिकडक अन्न-पाणी वर्ज्य करून (निर्जळी ) किंवा याच्या अगदि विरुद्ध म्हणजे 'एकादशी आणि दुप्पट खाशी' अशा चमचमीत प्रकारचे तरी असतात. या दोन्ही प्रकारात कसली आली आहे हो शुद्धता ?
परमेश्वराच्या जवळ जायचे, ध्यानानंदात तल्लीन व्हायचे तर शरीरात लाघव म्हणजेच हलकेपणा आणि मनाला उत्साह हवा.
आयुर्वेदाचार्य चक्रपाणी म्हणतात ,
उपावृत्तस्य पापेभ्यः सहवासो गुणैः सह ।
उपवासो स विज्ञेयो न शारीरविशोषणम ।।
पापकर्मापासून दूर (निवृत्त) होऊन परमेश्वराच्या सहवासात राहणे. पुढे ते असेही म्हणतात उपवास म्हणजे शरीराचे शोषण नाही .
म्हणून उपवास करताना, मनाला चिंता,लोभ,मत्सर,दुःख यातून Break द्यायचा आणि देवाचे नाम-जप यात रमून जायचे आणि शरीराला - पर्यायाने पचन संस्थेला Break द्यायचा व पचायला हलके पदार्थ खायचे म्हणजे पचन सुधारते आणि सामता कमी होऊन शरीराला हलकेपणा (लाघव) येतो
पण प्रत्यक्षात आपण काय करतो तर उद्या शिवरात्र-एकादशी-अंगारकी आहे मग , " सगळ्यांसाठीच नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी करू" म्हणून ढीगभर साबुदाणे भिजत घातले जातात. साबुदाण्याची खिचडी-वडे ,वेफर्स,दाण्याची आमटी असे एकापेक्षा एक दणदणीत ,पचायला जड असलेले खाऊन आपण पचन संस्थेला अजून दमवून टाकतो आणि`मग अंग जड वाटणे , गॅसेस होणे, Hyperacidity, डोकेदुखी हे प्रकार सुरु होतात. त्यात अजून भूक दाबण्यासाठी म्हणून चहा-कॉफी चा मारा असतोच . मग सुरू होतात डॉक्टरांच्या वाऱ्या आणि ओरड सुरु होते कि हे उपास-तापास सोसत नाहित ब्वा आपल्याला …….
खरं तर उपवास नाही तर उपवासाची चुकीची पद्धत सोसत नसते आपल्याला. मनाचं-शरीराचं न ऐकता फक्त जिभेचं ऐकल्याचा हा परिणाम असतो.
म्हणून उपवास करताना पुढील पदार्थांचा वापर करावा .
- सामान्यतः उपवासाचे पदार्थ हे पचायला हलके मात्र पचायला सोपी शर्करा असलेले (Simple forms of sugars such as Glucose ,Fructose ) , Magnesium असलेले असावेत जेणेकरून शरीराला त्वरित उर्जा मिळू शकेल.
- चिक्की हा उत्तम पदार्थ आहे. यातील गूळ राजगिरा सुकामेवा हे पदार्थ त्वरित उर्जा देणारे , मिनरल्स आणि प्रमाणात स्निग्ध पदार्थ पुरवणारे असतात .
- उसाचा रस हा बलकारक , तहान शमन करणारा ,मूत्र शोधन करणारा आणि थंड आहे
- शहाळ्याचे पाणी सप्तधातूवर्धक,थंड,तृष्णाहर असे असूनही पचायला हलके तरीही दीपन करणारे आहे .
- वेगवेगळ्या प्रकारची ताजी आणि शक्यतो त्या ऋतुमानातील फळे चावून खावी . फळांचे रस घेतल्यास शरीराला आवश्यक चोथा फेकून दिला जातो आणि गरजेपेक्षा जास्तीची साखर शरीरात जाते म्हणून ते शक्यतो टाळावेत .
- खजूर खारका , जर्दाळू,मनुका,बदाम,अक्रोड,चारोळी यासारखा सुका मेवा मात्र थोड्या प्रमाणात खावा . काजू,पिस्ते,शेंगदाणे टाळावे.
- प्रवासात असताना उपवास करायचा असेल तर आंबापोळी ,फणसपोळी ,कोहळ्याचा पेठा , चिक्की ,सुकामेवा खाता येईल .
रस्त्यावरचे Juices , कापलेली फळे खाऊ नयेत . - गायीचे दूध,ताक,साजूक तूप वापरावे पण दूधापासून बनले आहेत म्हणून बासुंदी ,लस्सी, मिल्कशेक, श्रीखंड, पेढे, बर्फी किंवा पनीरचे पदार्थ खाऊ नयेत ते पचायला जड असतात .
- वेगवेगळे कंद जसे कि शिंगाडा,सुरण, कंदभाजी ,रताळी , कोनफळ हे उपवासासाठी उत्तम, पण ते शक्यतो भाजून किंवा उकडून खावे , तळून खाणे टाळावे .
- सगळ्यात महत्वाचे म्हणजे हॉटेलच्या Menu card वर, वेगवेगळ्या कूकिंग शोज मध्ये "उपवासाचा/ची/चे या विशेषणाने सुरु होणारे सर्व पदार्थ टाळावेत (उदा. डोसे,मिसळ,कचोरी,कटलेट ,सामोसे,कोफ्ते हे आणि असे सगळेच, हल्ली पिझ्झा सुद्धा आला आहे बरं का.. )
शेवटी उपवास का आणि कशासाठी करायचे या मागची कारणमीमांसा लक्षात घेणे महत्त्वाचे नाहीतर चवीसाठी खायचे असतील तर या पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी उपवासाचे निमित्त कशाला?
शेवटी आरोग्यासाठी , आनंदासाठी केलेला उपवास खरा,नाही का?
शेवटी आरोग्यासाठी , आनंदासाठी केलेला उपवास खरा,नाही का?
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 28 फेब्रुवारी 2016 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2016/02/blog-post.html?m=1
या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)
Thank you dr.snigdha for valuable sharins
ReplyDeleteनेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteWell said and written
ReplyDeleteधन्यवाद! उपयुक्त माहिती, छान आणि सोप्या पद्धतीने समजावली आहे.
ReplyDelete