Sunday, 3 October 2021

*संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा, भाग 1* वृद्धावस्था आणि वातदोष -


ऱ्याचदा चिकित्सलयात येणाऱ्या मध्यमवयीन अथवा ज्येष्ठांकडून एक वाक्य नेहमी ऐकायला मिळते  की मला वाताचा त्रास आहे/ सांधेदुखी म्हणजे वात का? 

तर असे नाही.

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.


■ *बाल्यावस्था* - बाल्यावस्थेत कफ दोषाचे प्राबल्य असते.

हे वाढीचे वय असल्याने बाल्यावस्थेत शरीरामध्ये कोशिका आणि उतींची वाढ होत असते. काही दुखले-खुपले (wear and tear) तर त्या जखमा लवकर भरून येतात.कारण या टप्प्यात वाढ होण्याचा वेग हा झीजेच्या वेगापेक्षा जास्त असतो.

साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत ही अवस्था दिसून येते. 


■ *तरुणावस्था* -  ही अवस्था साधारणतः पुढील 25 ते 30 वर्षे राहते. या अवस्थेत पित्त दोषाचे प्राबल्य असते. तरुणाईचा जोश,धडाडी, नवीन काही करून दाखवण्याची उर्मी या पित्त दोषामुळेच मिळते. या काळात आपल्या सवयी, दिनचर्येनुसार शरीरातील सूक्ष्म पचन होत असते. वाढीचा (नवीन कोशिका-उती तयार होण्याचा) वेग आणि जीझेचा वेग हा सामान्यतः सारखाच असतो. पण या वयात आपला जो आहार-विहार (lifestyle) असतो त्यातच आपल्या वृद्धावस्थेची बीजे रोवली जातात.

                 या दोन अवस्थांबद्दल अजून बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

■ *वृद्धावस्था* - आपण सगळेच कधी ना कधी वृद्ध होणार असतो. आणि खरं सांगायचं तर ,

*शीर्यते तत् शरीरम्* ।

म्हणजेच क्षरण पावते (झीजते) ते शरीर. 

थोडक्यात आणि अचूक सांगणे ही आयुर्वेद शास्त्राची खासियत आहे. त्याचाच नमुना म्हणजे आयुर्वेदाच्या अभ्यासाला आम्ही सर्वप्रथम अभ्यासतो ते हे वाक्य. ' *जे क्षणोक्षणी झीजते ते शरीर* .' म्हणजे 'लय' होणे,नाश पावणे हाच या शरीराचा मूलभूत गुणधर्म आहे. या काळात वात दोषाचे प्राबल्य असते. तर वात दोष हा शरीरातील गतिशील क्रियांना कारणीभूत असणारा दोष आहे. त्यामुळे वृद्धावस्थेत हा झीज होण्याचा वेग अधिक वाढतो. याचा परिणाम सात धातू, तीन मल, अग्नि व ओज यांवर ही दिसून येतो.

 त्यामुळे विविध प्रणाली उदा. पचनसंस्था, चेतासंस्था, तसेच विविध शरीरावयवांचे कार्य मंदावते.

पूर्वी जसे आजारातून बरे होण्यासाठी शरीराची साथ मिळे, तशी ती या वयात मिळत नाही. त्यामुळे आजार बरे होण्यास वेळ लागतो. उदा. हळूहळू झिजत जाणाऱ्या सांध्यांमुळे संधीवातासारखे आजार, रक्तगत वात दोषामुळे उच्च रक्तदाब, स्वादुपिंडाच्या प्रभावित झाल्यास मधुमेहाची लक्षणे दिसतात, पचनशक्ती मंदावल्यामुळे पोटात गुबारा धरणे,शौचाला साफ ना होणे यासारखी लक्षणे दिसतात. आपल्या ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रियांवरही याचा परिणाम दिसून येतो. दृष्टी कमी होते,मोतीबिंदू तयार होतो,शब्दोच्चरण करताना त्रास होऊ शकतो, वास घेण्याची-ओळखण्याची शक्ती कमी होते, जिभेची चव-ऐकू येण्याची क्षमता कमी होते, हालचाली मंदावतात, एकाग्रता-स्मरणशक्ती-जाणिवा मंदावतात (various mental and cognitive functions (e.g., memory, intellect, reception, retention, analytic ability, etc.)., त्वचेवर सुरकुत्या येतात, केस पिकणे सुरू होते. अर्थात सर्वांनाच काही सगळीच लक्षणे दिसून येणार नाहीत पण शरीरप्रकृती तसेच शरीरातील दोषस्थिती यानुसार ही लक्षणे व्यक्त होतात.

 धन्वंतरी जयंती व राष्ट्रीय आयुर्वेद दिवस 2020 च्या निमित्ताने वात-पित्त-कफ दोष म्हणजे नक्की काय हे मी याआधीच सविस्तर सांगितले आहे त्यामुळे आता विस्तारभयास्तव ते परत सांगणार नाही. त्या ऐवजी त्या लेखाची लिंक येथे देत आहे.

https://samanwayayurved.blogspot.com/2020/11/2020.html?m=0

कधी कधी,  काही व्यक्तींचे वय तेवढे जास्त नसते परंतु त्यांची शारीरिक लक्षणे पाहता त्यांचे शरीर लवकर थकले आहे असे जाणवते. असे का होते तर याचे ही कारण आहे वात दोष, आपण वरील लिंक मध्ये वात-पित्त-कफाची लक्षणे पाहिली यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की या वात विकृतीला आता विकृत (बिघडलेल्या)पित्ताची जोड मिळाली तर शरीराची झीज अधिक वेगाने होते. काही वेळा पूर्वी झालेले क्षयात्मक मोठे आजार, मनमानी-स्वच्छंदपणे जगलेले आयुष्य (ज्यावेळी आहार-निद्रा-मैथुन यांचे नियम नीट पाळलेले नसतात म्हणजेच lifestyle disorders ज्यामुळे ओज क्षय होतो), जसे की शिळे अन्न,पचायला जड अन्न,आहारात अम्ल(आंबट), लवण (खारट), कटु(तिखट) चवींच्या पदार्थांचा  भरमसाठ वापर, रात्रीचा दिवस व दिवसाची रात्र करणाऱ्या झोपेच्या सवयी, शारीरिक व मानसिक ताणतणाव या सगळ्यामुळे शरीर कमकुवत होते. आणि याचा परिणाम म्हणून अकाली वार्धक्य येते.

(क्रमशः)


मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 03 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/10/1.html 

या  ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)


Friday, 1 October 2021

संध्याछाया…… विचार ज्येष्ठांच्या प्रश्नांचा - प्रस्तावना.

 




आज 1 ऑक्टोबर, International day for the elderly अर्थात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. आता Father's day/Mother's day सारखे हे काय वेगळे खूळ असेही कोणाला वाटेल पण हा काही फक्त साजरा करण्याचा एक दिवस नाही तर ज्येष्ठांचे समाजातील योगदान, त्यांचे घरातील महत्त्व तसेच ज्येष्ठ नागरिकांना  वयोमानानुसार येणाऱ्या समस्या यांची सर्वाना जाणीव करून देणे या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.


            मावळतीचे रंग, कुणाला सुखावणारे तर कुणाला भिववणारे….

अशीच काहीशी स्थिती वृद्धावस्थेतही होत असते. वार्धक्य / ज्येष्ठपर्व / वानप्रस्थाश्रम / Second innings , प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यातील या कालखंडाकडे पाहतो. कितीही अपरिहार्य आणि अविभाज्य असले तरी जेव्हा खरोखरच वृद्धावस्था जवळ येते तेव्हा नाही म्हटलं तरी सर्वांच्या मनात थोडीशी धाकधूक असतेच.

यामध्ये बऱ्याचदा शारीरिक, मानसिक, आर्थिक अथवा नातेसंबंधातून निर्माण होणारे तणाव, जबाबदाऱ्या यामुळे असे होत असावे कदाचित. ताण-तणाव हेसुद्धा बऱ्याचदा शारीर स्थितीमुळेही होत असतात. का बरं होतं असं?

आपल्या जीवनाचे ढोबळमानाने 3 टप्पे असतात. 

बाल्यावस्था , तरुणावस्था आणि वृद्धावस्था.

बाल्यावस्था व तरुणावस्थेबद्दल बरेच काही सविस्तर सांगता येईल, जे आपण इतर लेखनामध्ये त्या - त्या  अनुषंगाने पाहूच. पण आता या लेखमालेत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत ते वृद्धावस्थेबद्दल. 

          2011 साली केलेल्या जनगणनेनुसार, भारतात तब्बल 104000000 ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या गतीने 2050 सालापर्यंत भारतात एकूण लोकसंख्येच्या 20% नागरिक हे ज्येष्ठ वयोगटातील असतील. मग ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेच ना? 

             वय आणि कार्यक्षमतेनुसार या वयोगटाचे दोन ढोबळ उपप्रकार करता येतील. _साधारणतः 60 ते 75 आणि 75 च्या पुढे_ . अर्थात *विविध मानसिक आणि शारीरिक ताण-तणाव व ते सहन करण्याची क्षमता, शारीरिक आणि बौद्धिक प्रतिसाद* (रिफ्लेक्सेस) आणि मध्यम वयात झालेले काही आजार उदा. मधुमेह,उच्च रक्तदाब, कॅन्सर (अर्थात ही काही वानगीदाखल उदाहरणे झाली, पण सध्या अनेक आजार मध्यम वयातच दिसून येतात.) तर, अश्या आजारांनुसारही वृद्धावस्थेतील कार्यक्षमता ठरते.

पुढील भागांतून आपण वृद्धावस्थेतील वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करणार आहोत.मागच्या वेळी या लेखमालेतील पहिल्या लेखानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न आले होते. पण काही कारणास्तव, 'संध्याछाया'चे पुढील लेख येणे लांबले. यावेळी ही लेखमाला इतर लेखांसोबतच, महिन्यातून एक अथवा दोन लेख अश्या प्रकारे , रविवारी प्रसिद्ध केली जाईल. आपले काही प्रश्न, सूचना अथवा एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास आपण तसे वैयक्तिक मेसेज करून सूचित करू शकता.


(क्रमशः) 



मूळ लेखिका,

डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक. 

9870690689

samanwayaayurveda@gmail.com 


(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी 01 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या https://samanwayayurved.blogspot.com/2021/10/blog-post.html

या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करताना कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर केल्यास हरकत नाही.)